Sunday 18 April 2021

क्षण भारावलेले - १६

                                                क्षण भारावलेले - १६

                           ११ एप्रिल जागतिक पार्किन्सन्सदिना निमित्तचा  ऑनलाईन मेळावा अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत  यावर्षी साजरा झाला.या मेळाव्यानी भाराऊन टाकणारे अनेक क्षण दिले.भरभरून येणाऱ्या प्रतिक्रियातून ते अजूनही येतच आहेत.बरच काही लिहायचे आहे.प्रथम लिहित आहे ते मोहन पोटे यांच्यावर कारण यातून नोकरीत असताना पार्किन्सन्स  झालेल्या अनेकांना प्रेरणा मिळेल.

                       मेळाव्यात मोहन पोटे यांचे 'इतनी शक्ती हमे देन दाता'  सर्वानीच ऐकले.ते स्टेट बँकेत नोकरी करतात.आज त्यांना तेथे २ वर्षाचे एक्स्टेंन्शन मिळाले.हे त्यांचे दुसरे एक्स्टेंन्शन  आहे. त्यांनी याबाबतची पोस्ट टाकताना  पार्किन्सन्स मित्रमंडळ आणि त्यातील सभासदांनाही श्रेय दिले आहे.आम्ही एकमेकांना पाहिलेही नाही तरी खूप जवळीक आहे.मला त्यांची पहिली फोनवरची भेट आठवते.त्याना पार्किन्सन्सचे निदान झाले होते.ते खचून गेले होते.मुले मार्गी लागायची आहेत नोकरी करणे गरजेचे आहे बँकेतील उर्वरित सेवा आपण करू शकणार नाही असे त्यांच्या मनानी घेतले होते.१ वर्ष गोळ्या घेतल्या.झोप येते,हाताने लिहिणे, जेवणे जमत नाही,  गोळ्यांचा त्रास होतो म्हणून हळूहळू त्याही बंद केल्या.यातून रुग्ण पूर्णपणे बरा होतो का असे ते विचारात होते..फोन आला तेंव्हा ते लोकलमधून प्रवास करत होते.

                            ते गोराइला राहातात.बँक बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स येथे.गोराईहून बस किंवा रिक्षाने बोरीवली स्टेशन,तेथून लोकलने बांद्रा.आणि पुन्हा बस किंवा रिक्षाने इच्छित स्थळी.याला दीड ते दोन तास लागतात..अधिकार  पदावर असल्याने जबाबदाऱ्याही भरपूर.त्यांच्याकडे eod चे काम असल्याने सर्वात शेवटी बँकेतून बाहेर पडावे लागते.हे सर्व आता आपल्याला झेपणार का असे त्यांना वाटत होते.  

                      मी त्याना गोळ्या बंद न करता जो त्रास होतो तो तुमच्या न्यूरॉलॉजिस्टना सांगा ते गोळ्या बदलून देतील असे सांगितले.आजार पूर्णपणे बरा होऊ शकत नाही पण लक्षणावर नियंत्रण आणता येते हे वास्तव सांगितले.तरूण वयात पार्किन्सन्स झालेल्या अनेकांनी कार्यकाल कसा पूर्ण केला ही उदाहरणे दिली,त्याना वेबसाईट लिंक पाठवली.त्यातील  लेख वाचून, व्हिडीओ ऐकून त्यांच्या बऱ्याच शंकांचे निरसन झाले होते.माझ्याशी बोलूनही त्याना बरे वाटले होते.ते Whats app group वर सामील झाले त्यांच्या पोस्टवरून त्यांची निराशा,नकारात्मकता कमी झाल्याचे जाणवत होते.

                   एकदा फेसबुकवर व यु ट्युबवर करावकेवर म्हटलेल्या 'बेकरार करके हमे यु ना जाईये' या गाण्याचा व्हिडीओ त्यांनी टाकला होता.गाणे सुंदरच म्हटले होते.

                  त्यांच्या गच्चीत त्यांनी छोटी बाग केली आहे..त्याला आलेल्या फुलांचे फोटो ते टाकत होते.ग्रुपवर अनेक जण कलाकृती,स्वरचित कविता असे काहीना काही टाकतात आणि इतरांचीही क्रिएटिविटी जागृत होते.पोटे आता ग्रुपवर मिसळून गेले आहेत.आमच्या परिवाराचे सदस्य झाले होते.

                    ११ एप्रिलच्या मेळाव्यासाठी सुरुवातीचे ईशस्तवन म्हणाल का असे विचारताच त्यांनी ताबडतोब होकार दिला. एरवी तबला ,पेटीवर गाणे बसवले जाते.ऑनलाईन कार्यक्रमात ते शक्य नसते म्हणून मीच त्यांना अर्थपूर्ण आणि सोपे असे गीत सुचवले होते. 'इतनी शक्ती हमे दे ना दाता' हे गाणे बँकेचा व्याप सांभाळत ते बसवत होते.

                 मला किंवा ग्रुपमधल्या सर्वच स्त्री सदस्यांना ते माउली म्हणतात. त्यांचा मेसेज आला. 'माऊली तुमचे खूप आभार. ही प्रार्थना एकदम शुद्धीकारक आहे.काल दोनदा ऑफिस संपल्यावर कॉमन रूममध्ये रेकॉर्ड केले.परंतु आवाज मुलायम व्हायला हवा तसा प्रयत्न चालू आहे.सुरूवातीला आठवडाभर तर एकेक शब्दानेच कंठ दाटून यायचा.ही प्रार्थना म्हणजे मनासाठी आरसाच आहे.माझा आवाज मनासारखा जमला की मग रेकॉर्ड करीन व पाठवीन.परत एकदा धन्यवाद'. त्यांनी यासाठी खूप कष्ट घेतले.आधी ऑडीओ आणि नंतर व्हिडीओ पाठवले.ऐनवेळी तांत्रिक अडचण आली,इंटरनेटची समस्या झाली तर म्हणून आम्ही जास्तीत जास्त कार्यक्रमाचे व्हिडिओही घेऊन ठेवले होते.रिहर्सलला त्यांनी प्रत्यक्ष गाणे म्हटले ते छान झाले.

त्यांचा लगेच मेसेज आला.'आता केलेल्या रंगीत तालमीत एक गोष्ट लक्षात आली माझा नेहमीचा अलार्म सुरू झाला आणि एक मिनीटभर बीप बीप असा आवाज आपल्या कार्यक्रमात व्यत्यय आणू लागला.तसेच रीमाईंडर नोट चा पण व्यत्यय येतो.अलार्म व रीमाईंडर स्टॉप केले म्हणजे व्यत्यय येणार नाही.'प्रार्थना चांगली होण्यासाठी ते जीव ओतून काम करत होते.

कार्यक्रमादिवशी काही अडचण आली नाही त्यांनी प्रत्यक्ष गाणे म्हटले.

               या त्यांच्या यशानंतर लगेचच त्याना एक्स्टेंन्शन मिळाल्याचे लेटर आले.ते खुश होते.त्याना अभिनंदनाचा फोन केला तेंव्हा ते सांगत होते. या ग्रुपमध्ये आल्यावर एकदम माझ्या दृष्टीकोनात,जीवनात ३६० अंशात फरक झाला.

                एक्स्टेन्शन नंतर त्यांची बोरीबंदरला बदली होण्याची शक्यता आहे..प्रवासाचा वेळ वाढणार आहे..त्याबद्दल त्यांची काहीच तक्रार नव्हती.त्यांच्या दृष्टीने आता प्रवासामध्ये त्याना काही वाचायला, शिकायला,आराम करायला भरपूर वेळ मिळणार आहे.नरीमन पॉइंटला कामाला असताना .लोकल प्रवासातच ते बँकेत उपयोगी पडणाऱ्या काही कॉम्प्युटर लँग्वेज शिकले. त्यांच्या दृष्टीकोनात ३६० अंशात फरक पडलाय हे मला पटले.

              सुरुवातीला  शुभार्थीची रोल मॉडेल मी त्यांच्यासमोर ठेवली होती आता तेच रोल मॉडेल बनले होते.स्वमदत गटाचे महत्व अशा अनेक शुभार्थींच्या यशातून अधोरेखित होत आहे.

                पोटे तुमचे खूप अभिनंदन आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा.

                                                                                                                                                           

 May be an image of 1 person, body of water and tree


                   



                     

                   

No comments:

Post a Comment