Monday 22 April 2019

पार्किन्सनन्स विषयक गप्पा - ३८

                                          पार्किन्सनन्स विषयक गप्पा - ३८
                           आमच्या पार्किन्सन्स मित्राला मिरवायची,आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायची हौस भारी.त्याच असं झालं आज आम्ही उन आणि गर्दी टाळण्यासाठी मतदान करायला सकाळी सात वाजताच बाहेर पडलो.बऱ्याच जणांनी आमच्या सारखाच विचार केला असावा.आमच्या पुढे रांगेत १०/१५ तरी लोक होते.पण त्या सर्वांनी ह्यांच्याकडे पाहून आम्हला एकमतानी आधी जाऊ दिले.तिथल्या अधिकारी,कर्मचारी सर्वांनीच याना अदबीने वागवले.आमच्या मित्राची कृपा दुसरे काय? पूर्वी याना असे कोणी फेवर केलेले आवडायचे नाही.पण आता पार्किन्सन्सला मित्र म्हणून स्वीकारल्यापासून  ते सहजपणे अशा बाबी स्वीकारतात.मतदान करून बाहेर आलो तर.कोणत्या तरी channel ची मंडळी आमच्याकडे आली.तुम्ही एवढे आजारी असून मतदानाला आलात याबद्दल काय सांगायचे आहे? मतदानाला बाहेर न पडणार्यांना,सहलीला जाणार्यांना तुम्ही काय सांगाल इत्यादी प्रश्न विचारले गेले.ह्यांचे बोलणे समजत नाही असे पाहिल्यावर माझ्याकडे मोर्चा वळला.त्यावेळी जे सुचेल ते मी बोलले पण नंतर वाटले मी सांगायला पाहिजे होते ते आजारी नाहीत.ती मुलाखत दिसली तर त्यांचे डोळे,मी आजारी नाही हे बोलत होते हे जाणकारांना समजेलच.असो.
                        आमच्या दृष्टीने मतदानाला जाऊन आम्ही फार काही जगावेगळे  केले नव्हते. हे सर्व करणे ह्यांच्यासाठी सहज शक्य होते.फारसा आटापिटा करावा लागला नाही.इतरांना मात्र ह्यांच्याकडे पाहून तसे वाटत होते.
                      आमचे  सर्व शुभंकर, ( केअर टेकर )  शुभार्थी ( पेशंट )मतदान करायला नक्की जाणार याची खात्री आहे.इतरही सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा.

Saturday 20 April 2019

क्षण भारावलेले - ९

                                                             क्षण भारावलेले - ९
                              १३ एप्रिलला आमचा पार्किन्सन्स दिवस मेळावा झाला आणि १४ एप्रिलला

 आमचे हितचिंतक, आमच्या विविध उपक्रमांची दखल घेणारे अशोक पाटील यांची whatsapp वर प्रतिक्रिया आली.' काल रात्री पार्किन्सन्स मंडळ स्मरणिकेतील एकापेक्षा एक सुरेख असे लेख वाचत बसलो होतो.त्यातील "पार्किन्सनस व तत्सम व्याधीग्रस्तांसाठी सूक्ष्म व्यायाम" ...हा मोरेश्वर काशीकर यांचा लेख मला फारच आवडला.पुन्हा पुन्हा वाचावा असाच आहे.
एखादा लेख छान होण्यासाठी त्याविषयाच्या सखोल ज्ञानाबरोबर तो विषय लोकांच्यापर्यंत पोचवायची आंतरिक तळमळही लागते.मोरेश्वर काशीकर यांच्याकडे शहाणे करुनी सोडावे सकलजन ही वृत्ती ठासून भरलेली आहे.त्यामुळेच वाढलेल्या पार्किन्सन्सची पर्वा न करता हा लेख त्याच्याकडून लिहिला गेला.
            ५/६ महिन्यापूर्वी त्यांचा मी सध्या सोप्या व्यायामाविषयी लेख लिहितोय असा फोन आला. आत्तापासून थोडे थोडे लिहिले की स्मरणिकेच्या वेळेपर्यंत लिहून होईल असे त्यांना वाटत होते.त्यांची वाढलेली फ्रीजिंगची समस्या आणि ताणलेला ऑफ पिरिएड पाहता हे कसे शक्य आहे असे मला त्यावेळी वाटले होते.१४ तारखेच्या सभेच्या वेळची त्यांची अवस्था आठवत होती.
            १४ जानेवारी २०१९ ला डॉक्टर अविनाश भोंडवे यांचे नर्मदा हॉल येथे व्याख्यान होते.सकाळीच काशीकर यांचा फोन आला.मी व्याख्यानाला येत आहे.जानेवारीत त्यांचा वाढदिवस असतो त्यानिमित्त त्याना खाऊही द्यायचा होता.त्यांची मुलगी आली त्यामुळे ते आलेले समजले पण प्रार्थना झाली,सर्वांचे वाढदिवस झाले तरी ते आत आले नाहित.शेवटी व्याख्यानाला सुरुवात केली.ते फ्रीज झाले होते.त्यांना आत येण्यासाठी अर्धा तास लागला.
             अशी ज्यावेळी परिस्थिती असते त्यावेळी बरेच शुभार्थी आपली दैनंदिन कामे करणे एवढेच कसेबसे करतात.काही दिवसांनी ते लेख लिहित असल्याचा फोन आला.स्मरणिकेसाठी लेखन देण्यासाठी १५ फेब्रुवारी शेवटची तारीख होती.त्यांचा पुन्हा फोन आला माझे लेखन झाले आहे पण संगणक बिघडलाय.मी त्याना म्हटले काही हरकत नाही. तुमचा लेख थेट छापायचा असतो त्यात संपादन करावे लागत नाही.अगदी पेजिंगच्या स्टेजला दिलेत तरी चालेल.त्यांचा लेख आमच्या मासिकासाठी asset असतो.पण अशी वेळच आली नाही त्यांनी २३ तारखेच्या दरम्यान लिखित लेख पाठवला.
             मधल्या काळात तुम्हाला मासिक साठी प्रुफ रीडिंग करावयाचे असल्यास माझ्याकडे पाठवा असा फोन आला.मला फ्रीजिंगची समस्या असलेले,ऑफ पिरिएड वाढलेले  आणि या त्रासाने हैराण झालेले,मानसिक स्वास्थ्य हरवलेले,नैराश्यात गेलेले अनेक शुभार्थी आठवत होते.त्यांचा फोन आला की त्यांची कशी समजूत घालायची असे मला वाटायचे?परदुःख शीतल हे मला मनातून समजायचे पण काशिकारांकडे पाहिले की वाटते,मनाचे सामर्थ्य आणि काहीतरी करायची जिद्द,तळमळ असेल तर सर्व शक्य आहे.अशी समस्या असलेले आणि कोणतीच समस्या नसून ही कुरकुर करणारे यांच्या साठी म्हणजे आपल्या सर्वांसाठीच मोरेश्वर काशीकर यांचे उदाहरण सकारात्मक उर्जा देणारे आहे.
          आम्ही स्मरणिका देण्यासाठी त्यांच्या घरी गेलो.त्यांच्या मनातल्या अनेक योजना ते सांगत होते.आम्ही थक्क!
           काशीकर यांच्यामुळे  भारावलेले क्षण येतच राहणार हे मला लक्षात आले.यापूर्वी त्यांच्यावर लिहिलेल्या लेखाची लिंक सोबत देत आहे. 
https://www.parkinsonsmitra.org/?p=1348
असे इतरही भारावलेले क्षण अनुभवण्यासाठी पहा
http://parkinson-diary.blogspot.in/
www.parkinsonsmitra.org ही वेबसाईटही पहा.


            


Friday 12 April 2019

भावपूर्ण श्रद्धांजली - डॉक्टर विजय देव

                                                 भावपूर्ण श्रद्धांजली
            एस.पी कॉलेजचे माजी प्राचार्य,राज्यशास्त्राचे प्राध्यापक,लेखक,कृतीशील दुर्ग प्रेमी, पार्किन्सन्स मित्रमंडळाचे  हितचिंतक डॉक्टर विजय देव यांचे बुधवारी निधन् झाले..पार्किन्सन्स मित्रमंडळाकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.त्याच्यामागे अशी विविध बिरुदे असली तरी आमच्या मंडळाच्या कामात ते कार्यकर्ते म्हणूनच वावरले. मंडळाचे संस्थापक मधुसूदन शेंडे यांची देव पती पत्नीशी कौटुंबिक मैत्री होती २००८ च्या पार्किन्सन्सदिन मेळाव्यात डॉक्टर वीणा देव यांनी सूत्रसंचालन केले होते तर २००९ च्या पार्किन्सन्सदिन मेळाव्यात सूत्र संचालनाचे काम डॉक्टर विजय देव यांनी केले होते. केले होते.या कार्यक्रमाच्या सभामध्ये ते आमच्यातलेच एक होऊन सहभागी झाले.शेंडे साहेब गेल्यावर त्यांनी शेंडे साहेबांच्यावर लेख लिहून दिला 'मित्रा पार्किन्सना' या इबुकमध्ये त्याचा समवेश केला आहे.देव सरांच्या जाण्याने आमचा सच्च्या हितचिंतक हरपला.



Saturday 6 April 2019

क्षण भारावलेले - ८

                                                  क्षण भारावलेले - ८
                                     वेबसाइटच्या कामासाठी अतुल ठाकूर आणि माझे नेहमीच फोनवर बोलणे होत असते. त्या दिवशी अतुलनी विचारलं 'शीला ताई कशा आहेत येतात का सभेला?'. आणि माझ्या लक्षात आले बरेच दिवस शीलाताईना फोन करायचं पेंडिंग आहे. अतुलनी फोन ठेवल्या ठेवल्या मी लगेच शीलाताईना फोन केला. एकमेकांच्या तब्येतीची चौकशी, जुन्या आठवणी आणि भरपूर गप्पा झाल्या. आता प्रत्यक्ष भेटणे अशक्यच आहे.फोनवरच भेटत राहू असा संभाषणाचा शेवट झाला. त्यांचा पार्किन्सन्स वाढलेला असला तरी बोलणं अजूनही स्पष्ट आणि खणखणीत आहे.बोलता बोलता मी खानापूर येथील सनवर्ल्डला' समृद्ध जीवन कार्यशाळे'साठी जाणार असल्याचे सांगितले.त्यांनी माझ्याकडून फोन नंबर घेतला.
                                   रात्री दहा वाजता शिलाताईंचा फोन आला. ' .अग शोभा  उद्या मीही येत आहे कार्यशाळेला. पैसेही भरले..माझ्या केअरटेकरलाही घेवून येणार.' मी आवाक अशा अवस्थेत यायचे धाडस शिलाताईच करू जाणे..२००८ पासून त्याना विविध अवस्थेत आणि त्या अवस्थेनुसार फिरुनी नवी जन्मेन मी म्हणत,स्वत:ला बदलत आनंदाचा मार्ग निवडताना मी पाहिले.
                                   शीलाताई आणि अनिल कुलकर्णी हे हरहुन्नरी,उत्साही जोडपे. २००८ ला दिनानाथ हॉस्पिटल मध्ये पहिली कार्यशाळा झाली त्यावेळी  आमच्यात सामील झाले.दोघानाही पीडी होता.दोघेही एकमेकाचे उत्तम शुभंकर.अमेरिकेतील सपोर्ट ग्रुप पाहून काही कल्पना घेऊन ते आले होते.शीलाताई डॉक्टर,अनिल कुलकर्णी केपीआयटीचे व्हाईस प्रेसिडेंट.त्यांनी व्हिजन ,मिशन सर्व ठरवत कामाचा आराखडा तयार केला.कार्यशाळेत आलेल्या श्रोत्यांचे पुण्यातील विभागानुसार गट केले.कोथरूड गटाचे काम यशस्वीरीत्या केले.संगणकाचा वापर करायला त्यांनी शिकविले.अनेक अफलातून कल्पना त्याना सुचत.त्यांनी मंडळाच्या कामाची गती वाढवली.सुचित्रा दाते यांच्या नृत्योपाचारात शेंडे,तीर्थळी,कुलकर्णी पती पत्नी सामील झालो.पटवर्धनही कधीतरी यायचे.शीलाताई आणि तीर्थळी सिन्सिअर विद्यार्थी. त्यांच्या फॉर्महाउसवरही एकत्रित जायचो कधी कधी सभा त्यांच्या घरी व्हायच्या.आमची अगदी घट्ट मैत्री झाली.
                              या काळात त्यांचे विणकाम,नव्याने शिकलेली चित्रकला, पेटी शिकणे हे चालूच होते.त्यांची फ्रीजिंगची समस्या वाढली होती.तशाही अवस्थेत त्या मुलीच्या बाळंतपणासाठी  अमेरीकेला गेल्या.डिंकाचे लाडू वगैरे साग्रसंगीत स्वहस्ते केले.तेथे बरेच दिवस राहिल्याने कामातील सहभाग कमी झाला.त्यानंतर ब्रेस्ट कॅन्सर, त्यातूनही बाहेर आल्या.कार्यकारिणीच्या सभांना अनिल कुलकर्णी एकटेच येत.शीलाताइंचे येणे बंद झाले.सभा सहली यात सामील होणे चालूच होते.दोनदा त्यांच्या फॉर्महाउस वर सहल गेली.त्यांची अमेरिकेत राहणारी मुलगी पुण्यात त्यांच्या वर राहायला आली.नातवंडे जवळ असल्याने दोघेही खुश राहू लागले.
                             सगळे छान चालू होते आणि घरातच अनिल कुलकर्णी पडले.बरेच दिवस शय्याग्रस्त झाले.शीलाताई ५/६ महिने घरातून बाहेरही पडू शकल्या नाहीत.अनिलना त्या सतत जवळ हव्या असायच्या.
यातून बरे होऊन ते दोघेही सभेला आले आणि आम्हाला खूप आनंद झाला.पण तो फार काळ टिकणारा नव्हता.दुखणे वाढत गेले.आणि अनिल हे जग सोडून गेले.माझी तब्येत बरी नसल्याने मी शीलाताईना भेटायलाही जाऊ शकले नाही.या सर्व काळात शीलाताई शांतचीत्तच होत्या.त्या अनिल गेल्यावर प्रथमच सभेला आल्या.त्याना पाहून मला भावना अनावर झाल्या.त्यांना एकट्या पहायची सवय नव्हती. त्यांनी माझीच समजूत काढली. स्मरणिकेसाठी त्यांनी अनिल कुलकर्णी यांच्यावर लेख लिहून दिला.त्यांच्या प्रेमकहाणीपासून सर्व लिहिले होते त्यांच्यातील अद्वैत लेखनातून जाणवत होते.त्या त्यांना  डॅडी म्हणायच्या.ते अजूनही त्यांच्या बरोबरच आहेत असे त्यांच्या वागण्यातून जाणवत राहते.
                            यानंतर त्या शांतीवन सहलीला आल्या.मनोरंजनाच्या कार्यक्रमात  यांनी एक विनोद सांगितला.'एका माकडाने काढले दुकान' हे बालगीत ठसक्यात म्हणत स्वत:तील लहान मुल जपल्याचे दाखवून दिले. सहलीत विजय ममदापुरकर यांनी काढलेली  कार्टून पाहून त्यांना पुन्हा चित्रकलेची हुक्की आली.
                         दैवाला पुन्हा त्यांची खोडी काढायाची लहर आली. त्यांना मेंदूची वेगळीच  समस्या सुरू झाली.काही क्षणाकरता त्याना काहीच आठवेना झाले.हातातून वस्तू पडत.लगेच त्या  पुर्वव्रत होत.पण आता मुलीला त्यांना कोठे पाठवायची भीती वाटू लागली.शीलाताईनी आता तेथल्याच ज्येष्ठ  लोकांचा ग्रुप बनवलाय आणि त्या दैवाला खोडी माझी कढाल तर म्हणत आनंदीच आहेत.
                      या सर्व पार्श्वभूमीवर त्या खानापूरला येणार याचे मला आश्चर्य वाटले.मी त्यांना रोहिणीताईंना तब्येतीबद्दल कानावर घालायला सांगितले.रोहिणीताई कृतीशील वृद्ध कल्याणशास्त्र तज्ज्ञ असल्याने त्यांनी सहज मान्यता दिली. उलट त्याना आनंदच झाला.सकाळी शीलाताई ठरल्याप्रमाणे आला. आम्ही एकमेकीना मिठी मारली.आमची दोघींचीही भेटण्याची तीव्र इच्छा होती म्हणून ही भेट घडली.  कार्यशाळेत तीन पार्किन्सन्स शुभार्थी ( पेशंट) आणि मी शुभंकर ( केअरटेकर )सामील झालो होतो रोहिणी ताईंनी आमच्या हस्ते कार्यशाळेचे उदघाटन केले.                     
                    शीलाताई एक दिवसच  थांबणार होत्या पण आमच्या खुप गप्पा झाल्या.बोलता बोलता त्यांनी त्यांच्या गळ्यात असलेली शिट्टी वाजवली.त्यांची केअरटेकर लगेच आली. .'घरातही बेल लावण्यापेक्षा हा मार्ग उत्तम. ही  डॅडीची कल्पना' त्या सांगत होत्या.त्यांच्याबरोबर आज मला अनिल कुलकर्णीही कितीतरी दिवसांनी त्यांच्या अफलातून कल्पनेसह भेटत होते.