Sunday 28 January 2024

पार्किन्सन्स विषयक गप्पा - ८ ८

                                                    पार्किन्सन्स विषयक गप्पा - ८

                           दिल्लीहून जोत्स्नाताई सुभेदार आणि इंदूरहून वनिताताई सोमण एकत्र ठरवून पुण्यात भेटल्या आणि मला भेटायला आल्या होत्या.मला त्यांच्या येण्याचे अप्रूप वाटले.त्यांच्या भेटीतून पार्किन्सन मित्रमंडळामुळे या दोघीची झालेली मैत्री,सुभेदार कुटुंबीयांचे एकमेकातील हृद्य परस्पर संबंध, जोत्स्नाताईंचा पंचाऐंशीव्या वर्षातील मनाचा उत्साह,बुद्धीचा तल्लखपणा,नव्वदीतल्या सुभेदारांचा पार्किन्सन सांभाळताना शुभंकर म्हणून बजावत असलेली चोख भूमिका,दिल्ली पुणे एकटीने केलेला प्रवास विविध वानिताताईंची १०० किलोमीटर पायी नर्मदा परिक्रमा. अशा विविध बाबींचे दर्शन झाले.या सर्वातून सकारात्मक उर्जा मिळाली.

                                मी आधी त्या दोघींना भेटले होते पण त्या दोघी प्रथमच प्रत्यक्ष अशा एकमेकीना भेटत होत्या जोत्स्नाताईंचे माहेर इंदूर.माहेरचे नाव निघाले की बायका हरखुन जातात. जोत्स्नाताईंचे तसेच झाले.वनिताताईंशी त्यांची मैत्री झाली. पार्किन्सनमुळे ती अधिक घट्ट झाली.प्रत्यक्ष भेटीची ओढ होती.ऑक्टोबरमध्ये आठ दिवसासाठी जोत्स्नाताई इंदूरला गेल्या नेमक्या वनिता ताई लंडनला होत्या.भेट झाली नाही दोघींनाही हळहळ वाटली.

                        मला भेटायची आणि एकमेकीना भेटायची दोघींची उत्कट इच्छा होती.वेळोवेळी फोनवर चर्चा होऊन दिवस निश्चित झाला. वनिताताई बाली सहल करून पुण्यात येणार होत्या.त्याचवेळी जोत्स्नाताई आल्या.सुभेदाराना सांभाळायची जबाबदारी केअरटेकरच्या सहाय्याने त्यांचा मुलगा घेणार होता.जोत्स्नाताईं पुण्यात असताना सर्व सभांना हजर असत.एकदा त्यांचा मुलगाही आला होता.वक्त्यांनी अधूनमधून कुटुंबीयांनी स्वत: शुभार्थीची जबाबदारी घेऊन शुभंकराला मोकळीक दिली पाहिजे असे सांगितले होते. जोत्स्नाताईंच्या मुलांनी ते लक्षात ठेवले होते आणि आईला मागे लागून आठ दिवस इंदूरला आणि आता पुण्याला पाठवले होते.नव्वद वर्षाच्या सुभेदार यांना नळीतून अन्न द्यावे लागते.बोलता येत नाही.खाणाखुणा,स्पर्श यांची भाषा.तरीही ते केअर टेकरने करवून घेतलेला व्यायाम आवडीने करतात.जोत्स्ना ताईना जायला त्यांनी मानेनेच होकार दिला.नातू आला तेंव्हा आजोबांचा चेहरा खुलला.त्याला ही आजोबाने आपल्याला ओळखले याचा आनंद झाला.असे काहीना काही जोत्स्नाताई सांगत होत्या.एकीकडे इथला आनंद उपभोगताना सुभेदार त्यांच्या मनात सारखे होतेच. 

                     जोत्स्नाताईनाही दम्याचा त्रास आहे त्यांनी तो योग्य आहार व्यायाम आणि आनंदात राहण्याने आटोक्यात ठेवला आहे.रेसिपी प्रवास,Whats app ग्रुप अशा विविध चर्चा रंगल्या.आमच्या कामवालीने हा आनंद फोटो काढून टिपला.जोत्स्नाताई आमचे दोघींचे हात प्रेमाने धरून बसल्या होत्या.रीक्षातही त्या अशाच हात हातात घेऊन बसल्या होत्या असे वनिताताई सांगत होत्या.मन भरत नव्हते.वनिताताईना सुभेदारांच्या एरंडवण्याच्या घरी थांबून पुढे कोथरूडला जायचे होते.रिक्षाही थांबवली होती.दोघी उठल्या तेंव्हा जोत्स्नाताईनी काठी आणली नाही हे लक्षात आले.तसे ते घरून निघताना लक्षात आले होते.वनिता ताई म्हणाल्या पुन्हा कोठे आत जाता, चला मी आहे तुमची काठी.हे सांगताना दोघींचाही चेहरा फुलला होता.दोघी गेल्या तरी वनिताताईनी आणलेल्या इंदुरी गजगचा आणि सुभेदारांच्या स्वत: बनवलेल्या तिळाच्या वड्यांचा गोडवा रेंगाळत होता.

           May be an image of 3 people and people smiling

Monday 15 January 2024

क्षण भारावलेले - २५

                                                    क्षण भारावलेले - २५

                      करोना नंतर मंडळाचे काम थांबल्यासारखेच होत होते.अतुलनी झूम मिटींगची कल्पना मांडली.आणि ती लगेच अमलातही आणली.झूम मिटिंगचे रेकॉर्डिंग करणे शक्य होते.ते रेकॉर्डिंग यु ट्यूब चॅनेलवर अतुलने घालायला सुरुवात केली.आत्तपर्यंत १४३ व्हिडीओ चॅनेलवर आहेत त्यातील काहीच व्हिडीओ करोना काळापूर्वीचे आहेत.हे व्हिडिवो जसेच्या तसे असल्याने सभेच्या सुरुवातीपुर्वीचे बोलणे त्यात आहे.ते थोडे प्रेझेन्टेबल असावे अशी फार दिवसांची इच्छा होती.हे एडिटिंगचे काम कोण करू शकेल? इतके व्हिडीओ करायचे तर खर्च खूप येईल असे व्यावहारिक प्रश्न होते.मध्यंतरी वृद्धकल्याणशास्त्रतज्ज्ञ रोहिणीताई पटवर्धन यांनी पैशासाठी काम थांबवू नका मी मदत करेन असे सांगितले होते.काही पर्याय शोधलेही पण काहीना काही कारणाने घोंगडे भिजत पडले.आणि आता अतुल ठाकूर यांनी पुढाकार घेऊन काम पूर्ण केले.अशी सुंदर प्रेझेंटेबल कामगिरी पाहून मी भारावून गेले.

                  अतुलनी जबाबदारी घेतल्यावर नमुन्याचा व्हिडिओ करून पाठवला.कार्यकारिणीच्या  सर्वाना तो आवडला.दीपा होनपने सुरुवातीला आणि शेवटी प्रार्थना असावी अशी सूचना केली.अतुलने तर मला वगळता सर्व कार्यकारिणी सदस्यांना शोभनाताईच्या आवाजात काहीतरी असावे अशी कल्पना मांडली.यथावकाश ती माझ्याकडे आली.मला ती फारसी पसंत नव्हती पण अतुलने सर्वांमार्फत  माझ्या गळी उतरवली.मंडळाच्या मासिक सभेत सुरुवातीला 'सर्वे पि सुखिनः सन्तु' ही प्रार्थना म्हटली जायची. पटवर्धन सर खणखणीत आवाजात ती म्हणत आणि सर्व जण त्याला साथ देत.त्यामुळे तीच सुरुवातीला असावी असे ठरले.

                 अतुलनी मागे बासरी किंवा तंबोऱ्याची साथ असावी असे सुचविले.यासाठी डोळ्यासमोर काही नावे होती.योगायोगाने माझा जावई पराग पुण्यात आला.खरे तर तर त्याच्या येण्याला दुःखाची किनार होती.तीर्थळीकाकांच्या मागोमाग सव्वा महिन्यातच माझ्या मोठ्या मुलीच्या सासर्यांचे दुःखद निधन झाले होते आणि तो भेटायला आला होता.बोलता बोलता व्हिडीओसाठी प्रार्थना करायची आहे याबद्दल विषय निघाला.त्यांनी लगेचच भैरव रागातील आत्ता व्हिडीओ असलेली चाल म्हणून दाखवली. त्याच्या आवाजात ती ऐकायला छान वाटली.त्याच्या मोबाईलवर तंबोरा app होते.ते बॅकग्राउंडला ठेऊन प्रार्थना छान वाटत होती.प्रार्थनेसाठी संगीत संयोजक घरातच मिळाला होता.

               मी बरेच दिवसात गुणगुणलेही नव्हते.परागने माझ्याकडून भैरवच्या स्वरांचा रियाज करून घेतला.मला आत्मविश्वास नव्हता.माझी मुलगी देवयानीने साथ केली.प्रार्थना ग्रुपने चांगली वाटते म्हणून परागलाही सामील करून घेतले.घरातच रेकॉर्डिंग करत असल्याने आजूबाजूचा आवाज यायचा.पुन्हा पुन्हा रेकॉर्ड करावे लागले.ट्रायल कार्यकारिणी सदस्याना पाठवली.काहीना माझ्या एकटीच्या आवाजातले आवडले बहुसंख्यांना ग्रुपचे आवडले. अतुलने सुरुवातीला आणि शेवटी अशा दोन्ही प्रार्थना वापरल्या. प्रार्थना  बॅकग्राउंडला आणि  मंडळाचा लोगो,इतर स्लाईड्स एकामागोमाग येत राहतात. शेवटही तसाच.सर्वानुमते शिक्कामोर्तब झाले आणि व्हिडीओ फायनल झाला. 

                गेले काही दिवस घरात उदासीन वातावरण होते.दैनंदिन कामे यांत्रिकपणे केली जात होती.ते साहजिकही होते.प्रार्थनेने हळुवारपणे फुंकर घालून मनाला उभारी दिली होती.देववाणीतील प्रार्थनेचे आणि संगीताचे सामर्थ्य अनुभवास आले.या प्रक्रियेत आम्ही सर्व काही विसरून गेलो एक आत्मिक आनंद मिळाला.

                यापुढे प्रत्येक व्हिडीओ प्रेझेन्टेबल असेल याचा आनंद आहे.

Tuesday 2 January 2024

आगळे नाते

                                                 

                द्वारकानाथ संझगिरींचा क्रीकेटवरील लेख आला आणि सलीलच्या बाबांची प्रकर्षाने आठवण झाली.लगेच तो त्यांना फारवर्ड करायचा परीपाठ होता.ते आपल्यात नाहीत हे अजून मन मानतच नाही.

               सलीलचे बाबा म्हणजे आमचे व्याही डॉ.रामनाथ मालवणकर.सोनालीचे लग्न ठरल्यापासून सलीलचे आईबाबा आणि आम्ही दोघे यात औपचारिक सबंध न राहता मैत्र कधी जुळले कळलेच नाही.लग्नाची काही खरेदी आम्ही एकत्र केली 'हम आपके है कौन' सिनेमा एकत्र पाहिला.

              लग्न ठरल्यावर मी सोनालीला म्हणायची आता थोडा स्वयंपाक शिक.तर ती म्हणायची आता तिथल्या पद्धतीचे तेथे जाऊनच शिकेन.तिला पोळ्या निट येत नव्हत्या सलीलचे बाबा म्हणायचे.चहाबरोबर सोनालीने केलेल्या पोळ्या खाईन डब्यात शोभाच्या नेईन.आता सोनाली स्वयंपाकात इतकी तरबेज झाले की हे त्यांना कोणाला आठवतही नसेल. सलीलच्या बाबांच्या तोंडी सोनालीचे सारखे कौतुक असायचे.त्यांचा शेवटचा फोन झाला त्यावेळीही ते सोनालीबद्दल भरभरून बोलत होते.

                जे आवडले त्याचे तोंडभरून कौतुक ते करत.मग आवडलेला पदार्थ असो किंवा लेखन असो, ह्यांचे ड्रायव्हिंग किंवा आमचे पार्किन्सनचे काम असो.माझा पीएचडीचा थिसीस माझे गाईड आणि रेफरी वगळता फक्त सलीलच्या बाबांनीच वाचला असेल.त्यांनी तो वाचयला मागितला तेंव्हा मला आश्चर्यच वाटले होते.त्यांनी तो बारकाईने वाचला.कौतुकही केले.त्यांचे संशोधन प्रयोग शाळेतले.सामाजिक शास्त्रांचे संशोधन कसे होते याबद्दल त्यांना कुतूहल होते. इतर वाचनातही काही शब्दांचे अर्थ,संकल्पना समजली नाही तर ते मला नि:संकोचपणे विचारायचे.

                ते संशोधक असले तरी मनाने हाडाचे शिक्षक होते.निवृत्तीनंतरही चाटे क्लासमध्ये शिकवायचे क्षितिजच्या घडणीतही त्यांच्यातल्या शिक्षकाचा मोठ्ठा वाटा आहे.आमच्या नात्यातील कोणी दहावी बारावीला असले तर ते आवर्जून उपयोगी कात्रणे द्यायचे.

              त्यावेळी मोबाइल नव्हते whatsapp नव्हते. प्रत्यक्ष भेटी व्हायच्या. सलीलचे आईबाबा आणि आम्ही दोघे मिळून नाशिक त्र्यंबकेश्वर,महाबळेश्वर अशा सहली केल्या.ड्रायव्हर असायचे सोनालीचे बाबा.ह्यांच्या अशा सहलीतून ही आम्ही अधिक जवळ आलो.पुण्यात आमची घरे दोन टोकाला त्यामुळे जंगली महाराज रोडवर कोणते तरी हॉटेल,नॅचरल आईस्क्रीम अशा ठिकाणी आम्ही एकत्र भेटायचो.फोन मोबाइल आले आणि भेटी कमी झाल्या.

                क्रिकेटची मॅच असली की दोन्ही व्याह्यांच्या त्याबाबत गप्पा व्हायच्या.आताशा ह्यांना पार्किन्सनमुळे बोलण्याचा प्रॉब्लेम होता.सलीलच्या बाबांना ऐकू येत नव्हते.दोघांच्यामध्ये बोलण्यासाठी मी मध्यस्त असायची.

              बर्याचदा वडील आणि मुलगा यांच्यात दोन पिढ्यांचे अंतर असल्याने कदाचित जमत नाही.सलील आणि त्याचे बाबा याला अपवाद होते.त्यांच्या नात्याचे मला नेहमीच कौतुक वाटले.एकुणातच त्यांचा सौम्य स्वभाव सर्वांशी जुळवून घेण्याचाच होता.

             आज ते नसले तरी त्यांच्या सुखद आठवणी मनात रेंगाळतच राहतील.