Monday 17 July 2017

प्रज्ञा जोशी



आमच्या सर्वांची लाडकी शुभार्थी प्रज्ञा जोशी हिला पार्किन्सन्स मित्रमंडळाकडून वाढदिवसाच्या खूपखूप शुभेच्छा!.
मागच्या वर्षी तिचा वाढदिवस कार्यकारिणीच्या सर्वांनी मिळून दीपाच्या घरी साजरा केला होता.ती नुकतीच आजारातून उठली होती आणि सर्वाना घरी या असा आग्रह करत होती.तिला काहीतरी निमित्त काढून गुजराथी पद्धतीच्या पाककृती करून खायला घालायला खूप आवडते.मिटिंग सहल यावेळी मोठ्या डब्यातून काहीतरी आणेल,डान्स क्लासमध्ये काहीतरी करून नेईल,देणे समजाचे प्रदर्शन तर तिच्या घरासमोर.त्यामुळे रोजच चहा आणि काहीतरी खायला घेऊन यायची. तिला किती नको म्हटल तरी ती ऐकत नाही.नृत्योपाचारावर हृषीकेशनी फिल्म बनवली तिचे चित्रण हिच्या घरी दिवसभर झाले होते.त्या सर्वांचाही हाच अनुभव होता.हे विस्ताराने सांगायचे कारण तिला पार्किन्सन्समुळे अनैच्छिक हालचालींचा त्रास होतो.तिच्याकडे पाहिल्यावर तिला स्वत:चा ३५ किलो वजनाचा जीव सांभाळता आला तरी खूप झाले असे वाटते.यावेळी मात्र आम्ही सर्वांनी वेगळा घाट घातला.तिचे पती नलीन आणि ती दीपाकडे आले होते.एकूण प्रकाराने ती खूपच भारावून गेली.मला मिठी मारून खूप रडली.
तिच्या पहिल्या भेटीत ती अशीच मिठी मारून रडली होती. पण या दोन्ही स्पर्शात आणि रडण्यात जमीन अस्मानाचा फरक होता.ती अनेक वेळा मला मिठी मारून रडली आहे प्रत्येक वेळचा अर्थ वेगवेगळा असतो कधी खूपखूप प्रेम, कधी कृतार्थता,कधी कृतज्ञता,कधी उगाच लाडात येणे,कधी खूप दिवसांनी भेटल्याचा आनंद,पण आता पहिल्या वेळचे नैराश्य मात्र कधीच नसते.
प्रज्ञाला ४५ व्या वर्षी पीडीचे निदान झाले.तिच्या भावालाही पीडी होता.त्याची खूपच वाईट अवस्था तिने पाहिली होती.आपले ही असेच होईल या कल्पनेने ती घाबरली होती. जीव द्यावा असे वाटत होते.मंडळात सामील झाल्यावर मात्र चित्र बदलले.कोथरूड विभागाची ती समन्वयक बनली.प्रज्ञा  म्हणजे सळसळता उत्साह असे समीकरण झाले.मित्रमंडळाच्या सर्व कामात तिचा हिरिरीने सहभाग असतो.मेळाव्यातील अनुभव कथन,प्रार्थना आणि नृत्यात सहभाग,स्मरणिकेत लेखन. असे सर्व काही तिने केले आहे.हल्ली तिला सभासदांना फोन करायचे काम देत नाही तर तिला राग येतो.
नृत्योपाचारातील ती पहिल्या पासूनची सदस्य आहे.तिने आपल्या लेखात आपले अनुभव सांगितले.ती ,"नृत्योपचार उपक्रमामुळे माझ्या आयुष्यात आमुलाग्र बदल झाला.हालचाल ,बोलणे, चालणे अशा प्रत्येक गोष्टीत गुणात्मक फरक झाला.शरीराचा ताठरपणा कमी कमी होत गेला.घरकामात, स्वयंपाकात व्यवस्थितपणा आला.तिसर्‍या मजल्यावरील माझ्या फ्लॅटमध्ये मी सामान घेउन एकटी चढु -उतरु लागले.पुण्याच्या गर्दीच्या रस्त्यात बसमधे एकटी जाऊ लागले.मानसिकतेत सकारात्मक बदल झाला सर्वच शुभार्थीना सांगितलेल्या हालचाली लगेच जमतात असे नाही.पण मैथीली आणि ऋषीकेश न चिडता न कंटाळता पुनःपुन्हा हालचाली दाखवून करुन घेतात.असे तरुण हसतमुख  प्रेमळ .नृत्य शिक्षक मिळाले आम्ही भाग्यवान आहोत."हृषिकेशने तयार केलेल्या फिल्ममध्ये हे अनुभव प्रत्यक्ष पाहताही येतील.
एकदा मी फोन केला असता तिचे पती नलीन म्हणाले अधिक महिन्यासाठी भागवतला गेली आहे. मी विचारले ऐकायला का? तर ते म्हणाले नाही तिच वाचून दाखवते.तासभर असे वाचन करायची ताकद हिच्यात कुठून येते याचे मला आश्चर्य वाटते.पीडी पेशंटना साडी नेसणे म्हणजे कसरतच पण ही रोज साडी नेसून जायची याबद्दल नलीन तक्रार करत होते.मी म्हटले चांगले आहे की? त्यावर ते म्हणाले,'हो पण तिला घडी कुठे करता येते ती मलाच करावी लागते'.भागवत वाचताना ड्रेस घालणे तिला मान्य नसावे कधी कधी तीच्या धर्मिकतेत कर्मकांडाचा अतिरेक होतो यात खाण्यापिंयची बंधने जाचक असतात.यासाठी मात्र आम्ही तिला रागावतो. आधीच तोळा मासा तब्येतीवर याचा परिणाम होतो.
तिच्या प्रकृतीत सारखे चढ उतार असतात.चिमणीने  प्रयत्नाने घरटे बांधावे आणि क्रूरपणे कोणी ते पाडावे .तिने पुन्हा बांधावे असे तिच्या तब्येतीबद्दल चालते.तिच्या चिकाटीला पीडीसह आनंदी राहण्याच्या प्रयत्नाला सलाम करावासा वाटतो.
प्रज्ञा तुझ सर्व काही चांगले आहे पण ती कडक बंधने मात्र कमी कर.तुला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा!


Sunday 2 July 2017

आठवणीतील शुभार्थी - जे.डी.कुलकर्णी

                            
         मित्रमंडळाच्या सभेला पंचमीकडून शिवदर्शनकडे जाताना शालीमार सोसायटी लागते.जे.डी.ना जाऊन सात वर्षे झाली तरी अजून तेथे पोचल्यावर त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.तेथे ते आमची वाट पाहत बाहेर उभे असायचे.कोठेही जाताना त्याना नेणे आणि पोचवणे हे काम आमच्याकडे असे.गाडीत पूर्ण वेळ ते भरभरून बोलायचे आणि आम्ही फक्त ऐकायचे काम करायचो त्यांच्या असण्यानेच वातावरणात चैतन्य निर्माण होत असे.हे चैतन्य अनुभवाच्या मुशीतून तावून सुलाखून निघाल्यावर निर्माण झाले होते.
                                     आत्मविश्वास गमावलेली व्यक्ती कुटुंबीयांच्या मदतीमुळे इतरांचा शुभंकर होण्याइतकी वर येते याचे जितेजागते उदाहरण म्हणजे जे.डी.कुलकर्णी. आम्ही सर्व त्यांना जे.डी.च म्हणायचो.   मी हेकेखोर, आडमुठा आहे असे ते स्वतःच सांगायचे त्यांचा शुभंकर होण म्हणजे  सुळावरची पोळी.जेडींच्या मित्रमंडळाच्या स्मरणिकेतील लेखातून आणि सकाळच्या मुक्तपीठ पुरवणी मधील लेखातून त्यांच्या या प्रवासाबद्दल समजले. पीडीमुळे कंप सुरु झाला. सही करता येइनाशी झाली..प्राध्यापक असणार्‍या जेडीना शिकवताना फळा वापरता येईनासा झाला पण अ‍ॅलोपाथीचे उपचार घेण्यास तयार नव्हते.आणि हे गळी उतरवणे कुटुंबियाना कठीण होते..ते लिहितात.
                        'पार्किन्सन्स व्याधीने माझ्यावर झडप घातली आणि ब्रह्मांड आठवले.......मी पूर्णपणे परावलंबी, गलितगात्र झालो.अंघोळ घालण्यापासुन, खायला घालण्यापर्यंत सर्व गोष्टी दुसर्‍याकडून करुन घ्याव्या लागत होत्या" अशा अवस्थेत एक वर्षाचा काळ लोटला..त्याना भयगंडाने पछाडले.जगण्याची उमेद नाहीशी झाली घरचे आणि नातेवाईक न्युरॉलॉजिस्टकडे नेण्यात यशस्वी झाले. नकारात्मक दृष्टिकोन घेऊनच ते डॉक्टरकडे गेले.पण औषधोपचाराने हळूहळू बरे वाटू लागले.व्यक्तिगत व्यवहार करता येऊ लागले.पण आत्मविश्वास गमावलेलाच होता.पण कुटूंबियानी हे काम चोख केले. वेळोवेळी त्यांच्यावर जबाबदार्‍या टाकून त्या पूर्ण करुन घेतल्या.घरात फिरताना आधार लागणारे ते स्वतंत्रपणे बाहेरही फिरु लागले.नव्या जोमाने लिहू लागले,संगणकावर अकांउटसची कामे करु लागले.सहीसुद्धा करता न येणारे जे.डी.स्वतःच्या हस्ताक्षरात वृत्तपत्राना लिखाण पाठवू लागले. या सर्वाचे श्रेय ते कुटुंबियांच्या सकारात्मक दृष्टिकोनाला देतात.आजारामुळे.मानसिकदृष्ट्या खचलेल्या शुभार्थिला बाहेर काढण्यासाठी.त्यात तो आडमुठा असेल तर फक्त सहचराची शक्ती पुरेशी नाही तर सर्व कुटुंबियानी यासाठी हातभार लावायला हवा हे जेडिंच्या कुटुंबाने दाखवून दिले.पार्किन्सन्स मित्रमंडळात सामिल झाल्यावर याच जेडिनी पुढे घरोघरी भेटी देऊन मानसिक स्वास्थ्य हरवलेल्या शुभार्थीना आणि त्यांच्या कुटुंबियाना नैराश्येच्या गर्तेतुन बाहेर काढण्याच मिशन मोठ्या हिरीरीने हातात घेतल.
                      मित्रमंडळाच्या सभेतील भेटी अपुर्‍या वाटल्याने त्यानी विलास जोशीना बरोबर घेउन घरभेटी सुरु केल्या.या सर्वातुन त्याना आढळले, खर तर शुभंकराची भुमिका मध्यवर्ती आहे पण शुभंकरांकडून ती तकलादु आणि प्रासंगिक स्वरुपात वठवली जात आहे.याबाबतचे त्यांचे विचार त्यानी पुन्हा सकाळच्या मुक्तपीठ मधून लिहिले.शुभंकरासाठी आधारवड हा सुंदर शब्द त्यानी वापरला.आधारवडानी कोणत्या गोष्टीचे भान ठेवले पाहिजे याबाबत त्यानी लेखात विवेचन केले. ( त्यांचे सर्व लेख याथावकाश देत आहे.ते मुळातूनच वाचावेत).'कीव न करता जीव लावा" हा संदेश यातून त्यांनी दिला.
                        मंडळाचे काम आपल्या लिखाणाद्वारे अनेकांपर्यंत पोचविण्यात त्यांचा मोठ्ठा वाटा होता.त्यांच्या लेखामुळे अनेक शुभार्थीच्या  मनात सकारात्मकता आणि चैतन्य निर्माण झाले.पुण्याप्रमाणे परगावचे शुभार्थीही जोडले गेले.'आधी केले मग सांगितले' हा त्यांचा बाणा असल्याने आणि बोलण्यात लिखाणात तळमळ असल्याने त्यांचे विचार मनात ठसत. स्वानुभवावरून त्यांनी                      
' स्वसंवाद, परिसंवाद'या स्मरणिकेतील लेखात 'दिसामाजी काहीतरी ते चालावे ' असे मत नोंदवले आहे त्यांच्या घरभेटीत शुभार्थी व्यायामाचा कंटाळा करतात असे जाणवल्याची तक्रारही केली आहे.ते स्वतः रोज तीन किलोमिटर चालत.
                      काही बाबतीत त्यांची मते ठाम असत.डॉक्टरांची व्याख्याने ठेवण्यास  त्यांचा सक्त विरोध असायचा.पीडीबाबत शुभंकरनी माहिती ठेवावी आणि शुभार्थीनी ठेऊ नये..असे त्यांचे मत होते.त्यांचे हे म्हणणे नाकारून आम्ही व्याख्याने ठेवायचो.मग ते बाहेर बसून नाव नोंदणीचे काम करत. व्याख्यान ऐकणे टाळत.
                      मंडळाची पहिली सहल गेली त्यावेळी ते अनेक दिवसानी सहलीसाठी बाहेर पडले होते.सहल अपेक्षेपेक्षा खूपच यशस्वी झाली.त्याबाबत किती सांगू आणि किती बोलू असे त्यांना झाले होते. घरी पोचल्या पोचल्या त्यांनी एक हाती लेख लिहून सकाळला पाठवला. लगेच तो छापूनही   आला .अनेक पेशंट लेख वाचून फोन करत,घरी भेटायला येत.मग त्यांचा कामाचा उत्साह अधिकच वाढत असे.
                     ११ एप्रिल १०च्या जागतिक पार्किन्सन दिनानिमित्त मेळाव्यात स्मरणिका प्रकाशीत करायचे ठरले.संपादक मंडळात जे.डी. होतेच पहिली सभा त्यांच्याच घरी झाली.त्यांना सगळ्याची घाई असे.त्यांनी एक चांगला दिवस निवडला होता.त्यादिवशी प्रिंटर निवडून सुरुवात करायला हवी असे त्यांना वाटत होते. त्यांनी लगेच स्वत: लेख लिहूनही दिला.काम सुरु होण्यापूर्वीच त्यांना हॉस्पिटल मध्ये ठेवल्याचे कळले.त्यांच्या इतर काही शारीरिक तक्रारीसाठी औषधे घेणे,शस्त्रक्रिया करणे हे गरजेचे होते.पण त्यांचा हट्टीपणा आड आला. त्यांनी ते नाकारले.परिणाम व्हायचा तोच झाला.त्यांना ICU त ठेवले होते.आम्ही भेटायला गेलो तर त्यांची पत्नी म्हणाली,'त्यांचे महत्वाचे अवयव निकामी झालेत.मेंदू  मात्र शाबूत आहे.'त्यांना खूप काही लिहायचे होते.संत साहित्याच्या आधारे सकारात्मक विचार सांगायचे आहेत. असे ते म्हणाले होते.आपल्या पंचाहत्तरीला त्यांनी माझ्याक्डून हक्काने तुकाराम गाथा  घेतली होती.बघा  मी आता कसा छान उपयोग करतो असं म्हणाले होते.पण ते व्हायचे नव्हते.
                    एप्रिल १० च्या स्मरणिकेत जे.डींचा लेख होता.आणि त्यांना श्रद्धांजलीही.मेळाव्यात ते मनोगत व्यक्त करणार होते.पण त्याऐवजी त्यांच्या मुलाने आपल्या भावना व्यक्त केल्या.त्यांच्या आठवणीने सर्वच भावूक झाले. मंडळाचा व्याप वाढत असताना जेडी तुमची सतत आठवण येते.