Friday 25 December 2015

phulgav sahal

      १० डिसेंबर २०१५ रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाची सहल,फुलगाव येथील' इन्व्हेस्टमेंट इन मॅन ट्रस्ट'येथे  गेली होती.४० वर्षापासून ते ८२ वर्षापर्यंतच्या .३६ शुभंकर शुभार्थिनी  सहलीत सहभाग घेतला यावर्षी  प्रथमच दिवसभराची सहल होती.अश्विनी हॉटेलमध्ये नऊ वाजताच मंडळी जमायला सुरुवात झाली.श्री दत्तात्रय जोशी यांनी सोनचाफ्याच्या फुलापासून तयार केलेले खास नैसर्गिक अत्तर सर्वाना लावले आणि वातावरण सुगंधित केले.अरुंधती जोशी,अंजली महाजन. सर्वाना बिल्ले देण्याचे काम करीत होत्या. प्रफुल्ल उपलप अंजली उपासनी या नव्याने  सामील झालेल्या स्वयंसेवकानी. अगदी वेळेत आलेल्या व्यक्तीना बसमध्येच बसवले आणि त्यांच्यापर्यंत बिल्ले पोचवले.
बसमध्ये माईक असल्याने सूचना देणे सोपे गेले. दिवसभराच्या कार्यक्रमाची रूपरेषा रामचंद्र करमरकर यांनी सांगितली.सुरुवातीला आणि प्रत्येक थांब्यावर हजेरी घेण्याचे काम अंजली करत होती.वय आणि पार्किन्सन्स विसरून सर्वांनी सहलीचा आनंद लुटा.हे अंजलीचे आवाहन सर्वांनी मनावर घेतेले.अंत्याक्षरी खेळता खेळता कधी फुलगाव आले समजलेच नाही.
तेथे चहाची व्यवस्था केलेली होती.शुभार्थी सुशील श्रॉफ यांच्या पत्नी प्रथमच मंडळाच्या उपक्रमात सामील झाल्या होत्या.त्यांनी ढोकळा करून आणला होता.सर्वाना देण्यासाठी द्रोणही चहापान करून लगेचच तुळापुर येथील संगमेश्वर मंदिर आणि संभाजीची समाधी  पाहण्यासाठी सर्व रवाना झाले.केशव महाजन हे फुलगाव येथेच थांबले. त्यांच्या बरोबर प्रफुल्ल उपलप थांबल्याने अंजली महाजन तुळापुरला येऊ शकल्या.भीमा भामा आणि इंद्रायणीच्या संगमावर असल्याने येथील शिवमंदिराला संगमेश्वर मंदिर नाव पडले.देऊळ प्राचीन आणि हेमाडपंती शैलीतील आहे.परिसर सुंदर आहे.नव्वद सालानंतर निरगुडकर फौंडेशनने मंदिराचा जीर्णोद्धार  केला.संभाजीमहाराजांची समाधी त्या भोवती ऐतिहासिक दृश्ये दाखवणारी पेंटिंग होती.खाली पायर्या उतरून गेल्यावर नदीचा संगम आहे.ज्याना शक्य आहे ते सर्व तेथे जाऊन आले.परिसरात ताक,ताज्या भाज्या विकावयास बसले होते. स्वस्त ताज्या भाज्या अनेकांनी घेतल्या.
जेवणासाठी सर्व मुळ मुक्कामी आले.पाने वाढून तयारच होती.भाकरी,पोळ्या,भरल वांग,झुणका,शेवग्याच्या शेंगा घातलेली आमटी,भाजलेला पापड,दाण्याची चटणी आणि गुलाबजाम असा बेत होता.गरम गरम चुलीवरून ताटात भाकर्या येत होत्या.प्रेमाने आग्रहाने वाढले जात होते.
जेवणानंतर हॉलमध्ये खेळ आणि करमणुकीच्या कार्यक्रमासाठी व्यवस्था केलेली होती.गाडीनेच तेथे सर्वाना सोडण्यात आले.जेवणाच्या ठिकाणी आणि या हॉलमध्येही शुभार्थीसाठी आमच्या मागणीनुसार संस्थेने चार कॉट  तयार ठेवल्या होत्या.अनेकाना अशी गरज लागेल असे वाटले होते. परंतु केशव महाजन आणि डीबीएस सर्जरी झालेले सुरेश सिधये वगळता कोणाला आडवे पडण्याची गरज वाटली नाही.
खेळण्यास सुरुवात झाली.शुभार्थी श्री. चंद्रकांत दिवाणे आणि विजया दिवाणे यांनी लेखक ,कलाकार ओळखा असा खेळ तयार करून आणला होता.कागदावर उत्तरे लिहायची होती.सर्वांनी उत्साहाने भाग घेतला.शरच्चंद्र पटवर्धन याना प्रथम आणि शोभना तीर्थळीयाना द्वितीय क्रमांक मिळाला.

स्वत:च्या हस्ताक्षरात खेळ तयर केल्याने प्रथम द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांबरोबर दिवाणेनाही बक्षीस देण्यात आले.यानंतर मोडक यांनी रिंग टाकण्याचा खेळ आणला होता पाच बक्षिसेही आणली होती.त्यातही सर्व शुभार्थिनी सहभाग घेतला.महेंद्र शेंडे प्रथम,शिल्पा कुलकर्णी द्वितीय,shri गायाल तृतीय,यशवंत एकबोटे आणि विजया मोघे याना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.शरच्चंद्र पटवर्धन यांनी यानंतर ओरीगामिसाठी तयार करून आणलेले कागद देण्यात आले.शैलजा कुलकर्णी आणि विजया दिवाणे यांचा पहिला आणि दुसरा क्रमांक आला.
अंजली महाजनने काही शुभंकर शुभार्थीवर कविता करून आणल्या होत्या.त्या व्यक्ती ओळखायच्या होत्या.या खेळानेही गंमत आणली.आता चहा आला होता.चहा घेता घेतां करमणुकीचे कार्यक्रम करण्यात आले.
विजया मोडक यांनी भक्तीगीत,अंजली महाजनने विडंबन गीत,श्रद्धा भावे आणि आशा रेवणकर,रमेश घुमटकर यांनीही विनोदी कविता चुटके सांगितले.अंजली उपासनी यांनी केळीच्या पानात जेवण्याचे विशेषत: पीडी पेशंटना होणारे फायदे सांगितले नोव्हेंबर महिन्यातील मंडळाच्या कार्यक्रमासाठी विठ्ठलाची गाणी कार्यक्रम सादर केलेले महेंद्र  शेंडे सहलीस आवर्जून आले होते.त्यांच्या महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. गीताला सर्वांनी साथ दिली.
परतीची वेळ झाली होती. वाटेत स्वरूपानंद यांचा आश्रम आहे.तो पाहून बस पुण्याकडे परतली.परतताना अंत्याक्षरीऐवजी श्री. मोडक यांनी जुनी हिंदी गाणी आणली होती.ती लावली.ठेका धरायला लावणाऱ्या त्या गाण्यावर अंजली महाजन आणि अंजली उपासनी यांची पावले चालत्या बसमध्येच थिरकायला लागली.सहल संपत आली तरी मने अजून मागेच रेंगाळत होती.अनेक दिवसांसाठी उर्जा घेऊन मावळतीच्या  आतच सर्व पुण्यात पोहोचले.
तस 
लतर 






Friday 4 December 2015

पार्किन्सन्स न देखे सान पार्किन्सन्स न देखे थोर

           

                                      
                                          पार्किन्सन्स न देखे सान (बालवयातील पार्किन्सन्स )
                           नुकतेच  बालवयात पीडी झालेल्या एलीसाचे अनुभव दिले होते.पार्किन्सन्स मित्रमंडळात काम करतानाही बालवयात पीडी झालेले पेशंट आढळले. 

                            ११ एप्रिल च्या पार्किन्सन्स दिनानिमित्त मी दैनिक केसरीमध्ये 'पार्किन्सन्सला दिली ओसरी' नावाचा लेख दिला होता.तो वाचून दिवाकर सोनावणे नावाच्या मुलाच्या आईचा फोन आला होता.त्या शेतकरी कुटुंबातील होत्या.दिवाकरला १२व्या वर्षापासून पार्किन्सन्स आहे अस त्या म्हणत होत्या.त्यांचा फोन मी लिहून घेतला होता.त्या पुंण्याला होणार्‍या सभेला येणार होत्या.स्वारगेटपासून कस यायचं हेही त्यांनी विचारून घेतलं होत.त्या आल्याच नाहीत.त्यांनी दिलेल्या फोनवर फोन लागत नाही.परंतुत्यांच्याकडे माझा फोन असल्याने कधीतरी पुन्हा फोन येईल म्हणून मी वाट पाहतेय.
                          बालवयात पीडी झालेली एक मुलगी मात्र बाबा आमटेंच्या आनंदवनात प्रत्यक्ष भेटली.तीच नाव मंजुळा वारकूजी झिंगटे.डॉक्टर भारती आमटे यांनी तिची गाठ घालून दिली.आनंदवनातील शिलाई विभागात ती काम करत होती.पाहिल्यावर पेशंट वाटलीच नाही.आनंदवनात आली तेंव्हा तिचे सर्व अंग हलत होते.भारती ताईनी इथ आलीस तेंव्हा कशी होतीस सांग अस म्हटल्यावर तिने थोडे वाकून सर्व अंग हलवून दाखवले.तिच्या आईवडिलांनी कसलीतरी बाधा झाली असावी या कल्पनेने अंगारे धुपारे केले.काही फरक पडण शक्यच नव्हत. मग अपंग म्हणून इथ आणून सोडले.भारतीताईनी तिला वर्ध्याला सेवाग्राम हॉस्पिटलमध्ये पाठवल तेंव्हा तिथल्या एम.एम.पाटील या न्युरॉलॉजिस्टनी पार्किन्सन्सच निदान केल.तिला लगेच सिडोपाच्या गोळ्याही सुरु केल्या.तीच अंग थरथरण थांबल.मंजुळाच्या मते आधी तिला खूप गोळ्या होत्या.डॉक्टर म्हणाले तुला आयुष्याबर गोळ्या घ्यायच्या आहेत तेंव्हा हळूहळू गोळ्या कमी करत आता ११० mg ची सिंडोपाची एक गोळी आहे.मला विश्वासच बसत नव्हता.तिने सेवाग्रामच प्रिस्क्रिप्शन दाखवलं.तिच्या डॉक्टरांना याबाबत नीट विचारावस वाटलं पण ते बदली होऊन दुसरीकडे गेले होते.मंजुळाच्या सांगण्यावरून ते तिच्या केसमध्ये  खूपच रस घेत होते.
                  आज .मंजुळा २९ वर्षाची आहे तीला १२व्या वर्षी पीडी झाला असे गृहीत धरल्यास तिला १७ वर्षे पीडी आहे.ती १८व्या वर्षापासून म्हणजे११ वर्षे गोळ्या घेते.पण अजूनही १च गोळी आहे.गोळ्या वाढलेल्या नाहीत.आनंदवनातल्या वातावरणात मिळणार्‍या सकारात्मक उर्जेचा परिणाम असावा का? असे मला वाटून गेले.मंजुळाचा आनंदवनच्या ऑर्केस्ट्रात काम करणार्‍या मुलाबरोबर प्रेमविवाह झाला.काही दिवसांनी तिच्या नवर्‍यानी आनंदवन सोडलं हीपण त्याच्याबरोबर सासरी गेली.आनंदवनाच्या वातावरणात वाढलेली ती सासरी रमू शकली नाही.ती एकटीच आनंदवनात परतली.इथ तिच्यावर योग्य औषधोपचार होतात.
                   मला मंजुळाचा फोटो काढायचा होता.ती म्हणाली ताई उद्या काढा ना.फाईलही दाखवायला आणीन.दुसर्‍या दिवशी ती नटूनथटून आणि असतील नसतील तेवढी कागदपत्रे घेऊन आली.पुनःपुन्हा ती तिच्या अपंगत्वाचा दाखला दाखवत होती.अपंगत्वाच्या नावाखाली तिला येथे प्रवेश मिळाला होता प्रत्यक्ष पाहताना मात्र ती अपंग वाटत नव्हती.कदाचित अपंग नाही म्हणून जा म्हणतील अशी तिला भीती वाटत असावी मंजुळाचा मोबाईलवर काढलेला फोटो सोबत दिला आहे.
               

                    
                                    





दुसरी २० वर्षापूर्वी पीडी झालेली व्यक्ती म्हणजे राजकुमार जाधव.आज ते ६० वर्षाचे आहेत.ऑफिस बॉय म्हणून एका ठिकाणी काम करतात.२/३ वर्षे मी त्यांना भेटायचा प्रयत्न करत होते.फोनवर नेहमी बोलण व्हायचं.त्यांच्या मते त्यांच्या आईला पार्किन्सन्स होता त्यांनी आईची खूप सेवा केली.१९व्या वर्षी स्वत:ला लक्षणे दिसायला लागल्यावर लग्न न करण्याचा निर्णय घेतला.त्याना कंप आहे.ते कोणताच उपचार  घेत नाहीत.न्युरॉलॉजिस्टलाही त्यांनी दाखवलेला नाही.त्याना पीडीच आहे का याबद्दल मला शंका वाटली.
                       २६ मेच्या TNN मध्ये १५ वर्षाच्या मुलावर DBS सर्जरी केल्याची बातमी होती वडोदराच्या या हितेषु दवे या मुलाला १२ व्या वर्षीच पार्किन्सन्सच निदान झाल होत.
पीडी हा वृद्धांचा आजार अस म्हटलं जात असल तरी बालवयातील आणि तरुण वयातील पीडी केसेस आढळू लागल्या आहेत.आमच्या सभासदत तरुण वयात पीडीझालेल्यांची संख्या २०/२५ तरी आहेच त्यावर ही लिहायचच आहे.