Tuesday 7 February 2023

आठवणीतील शुभार्थी - रमेश रेवणकर

May be an image of 3 people and people standing                                             आठवणीतील शुभार्थी - रमेश रेवणकर

                         शुभार्थी रमेश रेवणकर यांना जाऊन बघता बघता वर्ष झाले.त्यांच्यासारखी असामान्य माणसे पार्किन्सनमित्रामुळे आमच्या जीवनात आली.त्यांच्या बाबतीत मात्र पीडी त्यांचा मित्रही नव्हता आणि शत्रूही नव्हता किंबहुना तो त्यांच्या खिजगणतीतही नव्हता.

                 २००८ सालच्या दिनानाथ हॉस्पिटलमधील मेळाव्याला ते एकटेच गेले होते.त्यानंतर मात्र मंडळाकडे त्यांनी ढुंकूनही पहिले नाही.उलट आपली पत्नी आशालाही म्हणाले तू आली नाहीस तरी काही फार काही मीस केले नाहीस.

                  नंतर न्यूरॉलॉजिस्ट राहुल कुलकर्णी यांनी ग्रुपमध्ये सामील होण्याचा सल्ला दिला.सभा अटेंड केल्या. कोणत्याही गोष्टीचे पटकन आकलन होणाऱ्या आशाला परिस्थितीचे पटकन आकलन झाले. आपल्या सहचर्यासारखा  पार्किन्सनही समजायला कठीण,गुंतागुंतीचा, हटके आहे हे लक्षात आले.विवाहाला ३६ वर्षे झाली होती.आपल्या हटके पतीला कसे हाताळायचे हे चाणाक्ष आशाला जमले होते.आता बेभरवशी पीडीला समजून घेण्यासाठी पार्किन्सन मित्रमंडळासारखा स्वमदत गट पीडीसह पतीला हाताळण्यासाठी अधारभूत ठरेल हे तिच्या लक्षात आले. 

                    पार्किन्सन्स मित्रमंडळात सामील झाल्यावर तिच्यात खंबीरपणा आला. इतर शुभार्थी शुभंकरांना ती खंबीर बनवू लागली.ही प्रक्रिया हळूहळू पण सहजपणे झाली. ती मंडळात सामिल होऊन थांबली नाही तर मंडळाच्या कामात तिने स्वत:ला झोकून दिले.ती ट्रस्टची कार्यवाह बनली.पुढे जाण्याआधी  मी त्याना असामान्य का म्हटले हे सांगणारा रेवणकर यांचा जीवनप्रवास समजून घेऊ.

                    रमेश यांनी डिप्लोमा इन मॅकेनिकल इंजिनिअरिंग केले.त्यानंतर चेन्नई येथून AMIE केले.२२ व्या वर्षापासुन नौकरी ला सुरुवात केली.२८ व्या वर्षी टेलको कंपनी जॉईन केली. J.R.D.Tata त्यांच्यासाठी रोल मॉडेल होते. दैवत होते.रमेश यांच्या घराच्या दिवाणखान्यात त्यांचा फोटो आहे.फोटोबरोबर "No success or achievement in material in material terms is worthwhile unless it serves the need or interest of the country and its people and is achieved by fair and honest means." असे कोटेशन आहे.प्रत्यक्ष आयुष्यात ते असेच जगले.

                  वयाच्या ६० वर्षा नंतर निवृत्त झाले. टेल्कोचे नाव तेव्हां 'टाटा मोटर्स' झाले होते. सुरवातीला मशीन शॉप व नंतर सेफ्टी डिपार्टमेंट मधून निवृत्त झाले.

                   घरातून फॅक्टरीला जाताना बस मध्ये ब्रिज खेळायला सुरुवात झाली आणि दोन वेळा नॅशनल winner झाले.टाटा मोटर्सचे executive डायरेक्ट श्री.प्रकाश तेलंग आणि रमेश वर्षातून एकदा कंपनीच्या वार्षिक tournament मध्ये ब्रिज खेळायचे पण कधीही पाहिल्या तीन क्रमांकाने जिंकणे सोडले नाही.तेलंग त्यांचे फॅमिली फ्रेंडच झाले.
                    टाटा मोटर्स मध्ये ब्रिज या खेळाला प्राधान्य मिळवून देण्यासाठी बरेच प्रयत्न केले व ते तडीस नेलेही .  "फेस ऑफ टाटामोटर्स ब्रिज" म्हणुन त्यांची ओळख झाली.
ऑनलाईन ब्रिज खेळत असताना पार्टनरने बडबड केली तरी ते शांतपणे खेळून डाव संपल्यावर, कुठले सिस्टीम मध्ये कुठल पान, केलेली बिड, त्यावर केलेला कयास सगळ व्यवस्थित आणि शांतपणे समजाऊन सांगत असत.
                    नॅशनल लेव्हलचे tournament असले, उतरलेले हॉटेल वेन्यु पासून लांब असले तर टूर्नमेंट मधे भाग घेतलेल्या बायकांना त्यांच्या बरोबर जायला सुरक्षित वाटते असे त्या त्यांच्या पतीला फोन करून सांगत असत. आणि पती आपल्याला आपल्या पत्नीने ब्रिज खेळायला शिकवले हे ते खूप अभिमानाने सांगत असत.
                        फॅक्टरी मध्ये safety department मध्ये असो की ग्रोथ डिव्हिजन मध्ये ते अजातशत्रू होते. रिटायर्ड झाल्या नंतर देखील बरेच जण कामासाठी सल्ला घेत असत.
कंपनी मध्ये कशा प्रकारच्या अपघात झाला तर आधी माणसाची सुरक्षिततेबाबत काळजी घेऊन नंतर कायदेशीर कारवाई करताना त्यातील शाखा , उप शाखा , त्यात कोणते पॉईंट्स आहेत, हे सगळे त्यांच्या स्मरणात फिट बसलेले असे. 
                       पार्किन्सन्सचे निदान झाले तेंव्हा मित्रांना वाटले आता ते ब्रिज खेळू शकणार नाहीत.पण त्यांची इच्छाशक्ती,जिद्द जबरदस्त होती. पार्किन्सन्स त्यांच्या क्षमतेवर परिणाम करू शकला नाही.पुण्यात आणि .पुण्याबाहेर ते सातत्याने ब्रिज खेळण्यासाठी जात राहिले.
                      रमेश रेवणकर सहभागी आहेत म्हणजे विजय ठरलेला असेच समीकरण या क्षेत्रात होते. हळहळू पुण्याबाहेर खेळण्यासाठी जाणे बंद झाले.पण पुण्यातील Tournaments मध्ये सहभागी होत.ते Tournaments आयोजित करत.परीक्षक म्हणून काम करत.यासाठी मुव्हमेंट कार्ड स्वत: तयार करत.ते जागतिक दर्जाचे असावे म्हणून विशेष अभ्यास करत.यासाठी त्यांना महिनाभराचा काळ लागे.हे किचकट काम ते न कंटाळता करत.
                     प्रत्येक गुरुवारी आणि रविवारी ते ब्रिज खेळत. इतर दिवशी रमी खेळत.हेच खेळ ते ऑनलाईनही खेळत.हे विस्ताराने लिहायचे कारण पीडी झालेल्या प्रत्येक व्यक्तीची ग्रहण क्षमता,आकलन क्षमता,स्मरणशक्ती,जाणीव क्षमता कमी होते असे नाही हे उदाहरणासह समजावे. 
                       या सर्व काळात पीडी स्वस्थ बसला नव्हता.भास होणे,ब्लडप्रेशर वरखाली होणे,तोल जाणे अशा विविध स्वरूपात तो आपले अस्तित्व दाखवत होता.त्यांचा पीडी समजून घेणे आणि त्याला आटोक्यात ठेवण्याचे प्रयत्न त्यांच्याही नकळत करणे हे काम आशा शिताफीने करत होती. 
                    रमेश रेवणकर सभेला येत नव्हते. तरी त्यांचा मंडळाशी अप्रत्यक्ष संबंध येतच होता आणि मंडळाच्या कामाला हातभार लागत होता.ते दरवर्षी स्वत: आकाशकंदील बनवत.प्रत्येकवेळी वेगळे डिझाईन असे..कलाकृतीच्या प्रदर्शनात आशा रेवणकर ते ठेवत असे.अनेकांना यातून प्रेरणा मिळे.एका प्रदर्शनात विमानाच्या आकाराचे काठी डिझाईन केले होते.त्यावर्षीच्या प्रमुख पाहुण्या न्यूरॉजिस्ट चारुलता सांखला याना त्याचे फार कौतुक वाटले.
                     आमच्या कार्यकारिणी सदस्यांची सातत्याने फोनाफोनी चालू असते.निरोप घेणे, देणे हे ते न कंटाळता करत.त्यांच्या घरी अनेकवेळा मिटिंग होइ.त्याबद्दल त्यांची नाराजी नसे. घरी असले तर थोड्या गपा मारत.आशा मंडळाच्या कामात बुडून गेलेली असे.त्याबद्दलही त्यांची कधी कुरकुर नसे.तिला त्यांनी कधीच कोणतेही बंधन घातले नाही.
                    त्यांचे पत्नीवर निरतिशय प्रेम होते.अपत्य नाही म्हणून जुन्या पिढीचे लोक दुसऱ्या लग्नाचा सल्ला देत पण त्याला रमेश यांनी अजिबात दाद दिली नाही.माझ्यात दोष असता तर तिचे लग्न करून दिले असते का असे विचारून निरुत्तर करत.युट्रेस काढण्यासाठी शस्त्रक्रिया झाली.शस्त्रक्रियेला त्याला काही कारणाने खूप वेळ लागला.पाण्याचा थेंबही न घेता ते बसून होते. आशाच्या आईने हे तिला नंतर सांगितले. लेकीची योग्य काळजी घेतील याची तिला खात्री वाटत होती.
                 आशाच्या मानसिक अवस्थेत त्यांनी खूप मोठ्ठा आधार दिला आणि बाहेर काढले.एका झूम मिटिंगमध्ये आशाने हे सांगितले होते.आपल्या नंतर तिला त्रास होऊ नये यासाठीही ते सतत विचार करत आणि त्या दृष्टीने त्यांनी व्यवस्थाही केली.
                आशाही  आजारानंतर त्यांची आईच बनली.त्यांच्या हट्टीपणातून ओढवून घेतलेले अपघात आणि त्यातून बाहेर काढण्यासाठी झालेले त्रास तिने आईच्या मायेने सोसले.सुरुवातीपासून सहजीवन चांगले असले की एकमेकांचे कठीण प्रसंगात ओझे कधीच होत नाही.
                  पत्नीप्रमाणे कुटुंबीय,त्यांचे गाव कारवर यावरही त्यांचे प्रेम होते.स्वतःला मासे खायला खूप आवडत असल्यामुळे इतरांनाही खाऊ घालण्याची खूप हौस होती़.या दोघांनी अनेक माणसे जोडली.आशाचे भाऊ वहिनी,रमेश यांचे भाऊ,वाहिनी,पुतणे भाचे या सर्वांसाठी त्यांनी केले आणि तेही आशा आणि रमेशच्या मागे अडचणीच्यावेळी खंबीरपणे उभे राहिले आणि राहतात.आशाचा शिष्य वर्गही यात आहेच.आता रमेश यांच्या मागेही आशासाठी ते आहेत.बरेच जण अशी माणसात गुंतवणूक न केल्याने मुले असूनही वृद्धत्वात एकटी पडतात.
                 रमेश याना पर्यटन हेही आवडीचे होते.   दरवर्षी एक परदेश पर्यटन, भारतातील एखादे स्थळ दर्शन,पुण्याजवळच फार्महाऊसवर जावून राहणे,गणपती उत्सवासाठी मुळ गाव कारवारला जाणे, Tournaments च्या निमित्ताने गावोगावी जाणे अशी त्यांची विविधांगी भटकंती सुरु असे.
 पार्किन्सन्स मुळे फिरायला त्रास होत असे पण आपल्या मुळे आशाला त्रास नको म्हणुन सगळीकडे जात असत.बाहेर गेलेल्यावेळी कधीतरी आपल्याला जमणार नाही असे वाटले तर ते हॉटेलवर एकटे राहात आणि आशाला जाऊ देत.
               पीडी असो की अॅक्सिडेंट, कोणत्याही दुखण्याचा कधीही बाउ केला नाही.आशा एकदा म्हणाली होती, 
               ” Some times I worry about his wellness,but after every problem he rises like a Phoenix.That gives me positivity and stop worrying. ..He is patient but he finds his ways to be happy so our life too runs very smoothly.”
                 त्यांचे ब्रिज खेळणे,प्रवास,आकाशकंदिल बनवणे,प्राणायाम,मेडिटेशन आणि माणसांवरील प्रेम हे सर्व त्यांच्या आनंदाच्या मार्गातील आधार होते. २४ वर्षे त्यांनी पीडिला या आधारे दूर ठेवले.आणि चालते फिरते असतानाच या जगाचा निरोप घेऊन पीडीलाच चकविले
                 १३ मेला रमेश यांचा जन्मदिन असतो. आशानी त्यादिवशी हिराबाग येथे सर्व कॅटागरीसाठी  ब्रिजच्या ओपन टूर्नामेंटस ठेवल्या आहेत.त्यांच्यासाठी तीच खरी आदरांजली असणार आहे.
 
 No photo description available.
May be an image of indoor
No photo description available.May be an image of 1 person, balloon, flower and indoor

Sunday 5 February 2023

आमचे स्फूर्तीस्थान - रामचंद्र करमरकर

                                                आमचे स्फूर्तीस्थान - रामचंद्र करमरकर

                           करमरकरांची पहिली भेट नेमकी कधी झाली हे आठवत नाही.बहुदा शेंडे साहेबांच्या घरी मिटिंगमध्ये.मला मात्र आम्ही वर्षानुवर्षे एकमेकाना ओळखतो असेच वाटते.पार्किन्सन मित्रमंडळात जे सहभागी झाले त्यांच्या कुटुंबातील कोणा ना कोणा व्यक्तीला पीडी होता.करमरकर असे एकमेव आहेत ज्यांच्याकडे कोणालाही पीडी नसताना ते मंडळाचे भक्कम आधारस्तंभ बनले.शेंडे आणि पटवर्धन यांनी पार्किन्सन स्वमदत गट सुरु केला पण म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता.मनुष्यबळ कमी होते.शेंडे साहेब मदतीसाठी जेथे जात तेथे विचारत.प्रतिसाद फारसा नसे. पण ते न कंटाळता सांगत राहत.  करमरकर आणि शेंडे साहेब काही दिवस TEC मध्ये काम करत होते तेवढीच काय ती ओळख.हाताखाली काम करणार्याना ते बरोबर जोखत.करमरकरांचा झोकून देऊन काम करण्याचा स्वभाव त्यांच्या  लक्षात आला होता.एका कौटुंबिक भेटीत त्यांनी मंडळात मदतीला येशील का विचारले.करमरकर यांना मारलेला खडा मात्र नेमका लागू पडला.ते आमच्यात सामील झाले.२००८ च्या जागतिक पार्किन्सनदिन मेळाव्यात ३००/३५० लोक हजर होते.यातून मदतीचे अनेक हात मिळाले.पुण्यातील वेगवेगळ्या एरियानुसार सात भाग करण्यात आले.दर महिन्याला प्रत्येक केंद्रावर सभा घ्यायचे ठरले. त्या त्या एरीयेसाठी प्रमुख नेमण्यात आले.शहर विभागाचे प्रमुख करमरकर मी आणि शेखर बर्वे होतो.त्यांनी आपले मित्र अरुण देवस्थळी यांचे अश्विनी लॉजचे बेसमेंट सभेसाठी मिळवले. ते मोफत उपलब्ध होणार होते.नंतरच्या काळात हे सर्वांसाठी मध्यवर्ती ठिकाण असल्याने इतर केंद्रे बंद झाली आणि पुण्यातील सर्वांसाठी येथेच सभा सुरु झाल्या.९वर्शे तेथेच चालल्या.

                    बघताबघता मंडळाच्या कामांनी करमरकरांना झपाटले आणि ते मंडळाचे सर्वे सर्वा झाले.त्यांची ऐकू येण्याची समस्या वाढत गेल्यावर ते आता कामातून निवृत्त झाले असले तरी त्यांचा कामाचा उत्साह, शाबासकी देणे आजही आम्हाला प्रेरणा देते.२००१ मध्ये निवृत्त झाल्यावर ते स्वत:ला डायबेटीस असल्याने डायबेटीस पेशंट साठीच्या ग्रुपसाठी काम करत होते.तेथे काम करणारे अनेक आहेत येथे आपली जास्त गरज आहे हे त्यांनी जाणले.तेथील लोकांचा रोष पत्करून ते आमच्यातच राहिले.तेथल्या त्यांच्या कामाचा आम्हाला उपयोग झाला.सभेसाठी  दुसरा गुरुवार ठरलेलाच होता.वक्ते ठरविणे, शुभार्थीना यासाठी फोन करणे उपस्थिती घेणे,दानपेटी,चहापान अशी निट व्यवस्था लागली.यात करमरकरांचा मोठा वाटा होता.

                   मंडळाची स्वत:ची जागा नव्हती करमरकर यांचे घर मध्यवर्ती असल्याने तो ऑफिशियल पत्ता ठरला.मंडळाचे काम वाढल्यावर पुस्तके,स्मरणिका न्यायला, इतर माहितीसाठी ये जा सुरु झाली.करमरकर आनंदाने सर्वांचे स्वागत करत. पार्किन्सनविषयी,मंडळाविषयी माहिती सांगत.याशिवाय घरभेटीही करत.कार्यकारिणीच्या सभांसाठीही करमरकर यांचे घर सर्वाना मध्यवर्ती असल्याने हक्काचे ठिकाण होते.करमरकर वहिनीही आमच्यातल्याच झाल्या.जागतिक पार्किन्सनदिन मेळाव्यात ईशस्तवन बसवून घेण्याचे काम त्यांनी आनंदानी उचलले.मेळाव्यात पुस्तकविक्री आणि इतर मदतीसाठी त्यांनी मुलगी आणि जावई यांनाही कामात ओढले, एकुणात कुटुंब रंगलय मंडळाच्या कामात असे झाले.

                     काम करताना ट्रस्टीशिप असे. त्यांचा काटकसरी स्वभाव मंडळाचे काम करतानाही असेच.वक्त्यांना फोनवर,मेलवर निमंत्रण चालायचे.पण करमरकरांना घरी जाउनच सर्व माहिती सांगून आमंत्रण द्यायचे असायचे.उन्हातान्हाचे चालत,बस करून ते जात.सहलीचे ठिकाण आधी पाहायचे असायचे त्यातही त्यांचा पुढाकार.तेथेही बसनी जात.१४ साली खानापूर येथील सनवर्ल्डला सहल जायची होती तीर्थळी आणि करमरकर यांनी नेहरू स्टेडियमकडून बसनी जायचे ठरवले.तीर्थळींच्या काळजीमुळे मी आमचे सुह्र्द प्रकाश जोशी याना बरोबर पाठवले.१५ साली पूर्ण दिवसाची सहल ठरली.बसने जाणे सोयीचे नव्हते आम्ही गाडी करून गेलो.खर्च आलाच.१६ सालच्या शांतीवन सहलीसाठी पाहणी करायला जाण्यासाठी आम्ही गाडी ठरवत आहोत हे लक्षात आल्यावर त्याआधीच ते बसने जाऊन पाहणी करूनही आले.तेथे मंडळाच्या कामाबद्दल सांगून कमी खर्चात भोजन व्यवस्था ठरवून आले.आम्ही कपाळाला हात लावला.आनंदवनच्या सहलीलाही पती पत्नी दोघेही आले.सहलीला वाहिनी आल्या पण मासिक सभेलाही त्याना यायचे असायचे.पण करमरकर त्याना सभेबद्दल सांगत नसत.ती आली की रीक्षा करावी लागते असे त्यांचे म्हणणे असे.नंतर मी करमरकरांचा रोष पत्करून त्याना सभेची माहिती सांगायला सुरुवात केली.

                 सहलीसाठी,मासिक सभेसाठी किंवा जागतिक पार्किन्सन मेळाव्यासाठी अनेक गोष्टींची खरेदी असे ते सर्व काम करमरकर स्वत:कडे घेत.आम्ही आणलेले महाग असते.गावात घेतल्याने पैसे वाचतात असे त्यांचे म्हणणे असे.सुमनताई जोग यांनी माईक दिला होता.तो माईक,बॅनर, इतर साहित्य असलेली एक भली थोरली पिशवी ते स्वत:च्या घराचे तीन मजले उतरून आणत आणि पुन्हा चढून नेत.परत जाताना पटवर्धन यांच्या सायकलीवर पिशवी ठेवून दोघे बोलत बोलत जात.ते दृश्य अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे.दोघांच्या वैचारिक मतभेद असत. करमरकर यांचे मत होते फुकट काही द्यायचे नाही आणि पटवर्धन म्हणत पैसे अजिबात घ्यायचे नाहीत.अशा तर्हेचे हे मतभेद असत.कधी आवाजही चढे. पण त्यांच्या मैत्रीच्या आड ते कधीच आले नाही.दोघांची कामा बद्दलची निष्ठा, निष्काम काम करण्याची वृत्ती आमच्यावर प्रभाव टाकत आली.

                   कमी तेथे आम्ही असे करमरकरांचे काम होते. त्यांनी काय नाही केले? APDA या अमेरिकन सपोर्ट ग्रुपच्या पुस्तिकेचे 'चला संवाद साधूया....' या पुस्तकाचे मराठीत भाषांतर केले.स्मरणिकेसाठी प्रिंटर शोधले. मार्चच्या भर उन्हात वारंवार पायी चालत खेटे घालून काम मार्गी लावले,लेखन,संपादन केले,प्रुफे तपासली.बँकेत खाते काढून आर्थिक व्यवहार हातात घेतले.गरज पडली तर सूत्र संचालन केले.'देणे समाजाचे' या आर्टीस्ट्रीच्या प्रदर्शनात मंडळ सहभागी झाले तेथे स्वयंसेवक म्हणून काम केले.पत्रव्यवहार सांभाळला.देणग्या मिळवल्या.पदरमोड करून अनेक कामे केली.अशी यादी खूप लांबत जाईल.

पार्किन्सन मेळावा आणि सहल तर करमरकरांच्याशिवाय होऊच शकणार नाही असे वाटायचे.एक वर्षी ते मुलीकडे सिंगापूरला गेले होते तर खरच सहल गेली नाही.मध्यंतरी ते अमेरिकेला गेले. तेथूनही त्यांचे मंडळाच्या कामाकडे लक्ष असे.

सुरुवातीपासुन्ते शेडेसाहेब,अनिल कुलकर्णी हे मंडळाचा ट्रस्ट करण्यासाठी मागे लागले होते काही सदस्यांचा विरोध असल्याने काम रेंगाळले.रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने स्वयंसेवी संस्थांच्या कार्यवाहीसाठी अथ्व्द्याभाराची कार्यशाळा आयोजित केली होती.मी आणि करमरकर त्यात सहभागी झालो.तेथे मला त्यांच्यातला आदर्श विद्यार्थी पाहायला मिळाला.कार्यशाळेत त्रस्त स्थापन करण्याबद्दल मार्गदर्शन होते.त्यावेळी ट्रस्ट करण्याची निकड प्रकर्षाने जाणवली.आम्ही कच्चा आराखडा केला.श्री.माधव येरवडेकर यांनी हे काम करून देण्याची तयारी दर्शवली.पाठपुरावा करण्याचे काम करमरकरांनी नेटाने केले.आल्या घराचा पत्ता दिला.आणि ट्रस्ट अस्तित्वात आला.ते कार्यवाह झाले.

हळूहळू आम्ही कामे हातात घ्यायला सुरुवात झाली.८२ वर्षाचे वय ४० वर्षे सांभाळलेला डायबेटीस यामुळे तब्येतीच्या तक्रारी चालू झाल्या होत्या.ऐकू येत नव्हते.अर्थात ते म्हणत मी उत्तम आहे.

                 त्यांच्या समाजकार्याचा मोठ्ठा वाटा मंडळासाठी असला तरी इतर अनेकांचे करमरकरांशिवाय पान हलत नसे. यात करमरकर कुलवृत्तांत,मित्रमंडळी, जवळचे लांबचे नातेवाईकही असत.त्यांच्यासाठी ते फ्रेंड,फिलॉसॉफर,गाईड असतात.त्यांचे जावई हरिप्रसाद म्हणतात, बाबा माझ्यासाठी रोल मॉडेल आहेत.

                  करोना काळात ऑफलाईन सभा बंद झाल्या.ऑनलाईन सभा सुरु झाल्या.वार्षिक मेळावाही ऑनलाईन झाला या नव्या तंत्राशी त्यांचे जुळू शकले नाही.ऐकू न येणे वाढतच चालले.करोना काळात तर त्यांना अचानक हय्पोग्लोसोमिया झाला. शरीरावरचा ताबा सुटला.संवेदना बंद झाल्या.उभे राहता येईना.तोंड उघडता येईना.१५ दिवस हॉस्पिटलमध्ये होते.हळूहळू तब्येत सुधारू लागली.

या काळात आशा रेवणकर जाऊन यायच्या त्या आल्या की ते छान हसत.ती त्यांच्या आवडीचे खायला करून नेई. ते आवडीने खात. त्यांची मुलगी म्हणे, तुम्ही आलात की ते खुश असतात.येत जा.मुलीलाही थोडा आधार वाटे.आशा मला म्हणे त्यांची अवस्था पाहवत नाही.तुम्ही अजिबात येऊ नका तुम्हाला बघवणार नाही.त्याना काही न करता पडून राहिलेले पहायची सवय नव्हती.

                   घरी सोडल्याव २४ तास attendant  ठेवला तब्येत थोडी सुधारू लागली आणि १५ ऑगस्टला पुन्हा अनकाॅन्शस झाले पुन्हा हॉस्पिटलमध्ये २१ दिवस मुक्काम.आता किडनीवर थोडा परिणाम झाला.WBC count वाढला.करोनाचा काळ होता.एका वेळी रुममध्ये जास्त लोक राहू शकत नव्हते.यात एक बरे होते त्याना किंवा घरातल्या इतरांनाही करोनाने गाठले नाही.

एक वेळ अशी आली अमेरिकेची मुलगी आली.इतर नातवाईक भेटायला येऊन जाऊ लागले यातून ते बाहेर येणार नाहीत अशीच परिस्थिती होती.पण त्यांच्या विलपॉवरमुळे यातून ते बाहेर आले.डॉक्टरही म्हणाले,हा चमत्कार आहे.आता घरी सोडले तरी डॉक्टरनी २४ तास नर्स आणि attendant ठेवण्यास सांगितले.तीन महिन्यांनी नर्स कमी केली.फक्त रात्रीचा attendant राहिला.आता जिना उतरू लागले.

एवढे विस्तारानी सांगायचे कारण आज त्याना चांगल्या परिस्थितीत पाहणार्यांना ते आपल्या विलपॉवरच्या आधारे कोणत्या दिव्यातून बाहेर आलेत हे समजावे. आशा घरी जात होती.मंडळाच्या कामाबद्दल सांगत होती.भरतनाट्यमंदिरासमोर ऑफिस झाल्याचे सांगितल्यावर म्हणाले,मी आता रोज थोडा वेळ बसत जाईन.त्यांचा हा उत्साह पाहून आम्ही थक्क होत होतो.

स्मरणिका द्यायला अशा एकदा जाऊन आली.हळूहळू  त्यांनी पूर्ण स्मरणिका वाचली.आशाने दिवंगत पतीवर हसतखेळत लिहिलेला लेख तर त्यांना एवढा आवडला मला त्यांचा फोन आला त्या समोर असत्या तर मिठी मारली असती.           

                   सगळे त्याना भेटून येत होते.मला मात्र त्यांचे तीन जीने चढून जाणे शक्य नसायचे.तरीही मी मनाचा हिय्या करून जाउच असे ठरवले.तर त्यांचाच फोन आला अजिबात येऊ नका मीच तुम्हाला भेटायला येईन.त्यांची मुलगी उमाही म्हणाली मी एकदा बाबांना घेऊन येईन.त्याना भेटण्याची संधी अचानक जुळून आली. आमचे औरंगाबादचे शुभंकर रमेश तिळवे पुण्याला येणार होते अचानक किरण सरदेशपांडे यांच्या ओक संकुल सभागृहात गेटटुगेदर ठेवले. करोना नंतरचा हा पहिलाच ऑफलाईन कार्यक्रम होता.शुभंकर शुभार्थिनी याला उदंड प्रतिसाद दिला.करमरकर सपत्नीक कार्यक्रमाला आले.माझ्या डोळ्यासमोर पूर्वीचेच उत्साही करमरकर होते.त्याना भेटून झालेल्या आनंदाचे वर्णन करू शकत नाही.

                    १७ ऑक्टोबरच्या कोजागिरी कार्यक्रमालाही ते आले.सकाळीच खणखणीत आवाजात फोन आला मदत करायला येऊ का?त्यांचे असे बोलणेही आम्हाला उर्जा देणारे होते.आम्हा सर्वांचे उत्तम आयोजनाबद्दल भरभरून कौतुक केले.१ डिसेंबरला मोराच्या चिंचली येथील सहलीलाही आले.तेथील सर्व उपक्रमात सहभागी झाले.त्यांचे सहलीतील सहभागाचे फोटो पाहून त्यांचे कुटुंबीयही थक्क झाले.

                      आज ते प्रत्यक्ष कामात सहभागी नसले तरी त्यांचा फक्त सहभागही आमच्यासाठी मोलाचा असतो. त्यांच्या निस्पृह कार्याचा आदर्श आमच्यासाठी दिशादर्शी आहे.मित्रा पार्किन्सना अशी लाखात एक असलेली माणसे तुझ्यामुळे आमच्या आयुष्यात आली खूप धन्यवाद! त्यांचे आरोग्य उत्तम राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना.