Monday 7 February 2022

आठवणीतील शुभार्थी - मनोहर लिमये.

                                       आठवणीतील शुभार्थी -  मनोहर लिमये

            मनोहर लिमये यांना मी प्रत्यक्षात कधीच पहिले नाही पण तरीही खूप ओळखीचे झाले होते.११ एप्रिलला कलाकृती पाठवा असे ग्रुपवर लिहिताना मला लिमयेच आठवत राहिले मागच्या वर्षी त्यांनी सुंदर कोलाज करून पाठवले होते.आता त्यांच्या कलाकृती असणार नाहीत अशी खंत मनात दाटून आली पण क्षणार्धात त्यांच्या सुन्दर आनंददायी आठवणीनी त्यावर मात केली.आपल्या सर्वांबरोबर त्या शेअर कराव्या असे वाटले. 
                त्यांची पहिली आठवण म्हणजे दसऱ्याला व्हाटसअपवर अनेकांनी वेगवेगळे फोटो टाकले होते.त्यात मनोहर रावांनी टाकलेला फोटो मला अधिक भावला.त्यांनी आपल्या वॉकरला झेंडूची माळ घातली होती आणि त्यासह आपला फोटो टाकला होता.काठी, वॉकर,व्हीलचेअर वापरणे हे बऱ्याच शुभार्थीना आवडत नाही पण मनोहरराव तर तिला इतर वाहनांप्रमाणे आपला साथीदार समजत होते.त्यांचा पार्किन्सनसह कोणत्याही गोष्टीचा आनंदाने स्वीकार त्यातून जाणवत होता.
               मनीषा ताई आणि ते प्रत्येक ऑनलाईन सभेला हजर असत त्यावेळी त्यांच्या मागे पिनअप बोर्ड आणि त्यावर लावलेल्या वारली आर्ट,  कोलाज असे काहीना काही चिकटवलेले दिसायचे.PDMDS च्या सभानांही त्यांची हजेरी असायची.तेथे दिलेले होमवर्क त्यांनी आवर्जून केलेले असायचे.यात मनीषाताईंचा सपोर्ट आणि त्यांचा उत्साह हे दोन्ही असायचे.
               त्यांनी बहिणींसाठी राखी पौर्णिमेला दिलेल्या कलाकृतीच्या भेटी संबंधी 'क्षण भारावलेले' मध्ये मी यापूर्वी लिहिलेलेच आहे.त्याची लिंक सोबत देत आहे.ती अवश्य वाचावी.त्यावेळचा उत्साह नंतर त्यांचा आजार वाढल्यावरही तसाच होता.मनीषाताई व्हाटसअप ग्रुपवर त्यांचे दीर सुहास लिमये यांच्या नर्मदापरीक्रमेवरील पुस्तकाचे अभिवाचन टाकत होत्या.त्या दिराना ७५ वर्षे पूर्ण झाली म्हणून कार्यक्रम होता. जिना उतरून त्याना नेणे अशक्य वाटत होते.आपण घरी राहू असे मनीषाताईंनी सांगताच ते म्हणाले, तुम्ही घरी थांबा मी जाणार.त्यांनी जिना उतरून मला जमते कसे पहा हे ही दाखवून दिले.शेवटी त्यांचे म्हणणे मान्य करावे लागले.त्यांच्या येण्याने उत्सवमूर्तीसह सर्वच नातेवायीकाना किती आनंद झाला असेल ते आपण समजू शकतो.हे त्यांनी केले ते मानसिक बळावर.सामाजिक भयगंड बाळगणाऱ्या शुभार्थीसाठी हा उत्तम धडा आहे.
               असे आनंदी राहणे अचानक आचरणात येत नाही मनोविकार तज्ज्ञ मनोज भाटवडेकर यांच्या एका लेखातील 'आनंदाचाही रियाज करावा लागतो' हे वाक्य मला फार आवडले होते.मनोहररावांचा असा रियाज आयुष्यभर चालू असणार असे मला ते समजले त्यातून वाटते.२ ऑक्टोबरला गांधी जयंती दिवशीच त्यांचा जन्म. गांधीचा फोटो ते खिशात ठेवत.गांधीजींची शिकवण ही आचरणात आणत.साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असे ते होते. इतरांच्या आनंदात इतरांच्या प्रगतीत ते आनंद मनात.पत्नीची प्रयोगशीलता,त्यासाठी शाळे व्यतिरिक्त घरातही बराच वेळ घालवणे,कबीर बागेत शिकवायला जाणे याबद्दल त्यांची कुरकुर नसायची.उलट ते त्याना सोडायला आणायला जात.तेच नाही तर त्यांच्या आईचेही मनीषा ताईना प्रोत्साहन असे.कामाविषयी मनीषा ताईंचा फोन आला तर त्या मी त्यांची सेक्रेटरी बोलते असे सांगत.असे हे घरच आनंदी.एकमेकांचा आदर करणारे.
                ते संख्याशास्त्राचे पदवीधर.तरी विविध विषयावरचे वाचन अफाट.नगरवाचन मंदिरातून ते पुस्तके आणत.त्यांनी स्वेच्छया निवृत्ती घेतल्यानंतर ते घरी होते.मनीषाताई नोकरीत.त्यांची मुलगी नातीला त्यांच्याकडे सोडायची.नातीला सोडणे, आणणे, स्तोत्रे शिकवणे ते आवडीने करीत.तिचा अभ्यास घेत. परीक्षेपुरता अभ्यास न घेता पुस्तकाबाहेरचा इतिहास, भूगोल.राज्यशास्त्र शिकवीत.नात म्हणायची आजोबांचे ज्ञान इतके अफाट आहे कि कौन बनेगा करोडोपती मध्ये ते नक्की जिंकले असते.त्यांच्या शिकवण्यामुळे नातीचे हे विषय आवडीचे झाले आणि कॉलेजमध्ये तिने कला शाखा निवडली.पार्किन्सन झाल्यावर वाचन थोडे कमी झाले असेल पण नवीन विषय समजून घेण्याचे कुतूहल, जिज्ञासा होतीच.
                   मनीषाताई एक प्रयोगशील शिक्षिका. मनोहररावांच्या पार्किन्सनच्या अवस्थेनुसार त्याना कृतीशील ठेवण्यासाठी, त्यांच्या गरजा पुरविण्यासाठी प्रयोग करत.त्यांच्या बोलण्यावर परिणाम झाला तेंव्हा त्यांनी सर्व अक्षरे असलेला एक तक्ता तयार केला.त्याना काय म्हणायचे आहे त्यासाठी तक्त्यातील अक्षरावर ते बोट ठेवत.ती अक्षरे मनीषाताई लिहून काढत.यातून त्याना काय म्हणायचे आहे ते मनीषा ताईना समजे.एकदा मनीषाताईंनी मला श ओ भ न आ त ई र थ ळ  अशी अक्षरे लिहून हे तुमच्यासाठी म्हणून पाठवले
                मला प्रथम अर्थबोध झाला नाही.मनीषा ताईनी सांगितले त्यावेळी समजले.त्यादिवशी झूमवर तुळशी ट्रस्ट तर्फे माझी मुलाखत होती ती सकाळी ११ वाजता होती.मनीषाताईना माझी मुलाखत लावण्याची आठवण करण्यासाठी त्यांनी माझे नाव असे लिहून दाखवले होते.ते अवघड शारीरिक परिस्थितीतही माझी मुलाखत पाहणार होते. मला अगदी भरून आले.ऑनलाईन कार्यक्रम असल्याने शुभार्थीना किती सोयीचे होते हेही समजले.
                ते मितभाषी असल्याने मित्रांचा फार गोतावळा नव्हता.पण जे मित्र होते त्यांची मैत्री अगदी घट्ट होती.आपल्याच ग्रुपवर असणारे डॉ.अविनाश बिनीवाले हे त्याचे उदाहरण.खरे तर कॉलेजमध्ये त्यांची मैत्री झाली नंतर दोघांची क्षेत्रे बदलली.नोकरीसाठी गावे बदलली पण मैत्री कायम राहीली.मनोहररावांच्यामुळेच डॉ. बिनीवाले यांच्यासारख्या बहुआयामी व्यक्तिमत्वाची आपल्याला ओळख झाली.ते मनोहरावाना नेहमी फोन करत.मनोहररावांचे बोलणे कमी झाले तरी ते व्हिडिओकॉल करत तो बोलला नाही तरी मी त्याला पाहतो तरी असे म्हणत.
                आता सभांच्या वेळी मनीषाताई शेजारील खुर्ची रिकामी असेल पण मनोहररावांच्या आनंददायी आठवणी नेहमीच आपल्याबरोबर असतील.

   https://www.parkinsonsmitra.org/?p=3131
            
          May be an illustration of 1 person    

No comments:

Post a Comment