Saturday 12 November 2022

पार्किन्सन्सविषयक गप्पा - ८०

                                                     पार्किन्सन्सविषयक गप्पा -  ८०

              

 शुभार्थी रामचंद्र सुभेदार यांच्या वाढदिवसाला मेसेज पाठवला. त्यावर जोत्स्ना ताईंची व्हाइस मेसेज द्वारे प्रतिक्रिया आली.आज ८९ वर्षे पूर्ण झाली.वयोमानामुळे समस्या थोड्या वाढल्या आहेत,आवाज गेलेला आहे.गिळता येत नाही म्हणून सहा महिन्यापासून ट्यूब द्वारे फीडिंग करावे लागते.बाकी इतर काही कॉम्प्लिकेशन नाही त्यामुळे तब्येत बरी आहे.सकाळी व्हिल्चेअरवरुन खाली फिरायला नेतो.झोपूनही ते हातपाय हलवत व्यायाम करतात.केअरटेकर चांगला मिळाला आहे.मुलगाही खूप  चांगल पाहतो सगळे छान चाललय.आनंदी कावळ्याच्या गोष्टीसारखे जोत्स्नाताई कायम आनंदीच असतात.कितीही कठीण परिस्थिती आली तरी कुरकुर न करता त्या परिस्थितीतल्या जमेच्या बाजू हे पतीपत्नी पाहतात असे वेळोवेळी मी पाहिले आहे. 

               ज्योस्नाताईनी पाठवलेल्या वाढदिवसाच्या फोटोत सुभेदार यांनी सिल्कचा झब्बा आणि धोतर घातले होते.नाकाला लावलेल्या ट्यूबसकटचा त्यांचा फोटो पाहून त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे कौतुक वाटले.आशा रेवणकरनी 'सकारात्मकतेचे शिखर' असे फोटो पाहून म्हटले ते अगदी खरे आहे.आम्हाला तुम्ही हवे आहात हे कुटुंबियांच्या.कृतीतून दिसले की शुभार्थीलाही जगण्यासाठी उर्जा मिळते.

              स्वमदत गटाचा त्यांनी जास्तीत जास्त उपयोग करून घेतला.

वर्गात पहिल्या बाकावर बसून शिक्षकाच्या प्रत्येक प्रश्नाला हात वर करणाऱ्या सिन्सियर विद्यार्थ्यासारख्या त्या मला वाटतात.           

            प्रत्यक्ष सभा,ऑनलाईन सभांना जास्तीत जास्त उपस्थिती कोणाची? - जोत्स्ना सुभेदार

युट्यूब वरील सर्व व्हिडिओ कोणी पहिले आहेत.- जोत्स्नाताई सुभेदार

पार्किन्सनवर लिहिलेले आमचे सर्व लेखन कोणी वाचले आहे ?-जोत्स्नाताई सुभेदार

शुभार्थीचे करताना स्वत:ला आणि कुटुंबियाना स्पेस देणे कोणाला जमले आहे?.ज्योत्स्नाताईना

पार्किन्सनसह आनंदाने जगूया हे ब्रीदवाक्य आचरणात आणणे कोणाला जमले आहे? अर्थात जोत्स्नाताई सुभेदार यांना.

पत्नी, आई,शुभंकर,आज्जी,विद्यार्थिनी,मैत्रीण,पेशंट अशा सर्व भूमिका त्या चोख बजावतात.यात अजिबात अतिशयोक्ती नाही.

रामचंद्र सुभेदार हवामान खात्यात India Meteorological Department मधून असिस्टंट Meteorologist म्हणून निवृत्त झाले.शेतीची आवड,निवृत्तीनंतर घरची शेती करायला मध्यप्रदेशात आले.त्यानंतर पुण्यात ११ वर्षे  मुलीकडे  होते.मुलगा ,सून आर्मीमध्ये.सारख्या बदल्या होत.मुलगा निवृत्त झाल्यावर दिल्लीला घेऊन गेला.अशी विविध ठिकाणी स्थलांतरे झाली तरी या दोघांना सर्वांशीच जमवून घेता आले.आणि तेही सर्वांना हवेशे वाटले.

 पुण्यात आल्यावर  ते  व त्यांचे पती गीता संथा वर्गात दाखल झाले संस्कृतची किंवा गीता पठणाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती.२०१८ मध्ये जोत्स्नाताई गीता धर्म मंडळाच्या 'संपूर्ण  गीता कंठस्थ परीक्षे'त ९३.९ % गुण मिळवून तिसऱ्या आल्या.त्यावेळी वय होते ७८. कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी वयाचा अडसर येत नाही हे त्यांनी दाखवून दिले.शृंगेरीला जाऊन दिलेल्या गीता पठ्णाम्ध्ये त्यांना २१००० रु.बक्षीस मिळाले.अधिक महिन्यात त्यांनी गीतेचे ३३ पाठ केले.  

अश्विनीमधल्या आणि नर्मदा हॉलमधल्या सर्व सभांना त्या पतिना घेऊन हजर असत.काही दिवसानी त्यांच्याबरोबर केअरटेकर असे.सहलीलाही सक्रीय सहभाग असे.झूम मिटिंग सुरु झाल्या त्यातही त्यांचा पहिल्या पासून सहभाग होता. 

मध्यंतरी त्या सुभेदाराना सावरत असताना स्वत:च पडल्या.खुब्याचे हाड मोडले.शस्त्रक्रिया करावी लागली.माझे ऑपरेशन आहे सभा अटेंड करु शकणार नाही म्हणाल्या होत्या.परंतु सभेत नेहमीप्रमाणे उपस्थिती पाहून मला आश्चर्य वाटले.ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशीच त्यांनी सभेला हजेरी लावली होती.त्या काळात दोघा पतीपत्नीना वेगवेगळे केअर टेकर होते.मुलगी आणि जावई यांनी घेतलेली काळजी,सकारात्मक विचार यामुळे त्या लवकर बऱ्या झाल्या.बऱ्या झाल्यावर त्यांचा मेसेज आला. माझ्याकडे काम करणारी केअरटेकर चांगली आहे कोणाला हवी असेल तर फोन देत आहे.मेसेज ग्रुपवरही टाकला.तिला काम मिळावे आणि कोणाला तरी चांगली केअर टेकर अशी त्यांची मनापासून इच्छा होती.                       

लेखन,व्हिडिओ,सहल, कोणताही कार्यक्रम यावर लगेच त्यांची त्या त्या व्यक्तीला व्यक्तिश: प्रतिक्रिया असते.मी त्यांच्या कोणत्याच प्रतिक्रिया,फोटो,व्हाइस मेसेज गाळले नाहीत.ते पाहून मलाच उर्जा मिळते.पुणे सोडून दिल्लीला निघाल्या तेंव्हा भाऊक झाल्या होत्या.ऑनलाईन मिटिंग,मेसेज, फोन द्वारे भेटत राहिल्या.

रमेश तिळवे औरंगाबादहून पुण्यात येणार होते अचानक गेटटुगेदर ठरले.आपण पुण्यात नाही याची त्याना हळहळ वाटत होती.त्यांचा व्हिडीओ कॉल आला  रमेश भाऊनी सर्वकडे फिरवून कोणकोण आले आहे, कशी सभा चालले हे दाखवले. माझ्याशी बोलल्या.दुधाची तहान ताकावर भागवली.१७ ऑक्टोबरचा ऑफलाईन कार्यक्रम चुकल्याचेही त्याना वाईट वाटत होते. त्यांचा मुलगा म्हणाला पुण्याची इतकी आठवण येते तर मी बाबांना पाहतो तू थोडे दिवस जाऊन राहून ये.

एकहा रसमलाई बनवली त्याचा फोटो आला कृतीही सांगितली.मुला नातवंडाना नवीनवीन पदार्थ करून घालताना त्याना आनंद मिळत होता.दिवाळीत स्वत: केलेल्या फराळाचा फोटो त्यांनी पाठवला होता.खूप वर्षांनी मुलांसाठी फराळ करता आला.होते तोपर्यंत करत राहायचे आणि करत राहिले कि होत राहते असेही त्यांनी लिहिले होते.आता त्यांचे वय वर्षे ८३. मी अजिबात फराळ करायचा नाही ठरवले होते पण त्यांचा हा विचार वाचल्यावर मलाही उत्साह आला.आणि थोडा फराळ केला.

 त्यांचा उत्साह, सकारात्मकता वेळोवेळी माझ्यापर्यंत पोचली ती तुमच्यापर्यंत पोचवावी यासाठी हा लेखन प्रपंच.

 

 



No comments:

Post a Comment