Sunday 30 May 2021

पर्किन्सन्सविषयक गप्पा - ६९


                                                      पर्किन्सन्सविषयक गप्पा - ६९

                   काल वाढदिवसानिमित्त अनेक शुभंकर शुभार्थिनी भरभरून शुभेच्छा दिल्या.मी खूप भाराऊन गेले.सर्वांकडून  कौतुक, स्तुती ऐकताना मला अवघडल्यासारखे होते आणि दडपणही येते.या सर्वांच्या अपेक्षाना आपण न्याय द्यायला पाहिजे.आपल्याला जमेल का ते असे वाटते.यातील काहींच्या घरी आम्ही गेलो आहोत,काही आमच्या घरी आले आहेत.अनेकांची प्रत्यक्ष भेट झाली नाही फक्त फोनवरून बोलणे झाले आहे.काहींशी तर फोनवरून ही बोलणे झाले नाही..ही माझी प्रतिमा लेखनातून झाली असेल का? मला असे प्रश्न पडतात. तरीही सर्वाना माझ्याबद्दल एकच वाटते त्याअर्थी मला त्याचा आदरपूर्वक स्वीकार करायला हवा.

                    बऱ्याच जणांनी मला आधार स्तंभ असे संबोधले.येथे मला मी ज्यांच्या आधारावर उभी आहे आणि आत्ताही जे माझा आधार आहेत त्यांच्याबद्दल सांगितले पाहिजे.तसेच मीच संस्थापक आहे असे अनेकांना वाटते.अल्झायमरवर काम करणाऱ्या मंगला जोगळेकर यांनी त्यांच्या सपोर्ट ग्रुपसाठी व्याख्यान द्यायला मला बोलावले होते .माझीओळख संस्थापक अशी करून दिली अर्थात तातडीने मी ते दुरुस्त केले.मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर लुकतुके याना मी ११ एप्रिलच्या कार्यक्रमाचे निमंत्रण द्याला फोन केला ओळखलेत का असे विचा रल्यावर मला ते म्हणाले हो तुम्ही पर्किंन्सन्स मित्रमंडळाच्या संस्थापक.अनेकाना असे वाटते.खरी परिस्थिती वेगळी आहे.२००० मध्ये मंडळाची निर्मिती झाली आणि २००७ मध्ये आम्ही सामील झालो.

                 तीर्थळीना पार्किन्सन्स झाल्यावर सहा वर्षे आम्ही चुकीचे प्रयोग करत राहिलो.पार्किन्सन्सबद्दल तो  डोपामिन निर्माण करणाऱ्या पेशी मृत झाल्याने होतो याशिवाय शून्य ज्ञान होते. भ्रामक समजुती होत्या.औषधाच्या दुष्परिणामाची भीती होती.(   या बद्दलच्या सविस्तर लेखाची लिंक सोबत जोडली आहे.) पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या ओळखीनंतर मात्र ही पारीस्थिती बदलली.पार्किन्सन मित्रमंडळाची ओळख म्हणजेच मधुसुदन शेंडे आणि शरच्चंद्र पटवर्धन यांचीच ओळख.

              मधुसूदन .शेंडे याना १७ वर्षे(त्यावेळी.) पार्किन्सन्स असून,ते अजून स्वत:ची कामे स्वत: करतात.सुरुवातीपासून अलोपाथीची औषधे घेतात:पण साईडइफेक्टची भयानकता दिसत नाही,हे पाहून  साईडइफेक्टबाबतची भीती  कमी झाली..त्यांच्याकडे पार्किन्सन्सवर माहिती देणारी बरीच पुस्तके,मासिके,सीडीज होत्या..हे साहित्य मोफत पुरविण्याची त्यांची तळमळ,उत्साह,त्यांचे आश्वासक व्यक्तिमत्व यांनी पिडीकडे सकारात्मक दृष्टीने पाह्ण्याच बीज रोवल गेल.
                शरच्चंद्र पटवर्धन.यांच्या पत्नीला १९९२ मध्ये  पार्किन्सनन्स झाल्यापासून पार्किन्सन्सवर त्यांनी बरच वाचन केल.तेंव्हापासून छापून आलेली मराठी इंग्रजीतील माहितीची कात्रण त्यांनी जपून ठेवली होती.ती आम्हाला वाचावयास मिळाली.पार्किन्सन्सविषयी न घाबरवणारी बरीच माहिती समजली.केअरगीव्हर म्हणून त्यांचा पत्नीला असलेला आधार आणि पत्नीचा पार्किन्सन्ससह आनंदी जगण्याचा प्रयत्न, इतर पार्किन्सन्सग्रास्तांपर्यंत माहिती पोचविण्याचा त्यांचा खटाटोप.यामुळे आम्ही प्रभावित झालो.केअरगीव्हर म्हणजे शुभंकर कसा असावा याचा वस्तुपाठच मिळाला.

                          ही जोडगळी जीव तोडून काम करत होती पण प्रतिसाद मात्र हवा तसा मिळत नव्हता. सत्तरी ओलांडलेल्या या दोघांचा उत्साह आम्हालाही या कामात ओढण्यास कारणीभूत झाला.किंबहुना पार्किन्सन्स मित्रमंडळ हेच आमचे जीवन झाले..स्वत:चा पार्किन्सन्स विसरून घरोघरी भेटी देऊन शुभार्थीना आत्मविश्वास देणारे,वृत्तपत्रात स्वत:च्या हस्ताक्षरात लेखन देऊन पार्किन्सन्स साक्षरता वाढवणारे जे.डी.कुलकर्णी,पती पत्नी दोघांना पार्किन्सन्स असताना आनंदाने त्याला मित्र बनविणारे अनिल कुलकर्णी आणि शीलाताई,स्वत:च्या घरी पार्किन्सन्स नसताना आमच्या कार्याला  तनमन धनाने वाहून घेणारे,स्वत:ची जागा ऑफिससाठी वापरायला देणारे रामचंद्र करमरकर अशी किती तरी जण या कार्यात आम्ही टिकून राहण्यास कारणीभूत ठरली.नवीन येणारे बावरलेले शुभंकर,शुभार्थी पाहताना आम्हाला आमची वाया गेलेली सहा वर्षे आठवतात.त्यांच्या जागी आम्हीच दिसतो आणि.त्यांना एका क्लिकवर माहितीचा,अनुभवाचा  खजिना पोचवताना परमानंद होतो.म्हणजे आम्ही हे काम करतो ते आमच्या आनंदासाठी.शुभंकर, शुभार्थीना माझ्याकडून जेवढे मिळते त्याच्या कितीतरी पट अधिक मला त्यांच्याकडून मिळते.

                        ज्यांच्यामुळे मंडळ सुरु झाले ते मधुसूदन शेंडे आणि शुभलक्ष्मी  पटवर्धन आपल्यात नाहीत. पण शरच्चंद्र पटवर्धन आणि श्यामलाताई शेंडे अजूनही आमचा आधारस्तंभ आहेत.त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन अंजली महाजन,सविता ढमढेरे ,मृदुला कर्णी,उषाताई यांही सह्चारच्या नसण्याचे दु:ख गिळून  त्या आपल्याच शुभार्थींच्या नाहीत तर सर्व शुभार्थींच्या शुभंकर आहेत हे सांगत मंडळाची धुरा उचलण्यास सज्ज आहेत.आशा रेवणकर किती कामात झोकून देता तब्येतीची काळजी घ्या सांगत स्वत: तेच करत असते.देसाई अनेकदा पडतात.इतर काही कुरबुरी असतात त्यामुळे वसूचा एक पाय घरात तर एक हॉस्पिटलमध्ये असतो तरी ती मी आहे असे सांगत कामाचा वाटा उचलत असते.दीपा,अरुंधती कडे पर्किंन्सन्स पेशंट नाहीत तरीही त्यांचा आम्हाला आधार असतो.या सर्व सख्या, मुलीच्या मायेने माझी काळजी घेत असतात.माझ्या कॅन्सरच्या काळात मला या सर्वांनी कामापासून पूर्ण लांब ठेवले.एकुणात माझ्याकडून जे काही काम होते ते या सर्वांच्या भरवशावर.कदाचित मी लेखनामुळे सतत दिसत असते तर हे सर्व पडद्यामागचे कलाकार.

                             अनेकांना मी आई,बहिण,मैत्रीण वाटते.माझ्याकडून सकारात्मकता मिळते. माझा आधार वाटतो.असे या शुभेच्छामध्ये आणि प्रत्यक्ष बोलतानाही अनेकजण सांगतात.मी तशी तज्ज्ञ समुपदेशक नाही.त्यामुळे समोरच्या व्यक्तीशी मी ठरवून असे काही बोलत नाही.एक मात्र आहे  मातृत्व,वात्सल्य हा माझा स्थायी भाव आहे.प्रत्येक व्यक्तीबद्दल मला प्रेम वाटते.मला माणसे आवडतात ओळखी करून घ्यायला आवडते,त्यांच्याशी तासनतास बोलायला आवडते.मंडळाव्यतिरिक्त सर्वांशीही  मी असेच बोलत असते.त्यामुळे मला आनंद देणारे आवडीचेच काम मी करत असते. ते श्वासाइतके सहज असते..मी वेगळे काही करते सामजिक कार्य करते असे माझ्या मनात नसते.स्वमदतगटात काम करताना प्रत्येकाचाच स्व नकळत  विस्तारतो.माझ्यातल्या आईपणामुळे कदाचित तो जास्तच विस्तारला असावा.'मी आहे कारण आम्ही आहोत' हे उबंटू तत्वज्ञान मला पटते. माझ्या अस्तित्वाचे कारणच तुम्ही सर्व आहात.

                        आमच्या पूर्व सुरीनी दिलेला वसा मी इमाने इतबारे सांभाळत आहे.आता तो सांभाळणारी पुढची फळी तयार होत आहे.मयूर श्रोत्रीय म्हणाले,शोभनाताई व्यक्ती नसून वृत्ती आहे.खरे आहे विठ्ठलाच्या मंदिरात एकतारी वाजवणारा ती दुसर्याला देतो दुसरा तिसर्याला हे चालत राहते.शेंडे,पटवर्धन यांनी अशी वृत्ती आमच्यात पेरली.वेल फळाफुलांनी बहरत आहे. अनेकांच्या मध्ये बी पेरले जाणार आहे हे चक्र चालूच राहील आणि तुम्ही सर्व त्याचा भाग आहात.वेलू गगना वरी जावा हीच ईश्वराकडे प्रार्थना.   

                    

                       https://parkinson-diary.blogspot.com/2014/03/

No comments:

Post a Comment