Sunday 2 July 2017

आठवणीतील शुभार्थी - जे.डी.कुलकर्णी

                            
         मित्रमंडळाच्या सभेला पंचमीकडून शिवदर्शनकडे जाताना शालीमार सोसायटी लागते.जे.डी.ना जाऊन सात वर्षे झाली तरी अजून तेथे पोचल्यावर त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.तेथे ते आमची वाट पाहत बाहेर उभे असायचे.कोठेही जाताना त्याना नेणे आणि पोचवणे हे काम आमच्याकडे असे.गाडीत पूर्ण वेळ ते भरभरून बोलायचे आणि आम्ही फक्त ऐकायचे काम करायचो त्यांच्या असण्यानेच वातावरणात चैतन्य निर्माण होत असे.हे चैतन्य अनुभवाच्या मुशीतून तावून सुलाखून निघाल्यावर निर्माण झाले होते.
                                     आत्मविश्वास गमावलेली व्यक्ती कुटुंबीयांच्या मदतीमुळे इतरांचा शुभंकर होण्याइतकी वर येते याचे जितेजागते उदाहरण म्हणजे जे.डी.कुलकर्णी. आम्ही सर्व त्यांना जे.डी.च म्हणायचो.   मी हेकेखोर, आडमुठा आहे असे ते स्वतःच सांगायचे त्यांचा शुभंकर होण म्हणजे  सुळावरची पोळी.जेडींच्या मित्रमंडळाच्या स्मरणिकेतील लेखातून आणि सकाळच्या मुक्तपीठ पुरवणी मधील लेखातून त्यांच्या या प्रवासाबद्दल समजले. पीडीमुळे कंप सुरु झाला. सही करता येइनाशी झाली..प्राध्यापक असणार्‍या जेडीना शिकवताना फळा वापरता येईनासा झाला पण अ‍ॅलोपाथीचे उपचार घेण्यास तयार नव्हते.आणि हे गळी उतरवणे कुटुंबियाना कठीण होते..ते लिहितात.
                        'पार्किन्सन्स व्याधीने माझ्यावर झडप घातली आणि ब्रह्मांड आठवले.......मी पूर्णपणे परावलंबी, गलितगात्र झालो.अंघोळ घालण्यापासुन, खायला घालण्यापर्यंत सर्व गोष्टी दुसर्‍याकडून करुन घ्याव्या लागत होत्या" अशा अवस्थेत एक वर्षाचा काळ लोटला..त्याना भयगंडाने पछाडले.जगण्याची उमेद नाहीशी झाली घरचे आणि नातेवाईक न्युरॉलॉजिस्टकडे नेण्यात यशस्वी झाले. नकारात्मक दृष्टिकोन घेऊनच ते डॉक्टरकडे गेले.पण औषधोपचाराने हळूहळू बरे वाटू लागले.व्यक्तिगत व्यवहार करता येऊ लागले.पण आत्मविश्वास गमावलेलाच होता.पण कुटूंबियानी हे काम चोख केले. वेळोवेळी त्यांच्यावर जबाबदार्‍या टाकून त्या पूर्ण करुन घेतल्या.घरात फिरताना आधार लागणारे ते स्वतंत्रपणे बाहेरही फिरु लागले.नव्या जोमाने लिहू लागले,संगणकावर अकांउटसची कामे करु लागले.सहीसुद्धा करता न येणारे जे.डी.स्वतःच्या हस्ताक्षरात वृत्तपत्राना लिखाण पाठवू लागले. या सर्वाचे श्रेय ते कुटुंबियांच्या सकारात्मक दृष्टिकोनाला देतात.आजारामुळे.मानसिकदृष्ट्या खचलेल्या शुभार्थिला बाहेर काढण्यासाठी.त्यात तो आडमुठा असेल तर फक्त सहचराची शक्ती पुरेशी नाही तर सर्व कुटुंबियानी यासाठी हातभार लावायला हवा हे जेडिंच्या कुटुंबाने दाखवून दिले.पार्किन्सन्स मित्रमंडळात सामिल झाल्यावर याच जेडिनी पुढे घरोघरी भेटी देऊन मानसिक स्वास्थ्य हरवलेल्या शुभार्थीना आणि त्यांच्या कुटुंबियाना नैराश्येच्या गर्तेतुन बाहेर काढण्याच मिशन मोठ्या हिरीरीने हातात घेतल.
                      मित्रमंडळाच्या सभेतील भेटी अपुर्‍या वाटल्याने त्यानी विलास जोशीना बरोबर घेउन घरभेटी सुरु केल्या.या सर्वातुन त्याना आढळले, खर तर शुभंकराची भुमिका मध्यवर्ती आहे पण शुभंकरांकडून ती तकलादु आणि प्रासंगिक स्वरुपात वठवली जात आहे.याबाबतचे त्यांचे विचार त्यानी पुन्हा सकाळच्या मुक्तपीठ मधून लिहिले.शुभंकरासाठी आधारवड हा सुंदर शब्द त्यानी वापरला.आधारवडानी कोणत्या गोष्टीचे भान ठेवले पाहिजे याबाबत त्यानी लेखात विवेचन केले. ( त्यांचे सर्व लेख याथावकाश देत आहे.ते मुळातूनच वाचावेत).'कीव न करता जीव लावा" हा संदेश यातून त्यांनी दिला.
                        मंडळाचे काम आपल्या लिखाणाद्वारे अनेकांपर्यंत पोचविण्यात त्यांचा मोठ्ठा वाटा होता.त्यांच्या लेखामुळे अनेक शुभार्थीच्या  मनात सकारात्मकता आणि चैतन्य निर्माण झाले.पुण्याप्रमाणे परगावचे शुभार्थीही जोडले गेले.'आधी केले मग सांगितले' हा त्यांचा बाणा असल्याने आणि बोलण्यात लिखाणात तळमळ असल्याने त्यांचे विचार मनात ठसत. स्वानुभवावरून त्यांनी                      
' स्वसंवाद, परिसंवाद'या स्मरणिकेतील लेखात 'दिसामाजी काहीतरी ते चालावे ' असे मत नोंदवले आहे त्यांच्या घरभेटीत शुभार्थी व्यायामाचा कंटाळा करतात असे जाणवल्याची तक्रारही केली आहे.ते स्वतः रोज तीन किलोमिटर चालत.
                      काही बाबतीत त्यांची मते ठाम असत.डॉक्टरांची व्याख्याने ठेवण्यास  त्यांचा सक्त विरोध असायचा.पीडीबाबत शुभंकरनी माहिती ठेवावी आणि शुभार्थीनी ठेऊ नये..असे त्यांचे मत होते.त्यांचे हे म्हणणे नाकारून आम्ही व्याख्याने ठेवायचो.मग ते बाहेर बसून नाव नोंदणीचे काम करत. व्याख्यान ऐकणे टाळत.
                      मंडळाची पहिली सहल गेली त्यावेळी ते अनेक दिवसानी सहलीसाठी बाहेर पडले होते.सहल अपेक्षेपेक्षा खूपच यशस्वी झाली.त्याबाबत किती सांगू आणि किती बोलू असे त्यांना झाले होते. घरी पोचल्या पोचल्या त्यांनी एक हाती लेख लिहून सकाळला पाठवला. लगेच तो छापूनही   आला .अनेक पेशंट लेख वाचून फोन करत,घरी भेटायला येत.मग त्यांचा कामाचा उत्साह अधिकच वाढत असे.
                     ११ एप्रिल १०च्या जागतिक पार्किन्सन दिनानिमित्त मेळाव्यात स्मरणिका प्रकाशीत करायचे ठरले.संपादक मंडळात जे.डी. होतेच पहिली सभा त्यांच्याच घरी झाली.त्यांना सगळ्याची घाई असे.त्यांनी एक चांगला दिवस निवडला होता.त्यादिवशी प्रिंटर निवडून सुरुवात करायला हवी असे त्यांना वाटत होते. त्यांनी लगेच स्वत: लेख लिहूनही दिला.काम सुरु होण्यापूर्वीच त्यांना हॉस्पिटल मध्ये ठेवल्याचे कळले.त्यांच्या इतर काही शारीरिक तक्रारीसाठी औषधे घेणे,शस्त्रक्रिया करणे हे गरजेचे होते.पण त्यांचा हट्टीपणा आड आला. त्यांनी ते नाकारले.परिणाम व्हायचा तोच झाला.त्यांना ICU त ठेवले होते.आम्ही भेटायला गेलो तर त्यांची पत्नी म्हणाली,'त्यांचे महत्वाचे अवयव निकामी झालेत.मेंदू  मात्र शाबूत आहे.'त्यांना खूप काही लिहायचे होते.संत साहित्याच्या आधारे सकारात्मक विचार सांगायचे आहेत. असे ते म्हणाले होते.आपल्या पंचाहत्तरीला त्यांनी माझ्याक्डून हक्काने तुकाराम गाथा  घेतली होती.बघा  मी आता कसा छान उपयोग करतो असं म्हणाले होते.पण ते व्हायचे नव्हते.
                    एप्रिल १० च्या स्मरणिकेत जे.डींचा लेख होता.आणि त्यांना श्रद्धांजलीही.मेळाव्यात ते मनोगत व्यक्त करणार होते.पण त्याऐवजी त्यांच्या मुलाने आपल्या भावना व्यक्त केल्या.त्यांच्या आठवणीने सर्वच भावूक झाले. मंडळाचा व्याप वाढत असताना जेडी तुमची सतत आठवण येते.   

                      
                                          
                     

No comments:

Post a Comment