Sunday 9 August 2020

पार्किन्सन्स विषयक गप्पा - ५२

 

पार्किन्सन्स विषयक गप्पा - ५२
परभणी जवळच्या एका गावातून शुभार्थी बोराडे यांचा यावर्षी स्मरणिका अजून कशी आली नाही असा फोन आला.दरवर्षी पार्किन्सन्स दिनानिमित्त च्या मेळाव्यात स्मरणिका प्रकाशित होते.यावर्षी मेळावा झाला नाही.
स्मरणिकाही प्रकाशित झाली नव्हती्.स्मरणिका तयार होण्यापूर्वी lock down जाहिर झाला. त्यामुळे स्मरणिका पाठवणे शक्य झाले नाही.
बघता-बघता मे महिना संपत आला. दरवर्षी स्मरणिका आत्तापर्यंत शुभार्थींना पोचतात. पार्किन्सन्स मेळाव्याला उपस्थित नसणाऱ्यांना पोस्टाने स्मरणिका पाठवल्या जातात. यावर्षी करोनाच्या संकटाने सर्वच फिसकटल होतं. चार एप्रिलला पार्किन्सन्स मेळावा आयोजित केला होता. चार पाच महिन्यापूर्वी एस. एम. जोशी हॉल बुक झाला होता. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मेळाव्याची तयारी टिपेला पोचली होती. स्मरणिका शेवटच्या टप्प्यावर होती. निमंत्रण पत्रिकेचा मसुदा तयार होता. ऋषिकेश पवारची मेळाव्यासाठी शुभार्थींचे नृत्य बसवून घेण्याची तयारी चालू होती. कलाकृतींच्या प्रदर्शनासाठी शुभार्थी कामाला लागले होते.मेळाव्याच्या कामाचे वाटप झाले होते. डॉक्टर शिरीष प्रयाग प्रमुख वक्ते म्हणून येणार होते पु. ल. देशपांडे यांच्या पार्किन्सन्सवर उपचार करणारे डॉक्टर प्रयाग, पुलंच्या आठवणी सांगणार होते. करोनाच्या संकटाने एकदम स्टॅच्यू म्हटल्यामुळे सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे थांबल्या. सर्वच व्यवहार थांबल्याने
आता मेळावा होणार नाही हे न सांगताच सर्वांना समजले असणार असे आम्हाला वाटत होते.बोरांडेच्या उदाहरणाने परगांवच्या आडबाजूच्या गावात याचा अंदाज आला नसावा. अचानक उदभवलेल्या संकटामुळे जेथे करोनाचा भर आहे lock down कडक आहे तेथील समाज मात्र संभ्रमावस्थेत आणि मानसिक तणावाखाली होता. मित्रमंडळी, सगेसोयरे यांच्याकडून या परिस्थितीबाबत कुरकुर ऐकायला येत होती.आम्ही ठरवले आपण फोन करून सभासदांची चौकशी करावी. त्यांना थोडा दिलासा द्यावा. पण झाले उलटेच. अंजली महाजन, सविता ढमढेरे,आशा रेवणकर,मी, सरोजिनी कुर्तकोटी या फोन केलेल्या सर्वांनाच सुखद धक्का देणारा अनुभव आला. कोणाचीच काही तक्रार नव्हती.बहुसंख्यांनी परीस्थितीशी समायोजन केले होते.उलट मला सर्वांनी तुमच्या तब्येतीची काळजी घ्या असे सांगितले. मागच्या गप्पात मी शुभंकर, शुभार्थींना आनंदी कसे राहा सांगणारे विवेचन केले होते.आमच्या शुभंकर, शुभार्थींनी तर कृतीतून मलाच चार गोष्टी शिकवल्या होत्या. मनोविकार तज्ज्ञ डॉ.आनंद नाडकर्णी यांनी त्यांच्या एका भाषणात परिस्थितीचा स्वीकार, परीस्थितीशी जुळवून घेणे आणि त्यानुसार कृती करणे या बाबी अशा संभ्रमावस्थेत आवश्यक असल्याचे सांगितले होते.
आमच्या पार्किन्सन्स मित्राने हे आधीच शिकवल्याने या परिस्थितीत जुळवून घेणे सर्वांना सोपे गेले असावे. अत्यंत गरजेशिवाय घराबाहेर जायचे नाही यासाठीही आमच्या पार्किन्सन्स मित्रांनी आधीच भाग पाडले होते. आमच्या वेगवेगळ्या शुभंकर, शुभार्थींचे Lock down मधील अनुभव आता पुढील गप्पात.

No comments:

Post a Comment