Saturday 30 November 2019

पार्किन्सन्स विषयक गप्पा - ४६

                                              पार्किन्सन्स विषयक गप्पा - ४६
                                  शुभार्थी अश्विनी दोडवाड यांची मुलगी अनुश्रीचा फोन आला.'काकू कितीतरी दिवसांनी आईचा आनंदी आवाज आणि प्रसन्न चेहरा पाहिला.आता सभेलाही पाठवीन.मंडळाचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.'
                             नुकतीच २७ नोव्हेंबरला पार्किन्सन्स मित्रमंडळाची सहल मनाली गार्डन येथे गेली होती. आणि हो नाही करता करता अश्विनीताई सहलीत सहभागी झाल्या होत्या.अश्विनीताई सातत्याने सह्लीना,सभाना येत.अगदी आनंदवनच्या सहलीलाही त्या आल्या होत्या.नृत्योपचारात सहभागी होत्या मंडळाच्या मासिक सभेत ५०/६० जणांसाठी वाढदिवसानिमित्त स्वहस्ताने केलेला उपमा त्यांनी एकदा आणला होता.आणि अशा उत्साही अश्विनीताईंचा हल्ली फोनवर बोलतानाही निराशेचा स्वर असे.त्यांची तीनही  मुले त्यांची काळजी घेतात.केअरटेकर ठेवलेला आहे.असे असले तरी पार्किन्सन्स शुभार्थीना गाठण्यासाठी नैराश्य टपूनच बसलेले असते.त्यांनी वरचढ होण्याच्या आतच त्याला हाकलावे लागते.आणि त्याची हकालपट्टी करण्यासाठी पार्किन्सन्स मित्रमंडळासारखा स्वमदतगट निश्चित उपयोगी पडतो.आणि सहल तर यासाठी हुकमी एक्का.निराशेने ग्रासलेल्या अश्विनीताईंच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे कसब सहलीनी केले होते.दरवर्षी सहलीनंतर असे अनेक सुखद अनुभव येतात.
                            शुभार्थीना आनंद देणाऱ्या सहलीचे आयोजन,नियोजन  २/३ महिने आधीपासूनच केले जाते.पुण्यापासून ३०/४० किलोमीटरवर असणारे निसर्गरम्य ठिकाण निवडले जाते.कार्यकारिणीचे सदस्य प्रत्यक्ष जावून २/३ ठिकाणाची पाहणी करून येतात.त्यातले शुभार्थीना सुखावह होईल असे ठिकाण निवडले जाते.बस अगदी ठिकाणापर्यंत जायला हवी.ठिकाण उंच सखल नको,खूप पायऱ्या नसाव्यात.शौचालय जवळ असावे.कमोड असावा.कार्यक्रम,खेळ यासाठी हॉल हवा.असे सगळे आखुडशिंगी,बहुदुधी हवे.
                         ठिकाण निश्चित झाले की नावनोंदणी सुरु होते.बस ठरवणे संख्येवर अवलंबून असल्याने ठराविक तारीख दिली जाते पण अगदी शेवटच्या दिवसापर्यंत नावे येतच राहतात.आणि अशा उशिरा आलेलया शुभार्थीचे मन मोडणे कठीण होते.त्यांच्यात सहलीमुळे झालेले परिवर्तन पाहून केले ते योग्यच होते असे वाटते.
बसमध्ये शुभार्थीना नाश्ता देतानाही त्यांचा कंप लक्षात घेऊन चमच्याने खाण्याऐवजी उचलून खाता येईल असा मेनू ठरविला जातो.खेळ करमणुकीचे कार्यक्रम यांची रेलचेल असते.एकुणात सहलीचे सर्व नियोजन शुभार्थी केन्द्री असते.सर्वजण लहान मुल बनून मनसोक्त आनंद घेतात.सामुहिक शक्तीतून उर्जा निर्माण होते ती उर्जा अनेक दिवस पुरते.
                     सहलीला परगावहून शुभार्थी शुभंकर येतात.ठाण्याच्या अनुराधा गोखले,महाडचे मधुकर तांदळे,बेळगावचे आशा आणि प्रदीप नाडकर्णी अशी उदाहरणे सांगता येतील.अनेक शुभार्थी परदेशवाऱ्या,भारत भ्रमण करतात तरीही त्यांना मंडळाची ही मिनी सहल आकर्षित करते.९४ वर्षाच्या कलबाग काकांचा  सहलीतील सहभाग सर्वच शुभंकर शुभार्थीना प्रेरणादायी असतो.
                     
                     सहलीपूर्वी शेवटच्या क्षणापर्यंत अनेक अडचणी येतात.तोल जातो,ऑनऑफची समस्या आहे फ्रीजीन्गची समस्या आहे,डिस्काय्नेशियामुळे शरीर सारखे हलते अशा अनेक शुभार्थीना नेताना प्रचंड ताण असतो. सह्लीनंतरच्या शुभंकर, शुभार्थींच्या सुखावणाऱ्या प्रतिक्रिया आणि खुललेले चेहरे पाहून ताण विसरायला होतो.पुन्हा सहल निघते.खरे तर  आमची सहल म्हणजे 'ताण हवासा' असेच म्हणावे लागेल. 

                      
                    

No comments:

Post a Comment