Thursday 6 June 2019

आठवणीतील शुभार्थी - पद्मजा ताम्हणकर.

                                           आठवणीतील शुभार्थी - पद्मजा ताम्हणकर.
                               २३ मे ला शुभार्थी पद्मजा ताम्हणकर यांचे दुःखद निधन झाले.सभेला अगदी पुढे बसणाऱ्या पद्मजाताई आता दिसणार नाहीत.वेळोवेळी होणारा त्यांचा फोनवरील संवाद होणार नाही.स्मरणिकेत त्यांचे लेख,कविता  असणार नाहीत.सहलीत, शेअरिंगमध्ये त्यांचे सुरेल गाणे असणार नाही.वार्षिक मेळाव्यात ईशस्तवनात त्या असणार नाहीत.त्यांच्या प्रेरणादायी आठवणी मात्र काळालाही पुसता येणार नाहीत.शेवटर्यंत त्या आनंदी राहिल्या,कार्यरत राहण्याचा प्रयत्न करत राहिल्या हेही विसरता येणार नाही.
                            मला प्रथम भेटलेल्या पद्मजाताई आणि आता सकारात्मक ठसा सोडून गेलेल्या पद्मजाताई अगदी वेगळ्या होत्या.पार्किन्सन्स मित्रमंडळाची आनंदवनला सहल गेली तेंव्हा त्या मंडळ परिवारात अजून आल्या नव्हत्या.या सहलीची आयोजक जोत्स्ना ओक हिच्या त्या नात्याच्या..सहलीतील सर्व शुभार्थींचा उत्साह पाहून जोत्स्नाला त्यांची उदासीनता जाणवली.स्वमदतगटात सामील झाल्यावर काय जादू होते हेही तिच्या लक्षात आले.तिने पद्मजाताईंना मला भेटण्याचा आणि पार्किन्सन्स मित्रमंडळात सामील होण्याचा सल्ला दिला.
                       पद्मजाताई ,त्यांचा मुलगा आणि पती एक दिवशी आमच्या घरी आले.छान गप्पा झाल्या.आजाराचा स्वीकार आणि पार्किन्सन्ससह आनंदात राहणे.हे गप्पांचे सार मनात ठेवून  मंडळात यायला त्यांनी सुरुवात केली.त्यानंतर मात्र उदासीनता,नैराश्य हे शब्द त्यांच्या जवळपासही फिरकले नाहीत.मंडळाच्या सर्व उपक्रमात त्या हिरीरीने भाग घ्यायला लागल्या.संचार मध्ये शरच्चंद्र पटवर्धन यांनी प्रश्नमंजुषा हे सदर ठेवले त्यासाठी बक्षिसही ठेवले.त्यांनी सलग तीन वेळा प्रथम क्रमांक मिळवला.प्रत्येक स्मरणिकेत स्वत:च्या  लेख आणि कविता दिली.त्यांच्या लेखनात सकारात्मकता ओतप्रोत भरलेली असायची.'एकमेका साह्य करू'.'मन करारे प्रसन्न', 'तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार','आयुष्य एक रांगोळी'  ही शीर्षके त्यांच्या लेख आणि कवितांतील  ही सकारात्मकता दाखवायला पुरेशी आहेत.वाचन त्यातही अध्यात्मिक वाचन अधिक,स्वत:वर केलेले ध्यान,संगीत,ओंकार, इत्यादी पूरक उपचाराचे प्रयोग, त्यांचा अनुभव यांची सांगड घालून त्यांचे लेखन असायचे.
                        सुरात,तालात आणि स्पष्ट उच्चारात गाणे म्हणणे हा त्यांचा विशेष.सहल,शेअरिंग यात त्यांचे  गाणे हे ठरलेले. जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्तचा मेळावा आला की त्याच्या उत्साहाला उधाण यायचे. इशस्तवनात त्या सहभागी असायच्या.अनुपमा करमरकर शुभार्थींच्याकडून ते बसवून घ्यायच्या.त्यासाठी त्या कर्वेनगरहून सदाशिवपेठेत भर उन्हात यायच्या त्यांचे ८५ वर्षाचे पती त्यासाठी त्याना घेवून यायचे.करमरकर यांचे घर तिसऱ्या मजल्यावर. इतका आटापिटा करून इशस्त्वनात भाग घ्यायचा याचे आम्हाला फार अप्रूप वाटायचे.गेली दोन वर्षे नारायण कलबाग या ९६ वर्षाच्या शुभार्थीनी इशस्तवन म्हटले.त्यामुळे त्यांचा सहभाग नव्हता. परंतु मार्च महिन्यातच त्यांचा इशस्तवन बसवायचे ना असा फोन आला.
                      शुभार्थींच्या कलाकृतीच्या प्रदर्शनातही त्यांनी कागदी फुले,पिस्त्याच्या कव्हरची फ्रेम,ग्रीटिंग्ज अशा विविध वस्तू ठेवल्या होत्या.  
जानेवारीत त्या बाथरूममध्ये पडल्या.खूप रक्त गेले. हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागले.त्यातून त्या बऱ्या झाल्या.पण अशक्तपणा खूप होता. सभेला येता आले नाही याची त्यांना हळहळ वाटत होती.फोनवर बोलणे झाले.शरीर साथ देत नव्हते पण मनाचा उत्साह तोच होता.                
                   
त्यांच्या एका कवितेत त्यांनी लिहिले होते,
एकमेकांनी एकमेकांना द्यावा,सकारात्मक विचारांचा ठेवा
असा ठेवा मनात घेऊनच निरोप मला द्यावा.
पद्मजाताई तुम्हाला निरोप नाही द्यायचाय. तुमच्या सकारात्मक विचाराच्या ठेव्यासह तुम्ही आमच्या आठवणीत सदैव हव्या आहात.
                  
    

No comments:

Post a Comment