Friday 24 May 2019

पर्किंन्सन्स विषयक गप्पा - ४१

                                         पार्किंन्सन्स विषयक गप्पा - ४१
                            ' सुसंगती सदा घडो सृजन वाक्य  कानी पडो.' आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर हे गरजेचे आहे याचा मला हल्ली वेळोवेळी प्रत्यय येतोय.आनंदी राहणाऱ्या,सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांची संगत एखादे आजारपण सोसताना,उतार वयात नक्कीच महत्वाची ठरते.परवाचच उदाहरण सांगायचे तर,आम्ही सकाळी, सकाळी सारसबागेत जाऊन आलो आणि मुलींना whats-app वर फोटो टाकले. तसे यात काही विशेष नव्हते.पण आम्ही हे करणे विशेष होते कारण आम्ही असे प्रोग्रॅम आखण्यात तसे अरसिक,निरुत्साही त्यामुळे आईबाबांना अशी काय उपरती झाली असे मुलींना वाटणे साहजिक होते.हा परिणाम होता. पार्किन्सन्स मित्रमंडळातील हौशी,उत्साही  व्यक्तींच्या संगतीचा.
                            मंडळाचा कार्यक्रम संपल्यावर घरी जाताना आमच्याबरोबर अंजली महाजन होती.सारसबागेसमोर आल्यावर मी म्हणाले, 'सारसबागेत येउन कितीतरी  वर्षे झाली. आता इतक्या पायऱ्या चढणे उतरणे अशक्यच वाटते'. अंजली म्हणाली, 'मी परवा केशवरावांना घेऊन आले होते. सुंदर कमळे फुललेत ती दाखवायची होती.खूप खुश झाले हे.रिक्षा थांबवली होती त्याच रिक्षाने परत आलो'.मला तिचे कौतुक वाटले.केशवरावांचा पीडी वाढला आहे.ऑफ पिरिएड ( औषधाचा परिणाम कमी झाल्यावर दुसरा डोस घेऊन तो लागू होईपर्यंत अजिबात हालचाल करता येत नाही.ताठरता येते.) अधिक असतो.अंजली तिसऱ्या मजल्यावर राहते. त्यांना उतरवून खाली आणणे ही सुद्धा कसरतच असते.अशा अवस्थेत केवळ कमळांचा आनंद घेण्यासाठी ती सारसबागेत जायचा विचार करु शकते.माझ्या नवऱ्याची परिस्थिती केशवरावांच्या तुलनेत खूप चांगली आहे.मुख्य म्हणजे त्यांना ऑन,ऑफ पिरिएडचा त्रास नाही. थोडा अशक्तपणा आहे. पाठीत वाकल्याने पूर्वीच्या तुलनेत चालणे कमी झाले आहे. 'मग चलो सारसबाग' असा माझ्या मनाने निर्णय घेतला आणि लगेच अमलात आणला कारण हे उसने अवसान होते.लगेच ओसरलेही असते.
                      आमचे कौटुंबिक मित्र अरुण शिंदे रिक्षा चालवतात.शाळांना सुट्टी असल्याने ते मोकळेही होते.सकाळी आठ वाजताच गेलो शिंदेनी बाजुच्या गेटनी रिक्षा कारंजापार्यंत नेली.तिथल्या फक्त पायऱ्या चढाव्या लागल्या.छान दर्शन झाले.कारंजे,कमळे पाहून मन तृप्त झाले.शिंदेना घेवून आता पुण्यातील विविध ठिकाणी मधुनमधून जायचे ठरवले आहे.पण यासाठी मंडळाचा सत्संग महत्वाचा आहे.बरेच जण लांबून येतात.येण्याजाण्यावर वारेमाप पैसा खर्च होतो,वेळ जातो.एक शुभंकर म्हणाले,डॉक्टर,औषधोपचार यावर आम्ही कितीतरी पैसे घालवतो.येथे येणे हा मनावर उपचारच असतो त्यामुळे पैसे खर्च झाले तरी काही वाटत नाही.मिटींगला यायला शुभार्थीही उत्सुक असतात.
                      १३ मेला  शेअरींगच्या प्रोग्रॅम झाला.याचाही  प्रत्येकावर असाच सकरात्मक परिणाम झाला असेल.आमच्या दोघांच्या अनुभावाव्रून मी हे नक्की सांगू शकते.
                     'I am enjoying my parkinsons'  असे सांगणारे डॉक्टर जावडेकर,नांदेडहून मुद्दाम सभेला आलेले,तेथल्या वृत्तपत्रात रोजच्या सदरासाठी स्वहस्ताक्षरात लेखन देणारे  शुभार्थी डॉ. बा.दा.जोशी अशा अनेकांनी पीडी सह आनंदी कसे राहायचे याचे उदाहरणच घालून दिले.यांच्यावर स्वतंत्रपणे गप्पात लिहिणार आहे.
                          
   




                 

No comments:

Post a Comment