Monday 15 October 2018

पार्किन्सन्सविषयी गप्पा - २८

                                          पार्किन्सन्सविषयी गप्पा -
             
                  मागच्या गप्पात आपण अंजलीने पतीच्या पीडीच्या अवस्थेनुसार वेगवेगळ्या पातळ्यांवर कसे बदल केले हे पाहिले.
                आशा रेवणकर यांनीही फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकवायला नियमित जाण्याचे काम  थांबवले.बालभारतीमध्ये पाठ्यपुस्तक लेखनाचे रोजचे काम तसेच एस.एस.सी बोर्डातील रिसोर्स पर्सन म्हणून काम मात्र चालू ठेवले.हे काम करताना त्या फोनवर उपलब्ध राहू शकतात.त्यांचे पती एकटे राहू शकतात.ते ब्रिज चाम्पियन आहेत अजूनही खेळायला जातात परंतु एकदा ते रस्त्यात पडले.अशी वेळ आली तर फोनवर त्या लगेच उपलब्ध असणे त्याना महत्वाचे वाटले.आणि त्या व्याख्यान देत असल्या तर फोन  बंद ठेवायच्या.आता त्या बराच वेळ घरी असल्याने नकळत त्यांचे पती आनंदी असतात.
               शशिकांत देसाई सुरुवातीची काही वर्षे सभेला एकटेच येत.नंतर त्यांची पत्नी  वसूही सभेला येऊ लागली.देसाईंचा पीडी थोडा वाढला होता.तोल जाणे सुरु झाले,भासही होत.पण वसू नियमित त्यांना सभेला घेऊन येते.सहलीला येते.दिनानाथ हॉस्पिटलमधील गृपलाही नेते.आमची कार्यकारिणी सदस्य असल्याने त्या मिटींगलाही ती त्याना घेऊन येते.तिला लक्षात आले त्यांचे वाचन टी.व्ही.पाहणे अशा सर्व गोष्टी बंद झालेत.ते फक्त बसून असतात.तिने वेळीच त्यांच्या activity वाढतील असे प्रयत्न सुरु केले.त्याना ज्येष्ठांसाठी असलेल  'रेनबो डे-केअर सेंटरचा पर्याय सापडला.सकाळी ९.३० ते ५ पर्यंत ते तेथे राहतात.त्यांची बस न्यायला सोडायला येते.विविध खेळ असतात.समवयस्क असतात. हळू हळू ते हसायला,बोलायला लागले आहेत.
                 एकदा पीडी झाला कि तो कधी न कधी वाढणार आहे हे वास्तव समजून घेऊन त्याला हाताळले की पीडीसह अनादी राहणे सोपे जाते.पीडीच्या वाढीची टांगती तलवार सतत डोक्यावर बाळगायची नाही.आणि जेंव्हा वाढ होते त्यावेळी.हताश न होता घाबरून न जाता त्याच्याशी समायोजन साधण्यासाठी योग्य उपाय करायचा असा समतोल साधण्याची कसरत  शुभंकरालाच करावी लागते.
                            आता या अवस्था म्हणजे नेमके काय ते पाहू. 
                       पार्किन्सन्सचे निदान झाले कि' हा आजार कधीही बरा होणारा नाही. आणि वाढत जाणारा आहे' असे सांगितले जाते. 'असे असले तरी आजार समजून घेऊन योग्य औषधोपचार,व्यायाम,आजाराचा स्वीकार,शुभंकर,स्वमदत गटाचे सहकार्य  या आधारे लक्षणावर नियंत्रण आणता येते. आणि जीवनाची गुणवत्ता वाढवता येत'अशी जोड दिल्यास पहिल्या विधानातील नकारात्मकता आणि भयावहता कमी होते.आमच्या अनेक शुभार्थिनी असे गुणवत्तापूर्ण जीवन जगून आदर्श घालून दिला आहे.
                 आजार वाढत जाणारा आहे. म्हणजे आज निदान झाले.आणि लगेच चार आठ दिवसात तो वाढला असे होत नाही.पीडीच्या अनिश्चितता आणि अनाकलनीयता या स्वभावाचे प्रत्यंतर येथेही येते.प्रत्येकाच्या बाबत वाढीचा वेग वेगळा असतो.या आजाराच्या लक्षणांच्या अवस्थेनुसार पाच अवस्था सांगितल्या जातात.पहिली अवस्था निदान झाल्यावरची लक्षणे दिसू लागण्याची आणि पाचवी शयाग्रस्ततेची.याबाबत फार खोलात न शिरता याबाबतची लिंक सोबत देत आहे.माझ्या पाहण्यात पहिल्या दुसऱ्या अवस्थेतच अनेकजण बराच काळ असतात.मी यातली तज्ज्ञ नाही त्यामुळे याबाबत खोलात न जाता   शुभंकराची  भूमिका कशी महत्वाची  आहे एवढेच  सांगायचे आहे.
https://parkinsonsdisease.net/basics/stages/
                  
अधिक माहितीसाठी हा ब्लॉगही पहा :
http://parkinson-diary.blogspot.in/
www.parkinsonsmitra.org ही वेबसाईटही पहा.
Parkinson's Mitramandal, Pune( https://www.youtube


             


No comments:

Post a Comment