Monday 22 May 2017

चूक पथ्यावर पडली.

                     घर सोडून एकदोन दिवस जरी कुठे बाहेर जायचे असले तरी आठवणीने प्रथम औषधे बरोबर घ्यावी लागतात.पार्किन्सन्सची औषधे तर सगळीकडे मिळतीलच असे नाही म्हणून जबाबदारीने घ्यावीच लागतात.आम्ही मुलीकडे ८/१० दिवसासाठी गेलो आणि शेवटच्या दिवशी ह्यांच्या  गोळ्या कमी पडतात असे लक्षात आले. तातडीने जवळच्या मेडिकल शॉपमध्ये गेलो नशिबाने गोळ्या मिळाल्या.दुकानदाराने तुम्हाला पीडी आहे का? विचारले.मग आम्ही  हा धागा पकडून पार्किन्सन्स मित्रमंडळाची माहिती सांगितली त्यांच्याकडे कोणी पेशंट येत असल्यास पाठविण्यास सांगितले.त्यांनी खूपच उत्सुकता दाखवली.आमचा फोन नंबर,सभा जेथे होतात त्या अश्विनी हॉटेलचा पत्ता, वेबसाईट अशी माहिती लिहून घेतली.मी पेशंट तर पाठ्वेनच पण मलाच यावेसे वाटले असे ही म्हटले.आम्ही काही वेळापूर्वी गोळ्या विसरणे ही तुझी चूक की  माझी चूक असे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत होतो ते आता एकदम म्हणालो,' गोळ्या विसरलो चांगले झाले.'
                          आम्ही घरी आलो आणि दोन दिवसातच खडकीच्या पिलये नावाच्या पेशंटचा फोन आला.ते आम्हाला भेटण्यास उत्सुक होते.आणि ते नेमके माझ्या मुलीच्या सोसायटीत राहणारे निघाले.आमच्याकडे त्यांनी येण्याऐवजी मुलीकडे आम्ही पुन्हा जाणार होतो त्यावेळी भेटायचे ठरले.त्याप्रमाणे पती पत्नी दोघेही आले. आमच्या तासभर गप्पा झाल्या.पहिल्याच भेटीत आमचे छान जमले.खूप दिवसाची ओळख असल्यासारखे वाटले.त्यांना पीडी होऊन ९ वर्षे झाली होती.इंजिनिअर असलेले पिलये कल्याणी फोर्ज मधून मोठ्या हुद्द्यावरून निवृत्त झाले होते. आपल्याला इतक्या दिवसात या ग्रुपची माहिती का झाली नाही असे त्यांना वाटत होते.लगेच whats app ग्रुपमध्ये ते  सामील झाले.मातृभाषा मराठी नसली तरी मराठीतून असलेली वेबसाईट पाहण्याची त्यांना उत्सुकता होती.पुन्हा एकदा वाटले गोळ्या विसरलो ते चांगले झाले.आणखी एक प्रकर्षाने जाणवले आपली लोकांपर्यंत माहिती पोचविणारी यंत्रणा अधिक सक्षम करायला हवी.
                          
                     

No comments:

Post a Comment