Monday, 13 January 2025

आठवणीतील शुभार्थी - अश्विनी दोडवाड

                                     आठवणीतील शुभार्थी - अश्विनी दोडवाड

               

              अश्विनी दोडवाड यांची पहिली भेट हृशिकेशच्या डान्स फॉर पार्किन्सन या पुणा हॉस्पिटलमध्ये झालेल्या कार्यक्रमात झाली.त्या माझ्या शेजारीच बसल्या होत्या.त्यांचा मुलगा हृषीकेशचा मित्र होता.मी त्यांना मंडळाची माहिती सांगितली आणि त्या सामील झाल्या.त्यांची मुले त्यांना सभाना आणत.कधी त्या बसने एकट्याही येत.नंतर त्यांनी वारज्याला मुलीच्या जवळ घर घेतल शिक्षिका असल्याने आमचे दोघींचे विशेष मैत्र जमले.एकत्र आनंदवन ट्रीप केल्याने ते अधिकच दृढ झाले.त्यांची मुले ही मंडळाशी सबंध ठेवून आहेत.

    त्यांच्या मुलांपैकी ओंकार हे युरोपात आहेत. मुलगी  अनुश्रीचे  लग्न झाले आहे.आणि धाकटे ऋषिकेश हे आईसोबत असतात. आईला जेव्हा पार्किन्सन्सचं निदान झालं तेव्हा हृषीकेश बारावीत होता. उत्तम शिक्षिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या अश्विनीताई विद्यार्थ्यांच्या आवडत्या शिक्षिका होत्या.माणसांमध्ये मिसळणे, त्यांना निरनिराळे पदार्थ करून खायला घालणे हे आवडायचे.२००७ मध्ये अनुश्रीचा विवाह झाला. आता जावयाला चांगले चुंगले खायला घालायचे होते.त्याच वेळी पार्किन्सन्सचे निदान झाले.

     पार्किन्सन्स झाल्यानंतर हे सारे कमी होऊ लागले. मात्र नृत्योपचार आणि पार्किन्सन्स मित्रमंडळातील त्यांचा वावर यामुळे त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय फरक पडला.हृशिकेशच्या पार्किन्सन आणि नृत्योपचार यावर केलेल्या फिल्मच्या अनावरण प्रसंगी याची एक अतीशय गोड आठवण त्यांच्या मुलीने सांगितली.

        अश्विनीताईना रव्याचे लाडू उत्तम बनवता येत असत.अनुश्रीच्या मते ती तीची सिग्नेचर डीश होती.ते बनवून लोकांना खाऊ घालण्याची त्यांना हौसदेखील होती.मुलांच्या मित्रमैत्रिणी त्यांच्या स्वयंपाकाच्या फॅन होत्या.पार्किन्सन्सने ते कसब आपल्या हातून हिरावून नेले याची त्यांना खंत वाटत असे. मात्र नृत्योपचार आणि मंडळातील सकारात्मक उर्जा यामुळे त्यांचे हात पुन्हा चालू लागले.त्यांनी रव्याचे लाडू करणे सुरु केले.याचा त्यांना अपार आनंद झाला.आईच्या चेह्ऱ्यावरचा आनंद पाहून आणि बऱ्याच दिवसाने आईच्या हातचे लाडू खाल्ल्याने मुलेही खुश झाली.एकदा अश्विनी लॉजमधील मासिक सभेला त्यांनी ४०/५० जणांसाठी स्वत: उपमा बनवून आणला होता.

           त्या मित्रमंडळाच्या अनेक सहलींमध्ये सहभागी झाल्या. पीडी वाढल्यानंतर मात्र सहलीला जाणे त्यांना नको वाटायला लागले होते.एका सहलीला मी त्यांना खूप आग्रह केला त्यांना आनंदवनच्या सहलीची आठवण दिली.तेंव्हाही त्या आधी नाही म्हणत होत्या.त्यावेळी त्यांच्या एका नातलगाचे निधन झाले.विधीसाठी नरसोबाच्या वाडीला गेल्या होत्या तेथे त्यांना गारव्याने सर्दी खोकला झाला.ताप आला या सर्वामुळे थोडा अशक्तपणा आला.त्याहीपेक्षा जास्त त्या मनाने खचल्या होत्या.

           मी सहलीला येणार नाही असा त्यांचा फोन आला.सहलीचे पैसे आधीच भरले होते रिझर्वेशन झाली होती.ते रद्द केल्याने जे पैसे मिळतील तेवढेच पैसे मिळणार होते.बाकी पैसे परत मिळणार नव्हते.आनंदवनला मी या आधी एकदा सहलीसाठी आणि एकदा फ्लॉवर रेमेडी शिकावायला १५ दिवस गेले होते.तेथे जाऊन आल्यावर शुभार्थी भरपूर उर्जा घेऊन येणार याची मला खात्री होती.अश्विनीताईनाही सहल झेपणार असे मला वाटत होते.शेवटी त्या तयार झाल्या.त्यांच्या जाऊबाई बरोबर आल्या होत्या.

        वर्ध्यापर्यंत रेल्वेचा प्रवास होता.गरीबरथ मधील प्रवास अन्त्याक्षरी,गप्पा,एकमेकिनी आणलेल्या खाण्याची देवाण घेवाण असा मजेचा झाला.माझे सर्व लक्ष अश्विनीताईवर होते.त्या आनंदात दिसत होत्या.वर्ध्याला सेवाग्राम,गांधी आश्रम पाहून  पाहून तेथून बसने आनंद्वनला जायचे होते.तेथे जेवण आणि थोडा आराम करून लगेच हेमलकसाला जायचे होते.मी या आधी गेले तेंव्हा दोन  दिवस आनंद्वनला राहून नंतर हेमलकसा होते.रात्रीच्या प्रवासाने दमलेल्या शुभार्थीना हे कसे झेपेल याची मला काळजी वाटत होती.

        आनंदवनला पोचल्यावर तेथे विकासभाऊंचे व्याख्यान सुरु होते. ते ऐकूनच प्रवासाचा शिण विसरून सर्व चार्ज झाले.जेवण थोडा आराम झाल्यावर हेमलकसाला जाण्यासठी सर्व बसमध्ये बसलो.आणि एवढ्यात डॉ.भारतीताई आमटे आल्या.मी आणि आमच्याबरोबर स्वयंसेवक म्हणून आलेल्या निरूपमला त्या म्हणाल्या,तुम्ही जाऊ नका मी सर्वाना जमवले आहे फ्लॉवररेमेडीच्या फीडबॅक क्लाससाठी.असे सर्वाना अर्ध्यावर सोडून थांबणे मला अपराध्यासारखे वाटत होते.करमरकर पती पत्नी,अंजली,प्रकाश जोशी आणि आमचे अहोही म्हणाले,भारतीताई इतका आग्रह करतात तर थांबा तुम्ही. आम्ही आहोत.मी सहल संयोजक जोत्स्नाला पुन्हा पुन्हा सांगत होते.अश्विनीताईकडे लक्ष दे. 

          हेमलकसाहून सर्व मंडळी आली.जोत्स्नाने अश्विनी ताईना माझ्यासमोर उभे केले आणि म्हणाली या पहा तुमच्या अश्विनीताई.त्यांच्याकडे पाहून मी थक्क झाले. चेहरा आंनदाने फुलून गेला होता.पार्किन्सन पळून गेला होता.मी त्यांना घट्ट मिठी मारली.दोघींच्याही डोळ्यात आनंदाश्रू होते.शब्दात सांगता न येणारे स्पर्शातून समजले होते. 

      अनुश्रीनी १०१५ च्या स्मरणिकेत "पार्किन्सन: ओळख, प्रवास व लढाई" असा लेख दिला होता त्यात लिहिले होते आनंद्वांची सहल आईच्या दृष्टीकोनाला कलाटणी देणारी ठरली.कुष्टरोग्यांच्या आजारापुढे आपली तब्येत छान आहे ही भावना झाली.

         सहलीनंतरही सभेत भेटी होत.फोनही होत.कधी आनंदी तर कधी निराशेचा सूर असे.त्यांच्या जीवनात आनंदी आनंद देणारा क्षण आला.बरेच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर २०१५ मध्ये अनुश्रीला मुलगी झाली.आता आज्जीबाई बाळंतपण आणि नातीचे कोडकौतुक करण्यात गुंग झाल्या.पार्किन्सन्स पुन्हा पळाला.त्यांच्या नातीला पाहायला जायचे आम्ही कितीतरी वेळा ठरवले.पण ते जमले नाही.फोनवरून त्यांचा आनंदी स्वर ऐकताना आनंद व्हायचा.

         मी ज्या सहलीवरून आनंदवन पुराण सांगितले,त्या सहलीला माझे बोलणे ऐकून त्या केअरटेकरला घेऊन आल्या.सहलीचा आनंद लुटला.रात्री अनुश्रीचा फोन आला,"काकू आज किती दिवसांनी मी आईच्या चेहऱ्यावर हसू पहिले. मंडळाचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत".

      करोनामुळे लॉकडाऊन झाला आणि समाजात मिसळण्याची हौस असलेल्या अश्विनी ताईना एकटे पडल्यासारखे झाले. अशावेळी अनेकदा पार्किन्सन्स पेशंटना नैराश्य येऊन त्यांचा आजार वाढतो असं दिसलं आहे. त्या काहीवेळा घरातच पडल्या. एक मुलगा घरात, एक बाहेरदेशी, आणि मुलीचे लग्न झालेले. घरात येणार्या काम करणार्या मावशीदेखील लॉकडाऊनमुळे येण्याचे थांबलेल्या.अशावेळी या तिन्ही मुलांनी आईला नैराश्य येऊ नये याची खबरदारी घेतली. यासाठी कामे वाटून घेतली.आईने केलेल्या संस्काराचे हे फलित होते.

                       सर्वप्रथम अनुश्रीनी आईला तीन वेळचा डबा पाठवण्यास सुरुवात केली. ते घेण्यासाठी ऋषिकेश त्यांच्या घरी येत असे. त्याला आणि अनुश्री यांना वर्क फ्रॉम होम सुरु झाले होते. त्यामुळे फारसा वेळ मिळत नव्हता.आईचे प्रत्यक्ष सारे काही करण्याची जबाबदारी ऋषिकेशने उचलली होती.

         त्यात कधी कधी अंघोळ घालण्यापसून सारी कामे तो करीत होता.भूमिका बदलल्या होत्या.तो आता आईची आईच झाला होता.अशावेळी जेव्हा हे दोघे आपापल्या कामात व्यस्त असतील तेव्हा आईचे एकटेपण दूर करण्याची जबाबदारी परदेशात असलेल्या ओंकार यांनी उचलली. ते व्हिडीओ कॉल करून आईशी बोलू लागले. त्यांना सुंदर सुंदर फोटो दाखवणे, आजाराबद्दल सोप्या भाषेत माहिती देणे, इतरही अनेक गप्पा मारणे असे करून त्यांनी आपल्या आईची मनस्थिती सकारात्मक ठेवली.अनुश्रीची मुलगी अभिश्रीही आपल्या आजीशी बोलत असे. अनुश्रीचे पतीदेखील  गरज पडेल तेव्हा मध्यरात्रीसुद्धा सासूबाईंच्या मदतील हजर असत.या तिन्ही मुलांचे एकत्रित अनुभव 'भेटू आनंदे"  कार्यक्रमात युट्युबवर आहेत ते आवर्जून पाहावेत.

         झुमवर डान्स क्लास सुरु झाल्यावर काही काळ त्या सामील झाल्या. पण त्यांचा पार्किन्सन वाढतच गेला.त्या नवीन घर पाहायला या असे सारखे बोलवत होत्या पण जाणे जमले नाही.फोनवर मात्र बोलणे व्हायचे.  

          शेवटीअस्पिरेशन न्युमोनिया होऊन दोन आठवड्याच्या लढयानंतर  त्या आपल्याला सोडून गेल्या.

                 मुले आणि जावई यांचे अश्विनी ताईंशी शुभंकर म्हणून नाते लोभसवाणे होते.एकमेकातील सामंजस्याने या तिघांनी  शेवटच्या क्षणापर्यंत आईची सेवा केली.असे उदाहरण विरळाच.

        त्यांच्या निधनानंतर अनुश्रीचा एकदा फोन आला.काकू एकदा तुमच्या घरी यायचे आहे.आईची तुम्हाला भेटायला यायची खूप इच्छा होती. आईचे जे जे करायचे राहिले होते ते ते मी करणार आहे.

       वृद्धांचे पालकत्व या ग्रुपवर पर्किन्सन्स मित्रमंडळाच्या फेसबुक लाईव्हवर अनुश्री शुभंकर म्हणून उपस्थित होती.तिच्या ऑनलाईन मिटिंग मधून थोडा वेळ काढून ती आली होती.तिने शुभंकर म्हणू करीत असलेल्या भूमिकेबद्दल दिलेली माहिती ऐकून मुलाखत घेणाऱ्या मेधा कुलकर्णी म्हणाल्या,"तुझ्यासारखी मुलगी सर्वाना लाभो." अश्विनी ताई गेल्या तरी आपल्या भावंडांची आई बनणारी,अश्विनीताईंचे संस्कार घेऊन आलेली अनुश्री त्यांची उणिव भरून काढायला आमच्याबरोबर आहे हे थोडे समाधान. 

 

 

             


आठवणीतील शुभार्थी - दिनेश पुजारी

                                            आठवणीतील शुभार्थी दिनेश पुजारी

              आम्ही घरभेटी करत असताना औंध,बाणेर,पाषाण,बावधन  या परिसरात अनेक शुभार्थी राहात.इतक्या लांब ह्यांनी गाडी चालवत जाणे हे माझी मुलगी  सोनाली हिला  काळजीचे वाटत होते.यासाठी तिने पर्याय सुचवला.ती पाषाण बाणेर रोडला राहते. तिच्याकडे आम्ही आठ दिवस राहायचे आणि तिची गाडी आणि ड्रायव्हर घेऊन घरभेटी करायच्या.आम्हालाही ते पटले.या काळात आम्ही औंध मध्ये राहणार्या जोत्स्ना आणि दिनेश पुजारी यांच्याकडे गेलो.

       पुजारीना नोकरी चालू असतानाच २००१ मध्ये पीडी चे निदान झाले.ते लाईफ इन्शुरन्स मध्ये होते.त्यांना ऑफिसमधून औषधाचा खर्च मिळत होता.पण त्यांनी त्यावर पाणी सोडले.

            त्यांना आपल्याला पार्किन्सन्स झाला आहे हे कोणाला सांगायचे नसायचे.आमच्याशी बोलता बोलता त्यांना असे लपवणे म्हणजे पार्किन्सन्सचा स्वीकार करण्यातील अडथळा आहे हे लक्षात आले.ह्यांच्याकडे पाहून पार्किन्सन्स न लपवता एक मोठ्या हुद्द्यावरचा शुभार्थी पार्किन्सन्सला मिरवत आहे याचाही त्यांच्यावर परिणाम परीणाम झाला असावा.नंतर दोघेही सभांना सहलींना येऊ लागले.२०१२ पर्यंत ते फोर व्हीलर चालवत होते.म्हणजे पीडी झाल्यावर ११ वर्षे ते कार चालवत होते.

          जोत्स्ना तर उत्तम कार्यकर्ती झाली.जागतिक पार्किन्सन्स मेळावा सुरु झाल्या पासून आजतागायत ती सभेस येणाऱ्या व्यक्तींच्या रजिस्ट्रेशनची जबाबदारी घेते.मासिक सभेचे फोन करते.पुजारीही टेकवडे यांच्या नेत्र शिबिराला एकटे आले होते. स्पीच थेरपीला भारती विद्यापीठात आलेल्या वेळी एकटे आमच्या घरी येऊन गेले.औंधपासून इतक्या लांब एकटे यायचा विचार करणे हेच धारिष्ट्याचे होते.नंतरही एकटे बाहेर जाण्याचा आत्मविश्वास होता.पण जोत्स्नाला आणि इतर कुटूम्बियानाही त्यांचा तोल जात असल्याने एकटे पाठवणे योग्य वाटत नव्हते.

            नंतर पार्किन्सन्स वाढला तसे त्यांचे बाहेर जाणे कमी झाले तरी ते जोत्स्ना बरोबर सभेला सहलीला येत.जोत्स्नाने त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राखण्यासाठी जीवाचे रान केले.त्यांना व्यायाम करण्याची आवड नव्हती ती मागे लागून करून घेई.अनेकदा पडत.हॉस्पिटलला न्यायची वेळ येत नसे. पॅॅनिक न होता बारा क्षार उपचार ती करत असे.त्यांना घरी बसून सोशल फोबिया येऊ नये म्हणून ती डे केअर सेन्टरमध्ये काही दिवस ठेवत होती.

         त्यांचा पीडी वाढत गेला तसा,ते आनंदी राहावेत त्यांचा पीडी नियंत्रणात यावा यासाठी जोस्नाने आटापिटा केला.रोज काही तरी नवीनच पुढे उभे राहायचे.जोस्ना त्याचे व्हिडीओ काढून डॉक्टरना पाठवायची.त्यांच्याशी करायची त्यांनी सांगितलेले उपाय आणि बाराक्षार या आधारे एकदाही हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल मध्ये ठेवावे लागले नाही.जोस्नाने कधी आई,कधी मैत्रीण कधी उपचारक तर कधी कडक शिक्षक बनत दिनेश यांच्या पीडी जास्तीत जास्त सुकर कसा होईल हे पाहिले.हे करताना स्वत:ला स्पेस दिली. आणि पार्किन्सन मित्रमंडळाची कामेही केली.दिनेशनाही ही पार्किन्सन्सने अनेक रूपे दाखवत घाबरवले तरी त्यांची जगण्याची उमेद संपली नव्हती.

झुमवरील "भेटू आनंदे" मध्ये या कार्यक्रमात तिने हे तिचे अनुभव सांगितले आहेत.एका शुभंकराची निकराची झुंज कशी असते हे या अनुभवातून समजेल.हे अनुभव सर्वांनी अवश्य ऐकावेत,पाहावेत.

           


आठवणीतील शुभार्थी - अनिल कुलकर्णी

                                              अनिल कुलकर्णी
 
 
                              २००८ मध्ये शीलाताई आणि त्यांची अनिल कुलकर्णी यांची प्रथम भेट झाल्यापासून किती किती आठवणींचा पट डोळ्यासमोर उभा राहत आहे.पती पत्नी दोघानाही पार्किन्सन्स अस विरळा दिसणार उदाहरण. प्रथमच पाहत होतो.ते एकमेकांचे शुभंकर होते.त्या दोघांच्या बाबतीत विरळा म्हणता येतील अशा अनेक बाबी नंतरही दिसतच राहिल्या. मुलगा इंग्लंडला मुलगी अमेरिकेला.ते दोघेच राहत तरीही त्यांचा गोतावळा मोठ्ठा होता.ड्रायव्हर कम केअर टेकर शीलाताईंची वेगळी केअरटेकर.स्वयंपाकाची, कामाची बाई.त्यांच्या फार्म हाउसवर राहणारे एक जोडपे हे सर्व त्यांच्या कुटुंबाचा भाग होते.अमेरिकेतील सपोर्ट ग्रुप पाहून असाच ग्रुप इथ काढायचा हे स्वप्न घेऊन हे दोघही आले होते.शेंडे पटवर्धन द्वयींनी असे काम आधीच सुरु केले होते मग ते आमच्यातच सामील झाले.अनिल कुलकर्णी केपीआयटीचे व्हाइस प्रेसिडेंट होते.शीलाताई डॉक्टर होत्या.
               अनिल कुलकर्णी यांच्यामुळे इ मेलचा वापर सुरु झाला.इमेलवरून मिटिंगचा अजेंडा पाठवला जाऊ लागला.विचारांची देवाणघेवाण सुरु झाली.मला हे नवीन होते.मनावर प्रेशर होते.कुलकर्णी जोडप्याशी भेटी वाढू लागल्या आणि प्रेशर कमी होऊन मैत्री कधी झाली समजलेच नाही.
                  त्यांच्या येण्याने मंडळाच्या कामाला एक शिस्त आली.अनिल कुलकर्णी यांनी स्वमदत गट म्हणजे काय नाही.स्वमदत गट म्हणजे काय? पार्किन्सन्स मित्रमंडळ या स्वमदत गटाची रचना,उद्दिष्टे,त्यासाठी प्रत्यक्ष कृतीची दिशा असा आराखडाच तयार केला.त्यामुळे कामाला एक निश्चित दिशा मिळाली.
                 अनिल  यांचा पार्किन्सनवर बारकाईने अभ्यास चालू असे.एका स्मरणिकेसाठी संपादकीय आणि दोन स्मरणिकेत त्यांनी उत्तम लेख लिहून दिले होते.एका स्मरणिकेत पार्किन्सन्स आजारात वापरल्या संज्ञांची ग्लोसरी दिली होती.स्वत:च्या पार्किन्सन्सचे ते बारकाईने निरीक्षण करत,त्यांच्या न्यूरॉलॉजिस्टनी त्यांना गोळ्या कमी जास्त करण्याची परवानगी दिली होती.अर्थात निरीक्षणावर आधारित त्यांचे मत सांगून ते बदल करत. 
                           
             कोथरूड गटाचे ते प्रमुख असताना झुबीन बलसारा यांची ड्रम थेरपी वर्कशॉप आयोजित केले होते.पुणे हॉस्पिटलनि त्यांच्या रौप्य महोत्सवाबद्दल वर्षभर महिन्यातून एकदा आपला हॉल मंडळाला मोफत दिला तोही त्यांच्यामुळेच.  
                   आपल्या फार्महौस मधील कोंदण बंगल्यावर सर्वांना घेऊन जाणे तिथली ताजी भाजी देणे हे त्यांना फार आवडायचे.दोनदा  मंडळाची  सहल त्यांच्या फार्म हाउसवर गेली. सुचित्रा दाते यांचा डान्स क्लास,मिटिंग यात कुलकर्णींचा सहभाग असला की आनंदाचे वातावरण असे ते आणि राजीव ढमढेरे विनोद सांगत.माझी फिरकी घेणे स्वत:वर ही विनोद करणे हा त्यांचा आवडता उद्योग असे.हृशिकेशच्या डान्स क्लासमध्येही ते सामील झाले होते.                   


   पार्किन्सन्स मित्रमंडळ संस्था रजिस्टर झाली.तेंव्हातर त्यांची प्रकर्षाने आठवण आली.ते मंडळात जॉईन झाल्यावर अगदी पहिल्या दिवसापासून संस्था रजिस्टर करू असा त्यांचा आग्रह होता.त्यादृष्टीने त्यांनी हालचालीही सुरु केल्या होत्या.शेंडे साहेब,करमरकर हेही याबाबत आग्रही होते.संस्था नुकतीच मूळ धरू लागली होती.इतरांना इतकी घाई नव्हती.अनिल कुलकर्णी केपीआयटी मधून व्हाईस प्रेसिडेंट म्हणून निवृत्त झाले होते.त्यांची व्हिजन मोठ्ठी होती.त्यांना संस्थेचे भवितव्य दिसत होते.त्यासाठी संस्था रजिस्टर करण्याला पर्याय नव्हता.
                     त्यांच्या पार्किन्सनस विषयाच्या ज्ञानाबद्दल, विद्वत्तेबद्दल, तर्कशुद्ध,वस्तुनिष्ठ विचार करण्याबद्दल, सर्वांनाच आदर . यामुळेच रेडिओवरील भाषण असो,अनिता अवचट संघर्ष सन्मान  पुरस्काराची मुलाखत असो सर्वानुमते त्यांची निवड झाली होती.संस्था रजिस्टर करायची असे निश्चित  झाल्यावर अध्यक्ष म्हणून त्यांचेच नाव पुढे आले.त्यांनी ते स्वीकारलेही.पण त्याच दिवशी घरी गेल्यावर कार्यकारिणीच्या  सर्वाना त्यांची मेल आली.
"First of all, thank you for electing me for the post of President of Parkinson’s Mitramandal which I accepted, in the heat of the moment. I have had some second thoughts and I would like to decline the offer for the following reasons.

It is the case of, as they say, ‘the spirit is willing but the flesh is weak’. I would have really liked to accept your offer. However, looking at the present state of my health, I will not be able to do justice to this important position. My ‘off’’ periods are getting longer and more severe. I suffer bouts of freezing and pain. In the last few months, I  have had several falls, at home and outside, including one on a staircase. I have a problem in going out in the sun as the eyes take a long time in adjusting to the sun. I have a problem in getting into dark places as well. As a result, I am mostly confined to the house. As you witnessed at the felicitation function, by Dr. Avchat Pratishthan, I suffered a total break down of speech. I have stopped going to crowded places and also unfamiliar places unless accompanied by a close family member. Adjusting my age for Parkinson’s, I am over 75. Unfortunately, my condition is going to be only worse and not better

All this means that I will not be able to fulfill my commitments to the organization as the role demands mobility and physical and mental fitness.  

I request you to elect some other person for this role.

Needless to say, I will be available to play roles that require less formal commitments"
त्यांच्या शेवटच्या वाक्याला शेवटचा श्वास घेई पर्यंत ते जागले.ते जाण्या आधी दोन तीन दिवस शरच्चंद्र  पटवर्धन त्यांना भेटायला गेले होते.'मी स्मरणिकेसाठी माझ्या  सर्व आजाराच्या अनुभवावर लेख लिहित आहे " अस ते सांगत होते. त्यांच्या खुसखुशीत शैलीतला आजारावरही विनोद करणारा लेख पूर्ण व्हायचा राहूनच गेला.जाताना ते ५०००० रु.ची देणगी  मंडळासाठी ठेवून गेले.
त्यांची ही मेल आम्हा सर्वांच्याच  भावना हेलावणारी होती.तसेच त्यांच्याबद्दलचा आदर दुणावणारी होती.त्यांचा वावर इतका सकारात्मक होता की आजारांनी इतक्या साऱ्या वेदना त्यांना सोसाव्या लागतात आहेत हे लक्षातच आले नव्हते.शुभार्थिनी स्वत:च्या आजाराकडे इतके तटस्थपणे पाहून त्याचे स्वरूप समजून घेणे,त्याला स्वीकारणे आणि ते सर्वांच्यासमोर मांडणे सोपे नव्हते.
अशी अनिल कुलकर्णी यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारी अनेक मेल माझ्या मेल बॉक्समध्ये आहेत आणि ती डिलीट करावीत असे मला वाटत नाही.त्यांच्या उमद्या स्वभावाची,मंडळासाठीच्या योगदानाबद्दलची नेहमीच आठवण येत राहील.अनिलसर तुम्ही अजून हवे होतात.