इच्छ्युक पेशंटनी आपले सर्व रिपोर्ट,चालू असलेल्या गोळ्या प्रथम भेटीत दाखवाव्या.असे डॉ.पाटील यांनी सांगितले.
अनेक शुभार्थीनी संशोधनात सहभागी होण्यासाठी नवे नोंदविली.
चहा बिस्किटांचा खर्च वाढदिवसानिमित्त शरच्चंद्र पटवर्धन यांनी केला.उषा काळे यांनी पेढे दिले.
जागतिक पार्किन्सन्स दिवस मेळावा ११ एप्रिल वृत्त
रविवार दिनांक १0 एप्रिल रोजी लोकमान्य
सभागृह, केसरी वाडा येथे जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त मेळावा आयोजित
केला होता.एप्रिलच्या भर उन्हात दुपारी साडे चारला कार्यक्रमास २०० ते २५० शुभंकर शुभार्थी आणि हितचिंतक उपस्थित
होते
सुजाता हरगुडेने काढलेल्या सुंदर रांगोळीमुळे प्रसन्न मनाने
सर्व आत प्रवेश करत होते.चाफ्याचे फुल देऊन सर्वांचे स्वागत केले गेले.
गणेश वंदना आणि त्यानंतर' हमको मनकी शक्ती दे' या
आत्मिक बळ देणाऱ्या' प्रार्थनेने सभेला सुरुवात झाली.प्रार्थनेत विनया
मोडक. वसुधा बर्वे,पद्मजा ताम्हणकर, सविता
ढमढेरे आणि अंजली महाजन, या शुभार्थी आणि शुभंकरांनी सहभाग
घेतला.संवादिनीवर
त्यांच्या गुरु अनुपमा करमरकर होत्या
.
संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन व संचालन सौ.आशा रेवणकर यांनी आपल्या ओघवत्या आणि माहितीपूर्ण शैलीत
केले.मंडळाचे संस्थापक सदस्य श्री शरच्चंद्र पटवर्धन यांनी आपल्या प्रास्ताविकात श्रोत्यांशी संवाद साधला.
( स्मरणिकेत हे प्रास्ताविक समाविष्ट केले आहे.)
सुरुवातीचा
कार्यक्रम शुभार्थींच्या नृत्याविष्काराचा होता.त्यांचे संचालन हृषीकेश
पवार आणि प्रियशा यांनी केले.लय,
तालबद्ध व नियंत्रित हालचाली यांनी कार्यक्रम सुरुवातीसच खूप
उंचीवर गेला.
प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला उभे राहून सलामी
दिली.नृत्यामध्ये विलास जोशी,प्रज्ञा जोशी,मृत्युंजय हिरेमठ,शरद
सराफ,प्रभाकर आपटे,सौ लेले,विजय देवधर,शशिकांत देसाई,श्री.देसाई,कर्नल
पी.व्ही.चंद्रात्रेय या शुभार्थिनी आणि ,सौ.शेंडे या शुभंकरानी सहभाग
घेतला.या सर्वांच्या आणि हृषीकेशच्या साडे सात वर्षाच्या परिश्रमाचे हे
फलित होते.हृषीकेशने या उपक्रमाची फोटोसह माहिती हावर्ड युनिव्हर्सिटीच्या
अल्टरनेटीव थेरपीत समाविष्ट झाल्याचे सांगितले.२०१५/१६ मध्ये तयार
झालेल्या डान्स फॉर पार्किन्सन्स या फिल्मचे अमेरिकेच्या 'मायकेल जे फॉक्स
रिसर्च' सेंटरमध्ये स्क्रीनिंग झाले तो अनुभवही आनंददायी होता असे
सांगितले.अत्यंत सहज हालचाली करणाऱ्या श्री सराफ यांच्या पायात नुकताच रॉड
घातला आहे हे सूत्र संचालिकेने सांगितले तेंव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले.
यानंतर
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉक्टर विद्याधर वाटवे यांचे श्री.शरच्चंद्र पटवर्धन
यांच्यासह मंचावर आगमन झाले.सर्वांनी उभे राहून मानवंदना दिली.यानंतर श्री
पटवर्धन यांनी पुष्पगुच्छ देऊन
पाहुण्यांचा सत्कार
केला.पाहुण्यांच्या सत्कारानंतर गेली आठ वर्षे अश्विनी हॉटेल
कार्यक्रमासाठी मोफत देणारे श्री.देवस्थळी,नृत्योपचारासाठी स्वत:च्या
घरातील हॉल गेली सात वर्षे देणाऱ्या सुमन
जोग,दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या वृषाली बेलेकर,स्मरणिकेच्या प्रत्येक
अंकात माहेश्वरी बँकेची जाहिरात देणाऱ्या उर्मिला तोष्णीवाल यांचा सत्कार
करण्यात आला.
मंडळ दरवर्षी या कार्यक्रमात स्मरणिका
प्रकाशित करते.डॉक्टर विद्याधर वाटवे यांच्या हस्ते टाळ्यांच्या गजरात
स्मरणिकेचे प्रकाशन झाले.
डॉक्टर वाटवे यांनी स्वत:ची ओळख स्वत:च
करून देणार असल्याचे सांगितले होते.त्यांनी एमडी,डीपीएम.ही वैद्यकीय
क्षेत्रातील पदवी व पदविका प्राप्त केली आहे.पुना हॉस्पिटलच्या
स्थापनेपासून ते तेथे कार्यरत आहेत. अखिल भारतीय मानसोपचार तज्ज्ञ संघटनेचे
ते अनेक वर्षे अध्यक्ष होते.जागतिक मानसोपचार तज्ज्ञ संघटनेचेही ते सदस्य
आहेत.
आपल्या व्याख्यानात डॉक्टर वाटवे यांनी प्रथम पार्किन्सन्स
आजार म्हणजे काय, त्याची लक्षणे याबद्दल माहिती सांगितली.पार्किन्सन्स
पेशंटला होणाऱ्या मानसिक आजाराचे निदान करताना प्रथम पीडीची
औषधे,डायबेटीस,बीपी इ.ची औषधे याचा काही परिणाम आहे का हे पाहावे
लागते.त्यानुसार पुढे औषधोपचार करावे लागतात.पीडी पेशंटबाबत न्युरॉलॉजीस्ट
हा टीम कप्तान असतो.
पार्किन्सन्स मध्ये होणाऱ्या मानसिक आजारात
प्रथम क्रमांक डिप्रेशनचा.४०% पेशंटमध्ये ते आढळते.काही वेळा डिप्रेशन
निदान झाल्यावर त्या धक्क्यातून तात्कालिक असे ते असते.डोपामिनची पातळी
कमी झाल्यानेही उदभऊ शकते. काहीवेळा पीडीची इतर लक्षणे दिसण्यापुर्वी लक्षण
म्हणूनही डिप्रेशन आढळते.यासाठी दिल्या जाणाऱ्या औषधाने काही वेळा
कॉन्स्टिपेशन,अस्वस्थता असे साइड इफेक्ट होतात.शॉक ट्रिटमेंट हा सर्वात
सुरक्षित उपचार आहे. पण त्याबाबत गैरसमज आढळून येतात.सिनेसृष्टीतील
अतिरंजित कथा यात भर टाकतात.
यानंतर येतो चिंतातूरता( anxiety ) हा
आजार.यात विविध प्रकारची भीती,काळजी येते.यासाठी anti anxiety
औषधे,समुपदेशन,सायको थेरपी यांचा उपयोग होतो.
निर्विकारता ( Apathy )
बऱ्याच पेशंटमध्ये दिसते.हा औषधाचा परिणामही असू शकतो.याशिवाय
सायकोसीस,यात hallucination,delusion यांचा समावेश होतो.काही वर्तन
समस्याही असतात.
डिमेन्शीया,यात बुद्धी,भावना,व्यक्तिमत्वाचा हळूहळू
ऱ्हास होतो हाही काहीजणात संभवतो.पूर्वी मानसोपचाराच्या औषधाने पीडी
वाढायचा परंतु आता अनेक नविन औषधे आली आहेत.या सर्वावर न्युरॉलॉजीस्टआणि
मानसोपचार तज्ज्ञ यांच्या सहाय्याने उपचार करता येतात.शुभंकराची भूमिकाही
महत्वाची असते.
भाषणात शेवटी प्रार्थना, नृत्य यांचे त्यांनी कौतुक केले.स्वमदत गटही मानसिक आधारासाठी सहाय्यक ठरत असल्याचे सांगितले.
यानंतर श्रोत्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली.
रामचंद्र करमरकर यांनी विविध निवेदने केली.
दीपा होनप यांनी आभारप्रदर्शनाचे काम अत्यंत भावपूर्ण शब्दात केले.
शेवटी
सर्व उपस्थितांचे तोंड पेढ्यांनी गोड करून कार्यक्रम संपला.उपस्थित
शुभार्थीना स्मरणिका मोफत देण्यात आल्या.सभेस येऊ न शकलेल्याना पोस्टानी
पाठवण्यात येतील असे जाहीर करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यात
अनेक स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग असतो.छपाईचे काम करताना इतरही मदत
करणारे विनय दिक्षित, येणाऱ्यांची नोंद् ठेवणारे व स्वागत करणारे सुनंदा
गोडबोले,रेवती हर्डीकर,सुहास हर्डीकर,अरुंधती जोशी;पुस्तक विक्रीचे काम
करणारे हरिप्रसाद व उमा दामले,अजित कट्टी,विनया व मोरेश्वर मोडक,हे सर्व
आमचेच आहेत.त्यांचे नेहमीच सहकार्य असणार आहे याची खात्री आहे.
या
कार्यक्रमाचे व्हिडीओ शुटींग आणि फोटो काढण्याचे काम शशांक साठे आणि
प्रशांत शेंडे यांनी उत्तमरीत्या केले आहे.वेबसाईटवर ते देण्यात
येईल.कार्यक्रमास उपस्थित राहू न शकलेल्याना कार्यक्रमाचा आस्वाद घेता
येईल.
मे २०१६ वृत्त
होमिओपॅथिक संशोधन
भारती विद्यापीठाचा होमिओपॅथी विभाग आणि संजीवन होमिओपॅथी,हेल्थकेअर आणि
रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांच्या
२६१ व्या जयंतीनिमित्त 'पार्किन्सन्सवर होमिओपॅथीक उपचार' असा संशोधन
प्रकल्प हाती घेतला आहे.भारती विद्यापीठातील एमडी करणारे डॉक्टर्स
पार्किन्सन्स रुग्णांची वर्षभर मोफत तपासणी करून व उपचार करतील.संजीवन
होमिओपॅथी,हेल्थकेअर आणि रिसर्च सेंटरचे डॉक्टर संजीव डोळे आणि भारती
विद्यापीठाच्या होमिओपॅथी विभाग प्रमुख प्रो.डॉक्टर अनिता पाटील यांचे
त्यांना मार्गदर्शन असणार आहे.
यासाठी स्वेच्छेने
नावे द्यायची होती.५८ पेशंटनी नावे दिली.या प्रकल्पाची पहिली फेरी पूर्ण
होत आली
आहे.पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या मदतीने,कोथरूड,अश्विनी
हॉटेल,सहकारनगर,घोले रोड असे पेशंटच्या सोयी साठी गट करण्यात आले.कोथरूड
गटासाठी वासू आणि शशिकांत देसाई,सहकारनगर साठी राजीव आणि सविता ढमढेरे
यांनी आपल्या घरात तपासणी साठी चोख व्यवस्था केली होती.अश्विनी हॉटेल तर
आमच्या हक्काचे झाले आहे.घोले रोडला डॉक्टर डोळे यांच्या दवाखान्यात तपासणी
चालू आहे.इतर गटातील पेशंटची तपासणी पूर्ण झाली.
कुलश्री
राजगुरू,प्रणिता कानडे,निष्ठा अग्निहोत्री,सागर नीटवे,ग्यानप्रकाश
श्रीवास्तव या डॉक्टर्सनी प्रत्येक पेशंटची जवजवळ तासभर केस हिस्ट्री घेऊन
तपासणी केली.
जे पेशंट काही अडचणीमुळे येऊ शकले नाहीत त्यांच्या साठी
हे सर्व डॉक्टर डॉक्टर संजीव डोळे यांच्या दवाखान्यात १० जून पर्यंत
सोमवार ते बुधवार सकाळी १०.३० ते १ आणि संध्याकाळी ५.३० नंतर उपलब्ध असणार
आहेत.यापूर्वी ज्यांनी नावे दिली नाहीत ते पेशंटही या संधीचा लाभ घेऊ
शकतील.
यानंतर डॉक्टर संजीव डोळे सर्व पेशंटची तपासणी करतील.
मित्रमंडळाचे काम फक्त समन्वयाचे आहे.पेशंटनी स्वत:च्या जबाबदारीवर यात सहभागी व्हावयाचे आहे.
निवेदन
गुरुवार दि.१२ मे रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.
डॉक्टर मानसी देशमुख यांचे ' स्मरणशक्ती आणि ब्रेन जिम' या विषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान होणार आहे.सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु ४.३० वाजता
१२मे २०१६ सभेचा वृत्तांत
गुरुवार दि.१२ मे रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने डॉक्टर मानसी देशमुख
यांचे ' स्मरणशक्ती आणि ब्रेन जिम' या विषयावर व्याख्यान आयोजित केले
होते.त्या क्लिनिकल सायकोलॉजीस्ट आहेत आणि 'Mind-trail Intellectual
services,Psychological services and research center' च्या संचालक आहेत.
सभेस ६० जण उपस्थित होते.
नेहमीप्रमाणे प्रार्थनेने आणि त्यानंतर एप्रिल आणि मे महिन्यात जन्म असलेल्या शुभंकर शुभार्थींचे
वाढदिवस साजरे करून सभेस सुरुवात झाली.
व्याख्यानात
सुरुवातीला डॉक्टर मानसी देशमुख यांनी पार्किन्सन्स आजार,त्याची
लक्षणे,मेंदूच्या विविध भागाची कार्ये. याबाबत उल्लेख केला.हे व्याख्यान
नाहीतर कार्यशाळा आहे असे सांगत कॉगनीटीव्ह इम्पेंअरमेंट आणि त्यात
सुधारणा करण्यासाठी घरच्या घरी शुभंकरालाही करता येतील अशा करावयाच्या
विविध कृती,खेळ,छोटे प्रयोग यावर भर दिला.कॉगनीटीव्ह हा शब्द वापरतो
तेंव्हा त्यात विचार करणे,स्मरणशक्ती,संघटन,लक्ष केंद्रित करणे, अशा विविध
बाबी येतात.पीडी पेशंटमध्ये कॉगनीटीव्ह इम्पेंअरमेंटमुळे सुरुवातीला सौम्य
स्वरूपाचे बदल होतात.कामाची अमलबजावणी,लक्षकेंद्रित करणे इत्यादीत अडचणी
निर्माण होतात,विचार प्रक्रिया मंदावते त्यामुळे अपेक्षित काम पूर्णत्वास
नेण्यास विलंब लागतो.
योग्य शब्द सापडण्यास त्रास होतो.हे सांगताना
त्यांनी अल्झायमर आणि पीडीमुळे येणाऱ्या समस्या यातील फरक स्पष्ट
केला.पीडीमध्ये डीक्शनरी असते शब्दही उपलब्ध असतात परंतु हालचाली
मंदावल्याने डीक्शनरीपर्यंत पोचायला वेळ लागतो.विचार प्रक्रिया
मंदावल्याने शब्द सापडायला वेळ लागतो. अल्झायमरच्या बाबतीत मात्र
डीक्शनरीची पानेच कोरी असतात.त्यामुळे सुधारण्यासाठी वाव नसतो.पीडीमध्ये
मात्र तो असतो.ब्रेनजीमने दैनंदिन जीवनातील अडचणींची तीव्रता कमी करू
शकतो.१९८७ मध्ये प्रथम ब्रेनजीम ही संज्ञा वापरली गेली.
स्मरणशक्ती
म्हणजे पूर्वीचे अनुभव आणि शिकलेल्या गोष्टींचा खूप मोठा साठा
असतो.स्मरणश्क्तीचेही लाँग टर्म मेमरी,शॉर्टटर्म मेमरी,वर्किंग मेमरी असे
प्रकार असतात.यासाठी आणि विविध कॉगनीटीव्ह कौशल्यांसाठी
डॉक्टर मानसी
यांनी काही कृती( activity ) करवून घेतल्या.यात Visual
scanning,लक्षपूर्वक ऐकणे,शब्द आठवणे,हालचाली आणि विचारप्रक्रियेवर
नियंत्रण ठेवण्यासाठी कोडींग,Acrochart इत्यादींचा समावेश होता.यानुसार
शुभंकरानी रोज शुभार्थीकडून करवून घेणे अपेक्षित आहे.तीच कृती पुन्हा
पुन्हा केल्याने कौशल्यात सुधारणा होते.सातत्य महत्वाचे.या कृती
करण्यापूर्वी शुभार्थीची ही कौशल्ये कोणत्या पातळीवर आहेत हे तपासता येतील
अशी ३९ प्रश्नांची प्रश्नावली त्यांनी दिली.ही प्रश्नावली म्हणजे
मान्यतापत्र ' Quality of Life scale and memory scale.' आहे.काही दिवस
सातत्याने activity केल्यावर पुन्हा ही प्रश्नावली भरून काही फरक झाला आहे
का हे पाहायचे.इंग्लंड,अमेरिकेत तज्ज्ञ सायकॉलॉजिस्ट हे करतात. पण
आपल्याकडे याला अजून इतके महत्व दिले जात नाही.परंतु या स्केलनुसार घरी
करवून घेणे शक्य आहे.शुभंकराने शुभार्थीची मानसिकता समजून घेणे यासाठी
महत्वाचे आहे.थेरपी आणि ब्रेनजीम यातील फरकही त्यांनी
सांगितला.उदासीनता,भयगंड,चिंताग्रस्तता इ.साठी थेरपीची गरज असते.या सर्वात
मला बदलायचं आहे हा दृष्टीकोनही महत्वाचा असल्याचे सांगितले.
यानंतर श्रोत्यांच्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.
मित्रमंडळ
हा आता एक परिवार झाला आहे.मित्रमंडळ सदस्यांना आपल्या आनंदात सर्वाना
सहभागी करून घ्यावेसे वाटते.वसू देसाई यांचा नातू ९५ % गुण मिळऊन दहावी
उतीर्ण झाल्याने त्यांनी सर्वांसाठी पेढे आणले,सविता ढमढेरे यांना नात
झाल्याने त्यांनी काजूकतली वाटली तर आशा रेवणकर यांनी वाढदिवसाबद्दल चहा
बिस्कीटे दिली.
निवेदन
गुरुवार दि.१४ जुलै रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.
वैद्य नरेंद्र पेंडसे यांचे ' पार्किन्सन्ससाठी आयुर्वेद' या विषयावर व्याख्यान होणार आहे.सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु. ४ वाजता
Press ? for Keyboard
निवेदन
गुरुवार दि.११ ऑगस्ट रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित
केली आहे. न्युरॉलॉजिस्ट डॉक्टर सुयोग दोषी यांचे व्याख्यान होणार
आहे.सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु. ४ वाजता
११ ऑगस्ट सभेचे वृत्त
गुरुवार दि.११ ऑगस्ट रोजी पार्किन्सन्स
मित्रमंडळाने हॉटेल अश्विनी येथे न्युरॉलॉजिस्ट डॉक्टर सुयोग दोषी यांचे
व्याख्यान आयोजित केले होते.व्याख्यानास ६० जण उपस्थित होते.प्रार्थनेने
सभेस सुरुवात झाली.शोभना तीर्थळी यांनी सुयोग दोषी यांची ओळख करून दिली.
डॉक्टरनी
आपल्या व्याख्यानात अनैच्छिक हालचाली ( dyskinesia ),ताठरता,posture,तोल
जाणे अशा विविध लक्षणाबाबत आणि औषधोपचार,शस्त्रक्रिया इत्यादीबाबत माहिती
सांगितली.
पार्किन्सन्स मध्ये हालचाली मंदावतात.पण डीस्कायनेशियाचा
त्रास सुरु होतो तेंव्हा त्या वाढतात. साधरणपणे लहान वयात पीडी झालेल्यांना
ही शक्यता जास्त असते. आणि लीओडोपा बरेच दिवस घेतल्यावर ही शक्यता वाढते.
त्यामुळे लहान वयात पीडी झालेल्याना आणि सुरुवातीची अवस्था असताना डोपामीन
अगोनीस्ट औषधे दिली जातात.यातही डीसेंबल आणि नॉनडीसेंबल असे प्रकार
असतात.नॉनडीसेंबल पूर्ण बंद करता येत नाहीत. स्वीकारावे
लागतात.डीसेंबलमध्ये डोस अॅड्जेस्ट करून थोडी सुधारणा होऊ शकते पण त्यात
ताठरता वाढते.डीबीएस शस्त्रक्रिया हाही उपाय आहे.Amantadine,paciten यांचा
डीस्कायनेशियावर उपयोग होऊ शकतो परंतु त्यातून काही पेशंटना भास,मानसिक
समस्या सारखे साईड इफेक्ट होण्याची शक्यता असते.हे लक्षात घेऊन उपाययोजना
करावी लागते.
posture आणि gait ची समस्या पीडी वाढत गेल्यावर निर्माण
होते.मेंदूकडून आपोआप होणाऱ्या प्रतिक्रिया असतात त्याही कमी
होतात.फ्रीजिंग म्हणजे पुतळा होण्याची समस्या निर्माण होते.यावर कोणतेही
औषध नाही.फिजिओथेरपीचा उपयोग होतो.कसे उठायचे, कसे चालायचे, रात्री उठताना
काय खबरदारी घ्यायची,कमोड कसा वापरायचा यासाठी मार्गदर्शन करून समस्येचे
थोड्या प्रमाणात निराकरण करता येते.
शस्त्रक्रिया कोणासाठी यावरही
डॉक्टरांनी मोलाच मार्गदर्शन केल.शस्त्रक्रिया करताना कोणाची करावी याचे
निकष महत्वाचे.PSP, MSA या समस्या असणाऱ्यांना शस्त्रक्रियेचा उपयोग होत
नाही.ज्याना सिंडोपाचा उपयोग होतो त्यांच्यासाठी शस्त्रक्रिया योग्य
ठरते.नॉनमोटार लक्षणावर शस्त्रक्रियेचा उपयोग होत नाही.शस्त्रक्रियेत
इन्फेक्शन,ब्लीडींग होण्याची इतर शस्त्रक्रियेप्रमाणेच रिस्क असते.
यानंतर श्रोत्यांच्या अनेक प्रश्नांना डॉक्टरनी उत्तरे दिली.
शुभंकर
आणि शुभार्थी यांचे वाढदिवस यानंतर साजरे करण्यात आले.वाढदिवसानिमित्त
अश्विनी दोडवाड यांनी इडली चटणी तर अनिल शिरोडकर यांनी चहा दिला.
यानंतर
भारती विद्यापीठाच्या होमिओपॅथी कॉलेजच्या डॉक्टरांनी त्यांच्या संशोधनात
सहभागी असलेल्या शुभार्थीकडून फीडबॅक घेतला.काही नवीन शुभार्थिनी संशोधनात
सहभागी होण्यासाठी नावे दिली.प्रार्थनेने सभेची सांगता झाली.
पुढील
महिन्यातील कार्यक्रम, दुसरा गुरुवार, गणेशोत्सवात येत असल्याने पहिल्या
गुरुवारी होणार असल्याचे आणि हृषीकेश पवार यांनी नृत्योपचाराची दुसरी बॅच
बुधवार व गुरुवार संध्याकाळी ४ ते ५ या वेळात सुरु केली आहे असे जाहीर
करण्यात आले.
निवेदन
गुरुवार दि.१ सप्टेंबर रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने कार्यशाळा आयोजित
केली आहे.
प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या
न्युरोफिजिओथेरपिस्ट
डॉक्टर नेहा सिंग आणि त्यांच्या विद्यार्थिनी या कार्यशाळेचे संयोजन
करणार आहेत प्रत्येक शुभार्थीची स्वतंत्रपणे तपासणी केली जाणार
आहे.सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु.३ वाजता
गुरुवार दि.१ सप्टेंबर १६ च्या कार्यशाळेचे वृत्त.
गुरुवार दि.१ सप्टेंबर रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने फिजिओथेरपी कार्यशाळा आयोजित
केली होती.
लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या 'डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम कॉलेज ऑफ फिजिओथेरपी'च्या
न्युरोफिजिओथेरपिस्ट
प्राध्यापक
डॉक्टर नेहा सिंग त्यांचे सहकारी आणि विद्यार्थिनी अशी ४५ जणांची टीम या
कार्यशाळेसाठी खास लोणीहून आली होती.या टीमसह एकूण ९० जण कार्यशाळेत
सहभागी होते.
डॉक्टर नेहा सिंग, २०१२ साली मंडळाने फिजिओथेरपी
कार्यशाळा आयोजित केली होती तेंव्हा डी.वाय.पाटील कॉलेजच्या पदव्युत्तर
अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी म्हणून सहभागी होत्या.त्यांचा पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा
प्रकल्प पार्किन्सन्सवर आधारित होता.आज त्या स्वत: प्राध्यापक म्हणून
कार्यशाळेचे आयोजन करत होत्या.अश्विनी मध्ये त्यांची टीम दोन वाजताच हजर
झाली.मंडळाचे कार्यकर्ते ठरल्याप्रमाणे अडीच वाजता गेले तर नेहा आणि टीमची
गरजेनुसार टेबल खुर्च्या मांडून,बॅनर लावून पूर्व तयारी झाली होती.शुभंकर,
शुभार्थीही येऊ लागले होते.त्यामुळे वेळेत कार्यक्रमास सुरुवात झाली.
सुरुवातीला शुभार्थी कडून अनुमती पत्रक (consent form ) भरून घेऊन
प्रत्येकाला बिल्ले लावण्यात आले.प्रत्येकाचे वजन,उंची,बी.पी. पाहण्यात
आले.विद्यार्थिनीनी शुभार्थींचे assessment form भरले. एकूण ३६ शुभार्थी
होते.स्टेशन १,२,३,४ अशा पाट्या टेबलसमोर लावल्या होत्या.मधल्या भागात
शुभंकर आणि ज्यांची तपासणी झाली आहे त्या शुभार्थींची बसायची व्यवस्था केली
होती.शुभार्थींचे, कंप,तोल जाणे,ताठरता, पोश्चर अशा समस्येनुसार वर्गीकरण
केले होते. त्यानुसार वेगवेगळ्या स्टेशनवर शुभार्थींना बसवले
गेले.प्रत्येक शुभार्थीबरोबर एक विद्यार्थिनी होती.प्रत्येक शुभार्थीला
पुरेसा वेळ देऊन शिस्तबद्धपणे प्रत्येकाच्या शंकांचे निरसन करत, माहिती आणि
व्यायाम सांगण्याचे काम सुरु होते..छापील माहिती असलेली पत्रकेही देण्यात
आली.एकीकडे ३.३० वाजता डॉक्टर नेहा यांनी कार्यशाळेचे प्रयोजन आणि माहिती
सांगितली.चार वाजता सर्वाना एकत्र बसवून सर्वांकडून कार्डियाक एक्सरसाईज
म्हणजे चेअर एरोबिक्स करून घेतले.प्रत्येक शुभार्थीच्या शेजारी एक
फिजिओथेरपिस्ट होता.समोर डॉक्टर साहिल घोरपडे,डॉक्टर रॅचेल नगरकर हे दोन डेमॉन्स्ट्रेटर होते.याशिवाय डॉक्टर नेहाही स्वत:एक्सरसाईज कसे करायचे हे दाखवत होते.यात खालीलप्रमाणे एक्सरसाईज शिकवले.
१)march
pass २)stretch & swipe ३) tap & clap ४) एक आणि तीनचे एकत्रीकरण
५) दोन आणि तीनचे ६) दोन्ही हात जोरजोरात झटकणे.हे सर्व करताना काय काळजी
घ्यायची हेही सांगितले.उदाहरणार्थ
नाश्त्याआधी करणे,जेवणानंतर १ ते दीड तासाने करणे,आरश्यासमोर बसून १,२,३,४ असे अंक मोजत करणे हे
महत्वाचे असल्याचे सांगितले.
याशिवाय हात आणि पाय यांचे कोआर्डीनेशन,श्वासोच्छवास,पोश्चर,कॉन्सन्ट्रेशन या गोष्टीही महत्वाच्या असल्याचे सांगितले.
या
सगळ्या भरगच्च कार्यक्रमात नेहमीप्रमाणे वाढदिवसही साजरे करण्यात
आले.वाढदिवसानिमित्त उषा चौधरी यांनी काजू डिलाईट आणि शीला कुलकर्णी यांनी
चॉकलेट दिली.
शुभंकर कल्याणी कुलकर्णी या छोट्या मोठ्या कामासाठी
ऑनलाईन केअरटेकर पुरविणारी संस्था सुरु करणार आहेत त्याबद्दल त्यांनी
माहिती सांगितली.डी.वाय.पाटील कॉलेजमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या
विद्यार्थिनी असलेल्या देविका भिडे यांना नृत्य आणि फिजिओथेरपी यांची
सांगड घालून पार्किन्सन्ससाठी प्रकल्प करावयाचा आहे त्यासाठी शुभार्थिनी
सहभागी व्हावे अशी त्यांनी विनंती केली.
अडीच तीनला सुरु असलेला हा भरगच्च कार्यक्रम सहा वाजेपर्यंत चालला.डॉक्टर नेहा यांनी केलेले नियोजन,
दीपा
होनप,अरुंधती जोशी,सविता ढमढेरे, वसू जोशी या कार्यकर्त्यांनी केलेली
धावपळ,त्यांना अनेक शुभंकरांची साथ, शुभार्थीं चा उत्स्फूर्त सहभाग यामुळे
कार्यक्रम यशस्वी होऊ शकला.
निवेदन
गुरुवार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.यावेळी
डॉक्टर श्रीधर चिपळूणकर यांचे 'पार्किन्सन्स आणि पोश्चर' याविषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान होणार आहे.
सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु ४ वाजता
१३ ऑक्टोबर मासिक सभा वृत्त
गुरुवार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी
पार्किन्सन्स मित्रमंडळाने हॉटेल अश्विनी,येथे सभा आयोजित केली
होती.यावेळी डॉक्टर श्रीधर चिपळूणकर यांचे 'पार्किन्सन्स आणि पोश्चर' या
विषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान झाले.सभेस ७०/८० शुभंकर, शुभार्थी
उपस्थित होते.आशा रेवणकर यांनी वक्त्यांची ओळख करून दिली.काहीतरी वेगळे
करण्यासाठी औषधाविना आजार बरा करणे अशी संकल्पना घेऊन डॉक्टर चिपळूणकर
यांनी प्रॅक्टीस सुरु केली.जवळजवळ १० हजार विविध आजाराच्या पेशंटनी याचा
फायदा घेतला.त्यांच्या दवाखान्यात गेल्या गेल्या 'Visit before you take
medicine' अशी पाटी दिसते.त्यांनी आयुर्वेदातील एमडी पदवी मिळवली.त्यानंतर
डिप्लोमा इन फिजिओथेरपी,पॅथालॉजीत पोस्ट ग्रॅज्युएशन केले.स्पोर्ट
सायन्स,स्कीन एजिंग आणि रीज्युवेनेशन या विषयातील विविध पदव्या देश परदेशात
मिळवल्या.या सर्वातून स्वत:ची वेगळी उपचारपद्धती विकसित केली.
पार्किन्सनन्स
बरा होत नाही आणि सतत वाढत जाणारा आजार आहे हा विचार घेऊनच पीडी पेशंट जगत
असतो.औषधाव्यतिरिक्त, तुम्हीच तुमचे डॉक्टर बना, यासाठी आजार समजून घ्या
असा सल्ला त्यांनी दिला.यासाठी त्यांनी वेदनेचे उदाहरण दिले.बुटात खडा
अडकल्यास पटकन समजते, आपण तो काढून टाकतो.झोपेतही काही चावल्यास
प्रतिक्षिप्त क्रियेने शरीर मागे घेतो.वेदनेपासून दूर होण्याची इच्छा
त्यामागे असते.मेंदू हा सुपर कॉम्प्युटर आहे. वेदनेला प्रत्येकाची वेगवेगळी
प्रतिक्रिया असते.प्रत्येकजण क्षमतेनुसार सहन करत जातो.वेदना वाढल्यावर
भीती,काळजी वाटते. वेदना समजून घेण्यासाठी वेदना कधीपासून हे पहायचं.
प्रत्येकांनी आपला उपाय शोधायचा.बरेच जण वेदनाशामक औषधे घेतात यातून
अॅसिडीटी वाढते.वेदना दुसरीकडे फक्त ढकलली जाते.आपण वरून काही चोळतो
तेंव्हाही झुमझुमते.त्यामुळे लक्ष वेदनेपासून दुसरीकडे वळवले जाते.
आजारातून बरे होण्यासाठी प्रतिकारशक्ती, विचारशक्ती वाढवली तर शरीर स्वत:च औषध तयार करु शकेल.
शरीर
करत नसेल तर ते करण्यासाठी काय करायचं? आपल्याच मेंदूला कामाला
लावायचं.मेंदूचा ४% भागच आपण वापरतो.आणखी वापरायचा.यासाठी पक्षाघाताचे
उदाहरण त्यांनी दिले.डावा हात पॅरलाईज झाला असेल तर उजवा हातही तसाच
डाव्याप्रमाणे ठेवायचा.तसेच पाहत राहायचे हे करताना आपण दमतो.घाम
येतो.हळूहळू उजव्या हाताची दोन बोटे हलवायची.त्याप्रमाणे डाव्या पॅरलाईज
झालेल्या हाताचीही हालचाल होऊ लागते.म्हणजेच विरुद्ध बाजूचा परस्पर संबध
पाहून आपण स्नायूवर नियंत्रण आणू शकतो.
व्यायामातही विविधता
असावी.दहावेळा हात हलवला की अकराव्यावेळा ती नुसती हालचाल असते.व्यायाम
नसतो.चालणे,पोहणे,उठाबशा काढणे अशी विविधता असावी.दमश्वास, ताणणे हे
असावे.व्यायामाने ताठरता कमी होते.शरीरावरील लक्षणाचा मनाशी कसा संबंध असतो
हे सांगताना त्यांनी परीक्षेचे उदाहरण दिले.घाम येणे, हात कापणे, फटिग ही
शारीरिक लक्षणे भीतीने,मानसिक ताणाने दिसतात.हे टाळण्यासाठी ताणावर
नियंत्रण ठेवणे महत्वाचे ठरते.ऑलिम्पिकमध्ये सिल्वर वरून गोल्ड मेडलकडे
जाण्यासाठी असे ताणावरील नियंत्रण आपण शिकवत असल्याचे त्यांनी
सांगितले.खेळाडू बाहेरून स्टेरॉइड घेतात,पकडले जातात.परंतु शरीरात स्वत:चीच
स्टेरॉइड तयार करायची क्षमता असते,ती वाढवायची.आजारावरील नियंत्रणासाठीही
नकारा ऐवजी शरीरातील लक्षणे स्वीकारून समजून घेणे महत्वाचे.नकारात्मक विचार
यायला लागले की लगेच दखल घेऊन आपले ज्यात मन रमते अशा गोष्टी
करायच्या.स्वयंपाक,चित्रकला,बागकाम,गाणी ऐकणे,म्हणणे, प्रवास करणे,जे
करायचे ते तन्मयतेने केल्यास,आनंदी असल्यास चांगले स्टीरॉइड तयार
होते.गोष्टी सहज उपलब्ध झाल्या की त्रास घेणे कमी होते अवलंबित्व
येते.यासाठी त्यांनी सर्वांना पटेल असे मोबाइलचे उदाहरण दिले.मोबाईलवर नंबर
सेव्ह केल्याने मोबाईल हरवला तर जवळच्या माणसाचा फोन नंबरही आठवत
नाही.अशाच आपण नित्याच्या अनेक क्रिया कमी करतो.आवश्यक क्रिया न केल्याने
आजाराला निमंत्रण देतो.त्यामुळे नित्याच्या क्रिया कमी करू नका आणि क्रिया
करताना मन केंद्रित करा असा सल्ला दिला.याचबरोबर पोटाने श्वास घेण्यासही
सांगितले.लहान मुले असाच श्वास घेतात.इगो सोडून खळखळून हसणेही महत्वाचे
असल्याचे सांगितले.
यानंतर श्रोत्यांच्या विविध प्रश्नांना त्यांनी
उत्तरे दिली.फळ्यावर रेखाचित्रे काढून बसणे,उठणे,झोपणे,झोपून उठणे,वाहन
चालवणे,स्वयंपाक करणे,रिक्षात बसणे अशा विविध वेळी पोश्चर कसे असावे हे
समजावून सांगितले.चहापान झाले,औपचारिक रित्या सभा संपली तरी श्रोत्यांचे
प्रश्न विचारणे संपत नव्हते.डॉक्टरांनी न कंटाळता,ठरलेल्या वेळापेक्षा
जास्त वेळ देऊन सर्वांच्या शंकांचे निरसन केले.सर्वांच्याच मनात सकारात्मक
विचार पेरले.
वाढदिवसानिमित्त श्यामलाताई शेंडे यांनी चहा दिला.
निवेदन
सर्वाना दिवाळी आरोग्यपूर्ण,आनंदाची,सुखसमृद्धीची जावो.
मासिक सभा गुरुवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी आयोजित केली आहे.
यावेळी 'पूरक उपचार पद्धतीबद्दलचे आपले अनुभव' या विषयवार शेअरिंग असणार आहे.
पहिली १५ मिनिटे डी.वाय.पाटील कॉलेजमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी असलेल्या देविका भिडे या, नृत्य आणि फिजिओथेरपी यांची सांगड घालून पार्किन्सन्ससाठी प्रकल्प करत आहेत.त्याबद्दल माहिती सांगणार आहेत.याबाबतची व्हिडीओ सीडीही दिली जाणार आहे.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु ४ वाजता
दिवाळीच्या आनंदात भर टाकणारी आणखी एक माहिती देत आहे.
शुक्रवार दिनांक १८ नोव्हेंबर रोजी पुण्याजवळील शांतीवन येथे दिवसभराची सहल जाणार आहे.ज्यांना सहभागी व्हायचे आहे.त्यांनी गुरुवार दिनांक १० नोव्हेंबरच्या कार्यक्रमात प्रत्येकी रुपये २०० भरून नाव नोंदवायचे आहे.१० नोव्हेंबरच्या कार्यक्रमात सहलीची रूपरेषा सांगणारे पत्रक दिले जाईल.
पार्किन्सन्स मित्रमंडळाची मासिक सभा गुरुवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी आयोजित केली होती.
यावेळी 'पूरक उपचार पद्धतीबद्दलचे आपले अनुभव' या विषयावार शेअरिंग झाले.प्रार्थनेने सभेस सुरुवात झाली.
डी.वाय.पाटील कॉलेजमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी असलेल्या देविका भिडे या, नृत्य आणि फिजिओथेरपी यांची सांगड घालून पार्किन्सन्ससाठी प्रकल्प करत आहेत.पहिली १५ मिनिटे त्यांनी त्याबद्दल प्रात्यक्षिकासह माहिती सांगितली.प्रसिद्ध नृत्यांगना सुचित्रा दाते यांच्या कडे त्यांची नृत्यसाधनाही चालू आहे.सुचित्र दाते या गेली काही वर्षे पार्किन्सन्स पेशंट आणि जेष्ठ नागरिकांसाठी मोफत नृत्योपचार करत आहेत.देविका यांना फिजिओथेरपीचा त्यांचा अनुभव आणि नृत्य हे बऱ्याचवेळा सारखे आणि एकमेकास पूरक आहेत असे वाटले.यासाठी त्यांनी पदव्युत्तर प्रकल्पासाठी हा विषय घेतला. प्रात्यक्षिकासाठी त्यांना शीतल टेकावडे आणि झिनल संगवी यांनी मदत केली.भरतनाट्यममधील आडव,विविध मुद्रा,नवरस त्यांनी दाखवले.शुभंकर शुभार्थीनीही यात उत्साहाने सहभाग घेतला.फिजिओथेरपी करताना कंटाळवाणे वाटू शकते नृत्याची जोड दिल्याने ते मनोरंजक होते.पाय आपटताना अॅक्युप्रेशरचे सर्व पॉईंट दाबले जातात,नृत्याच्या विविध बाबी करताना हालचालीतील समन्वय, चालण्यात सुधारणा,तोल सावरणे या गोष्टी साध्य होतात,आत्मविश्वास वाढतो.नवरसाच्या अभिनयामुळे चेहऱ्याला फेशिअल होते. भावविहीन चेहरा हे पिडीचे लक्षण, त्यावर मात करता येते.
या प्रयोगात सहभागी असलेले मोरेश्वर काशीकर यांनी आत्तापर्यंत आठ सेशन केलेली आहेत. त्यांनी पाय आपटण्यामुळे फ्रीजिंगची समस्या कमी झाल्याचे सांगितले.
यानंतर रामचंद्र करमरकर यांनी सहलीबद्दल माहिती सांगितली.
शरच्चंद्र पटवर्धन यांनी पूरक उपचार म्हणजे अॅलोपथीचे उपचार चालू ठेऊन केले जाणारे इतर उपचार अशी पूरक उपचारपद्धतीची व्याख्या करत चर्चेला सुरुवात केली.
मोरेश्वर काशीकर यांनी वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळे पूरक उपचार वापरत असल्याचे सांगितले.यात आयुर्वेद,होमिओपॅथी,नृत्योपचार,योगासने,प्राणायाम,सर्वांग सुंदर व्यायाम,संगीत इत्यादीचा समावेश असल्याचे सांगितले.ते शुभार्थीनी मदत मागितल्यास घरी जाऊन योग शिकवतात.यात त्यांना आनंद मिळत असल्याचेही सांगितले.विजय ममदापुरकर यांनी खेळाडू म्हणून स्वत:चे अनुभव सांगितले.श्री काशीकर यांच्या स्मरणिकेतील योगोपचार उपचारावरील लेखाचा फायदा झाल्याचे सांगितले.स्वमदत गटाचा आत्मविश्वास वाढण्यास उपयोग होतो असे ते म्हणाले. विशाखा मेंडजोगे यांनी सुज्योग थेरपीबद्दल माहिती सांगितली.श्री.राजीव ढमढेरे यांच्यासाठी त्या ही थेरपी वापरतात. त्यांना याचा उपयोग होतो.उमेश सलगर यांनी आयुर्वेदिक औषध आणि महानारायण तेलाने मसाज याचा उपयोग झाला अशी माहिती दिली
नेहमीप्रमाणे वाढदिवस साजरे करण्यात आले.शोभना तीर्थळी यांनी,गोपाल तीर्थळी यांच्या वाढदिवसानिमित्त खांडवीच्या वड्या- हा पारंपारिक पदार्थ आणला होता.तर हेमा शिरोडकर यांनी दिवाळीनिमित्त स्वत: केलेली चकली आणली होती.विनिता कुलकर्णी यांनी चहा दिला.