Parkinson-Diary

so many things, you should know about this disease

Wednesday, 21 December 2016

जगायचं कस? गाण म्हणत.






                जगायचं कस?रडत कण्हत, की गाण  म्हणत? आमची उत्साही शुभंकर अंजली महाजन ही समस्यांवर मात करत गाण  म्हणत कस जगायचं याच मूर्तिमंत उदाहरण आहे.१०० वर्षाची सासू आणि पार्किन्सन्स झालेला नवरा यांना सांभाळत ती असंख्य  उद्योग करत असते.तिच्या सहज जगण्याचा ते भाग असल्याने मुद्दाम आम्हाला सांगावे असे तिच्या दृष्टीने ते नसते. बोलता बोलता काहीकाही समजते.यातूनच ११ दिवाळी अंकात तिचे लेख आणि कविता आल्याचे  समजले.खरे तर दिवाळी अंकाबद्दल इतक्या उशिरा लिहिणे अप्रस्तुत वाटेल पण छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ  करणाऱ्यांना यातून प्रेरणा मिळेल असे वाटल्याने लिहित आहे.लिहिण्यासाठी लागणारा निवांतपणा या दोघांना सांभाळत दिवसा मिळणे कठीणच. सर्व लिखाण ती रात्रीच जागून करते.तिने लिहिलेल्या  अंकांची यादी पुढे देत आहे.
१) कऱ्हाड वैभव -' शतायुषी इंदिरा'  हा स्वत:च्या सासूबाईंवरचा लेख.
२)शब्द गांधार - 'संस्कारशी जडले नाते' हा लेख
३) रंगतरंग -' एकीचे बळ मिळते फळ' - लेख
४) भाविया -' मी सबला' - कविता
५) वेदांतश्री - धार्मिक विविधता तरी एकता - कविता
६) भन्नाट -' देव आहे सत्तेवर' आणि' कविराज' अशा दोन कविता.भन्नाटच्या हास्य कवी संमेलनाच अध्यक्षपदही तिने भूषविले.
७) शरयू -' खेद ' कविता.
८) शिवस्पर्श - 'उध्वस्त मन' - कविता
९) गोदाभूमी -' दिवाळीनंतरचे चार दिवस' - लेख
१०) कुंभश्री - लेख
११ ) मातृवंदना -' आई' -कविता














Posted by http://parkinson-diary.blogspot.in/ at 05:20 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Tuesday, 29 November 2016

शांतीवन सहल

                                                  शांतीवन सहल वृत्तांत
     पार्किन्सन्स शुभंकर शुभार्थीसाठी सहल ही आनंदाची पर्वणी असते.वर्षभराच्या आनंदाची बेगमी असते.आत्तापर्यंत दुपारी २.३० ते ६.० अशी अर्धवेळ सहल असायची. मागील वर्षीची पूर्ण दिवसाची सहल यशस्वी झाली त्यामुळे यावर्षीही दिवसभराची सहल करायची ठरली.पुण्याजवळील सिंहगड रोडवरील शांतीवन हे ठिकाण आणि १८ नोव्हेंबर तारीख ठरली. सहल असली की दोन महिने आधीपासूनच पूर्वतयारी सुरु होते. जायच्या  आदल्या दिवशी पर्यंत अचानक अडचणी उद्भवतात.सहलीच्या दिवशीही एखादी व्यक्ती उशिरा आल्याने पुढचे  सर्व वेळापत्रक कोलमडते..पूर्वानुभवावरून हे सर्व गृहीत धरलेले  असते  पण शांतीवन सहलीने पूर्वीचे सर्व अनुभव मोडीत काढले.
                                  पाडळकर पती पत्नी चिंचवडहून येणार होते. आम्हाला वेळ झाला तर गाडी थांबवा असे त्यांनी सांगितले होते.शीलाताई कुलकर्णी स्वत:ची गाडी घेऊन येणार होत्या. बस थांबवण्यापेक्षा त्यांची  गाडी मागे ठेवायची ठरवलं होत.पण तशी गरजच पडली नाही.सर्व जण वेळेत आले.सर्वाना त्यांच्या नावाचे  बॅचेस देण्यात आले.अंजलीने हजेरी घेतली.४८ शुभंकर, शुभार्थी सहभागी झाले होते.आजार, वय विसरून  सर्वांनी लहान व्हायचं होत.शरच्चंद्र पटवर्धन यांनी ओरिगामी साठी कागद कापून  आणले होते ते सर्वाना देण्यात आले.ब्रेकफास्ट बसमध्ये द्यायचा होता.तोही वेळेत आला.बस मार्गस्थ झाली'.साथी हात बढाना' पद्धतीने ब्रेकफास्ट वाटप सुरु झाले.उमा दामलेनी लाडू देणे सुरु केले.शुभार्थीना हातात धरायला सोपे असे सुंदर पॅकींग होते.व्हेजिटेबल उपम्यावर खोबरे,शेव,डाळिंब यांची पखरण होती.पंचाहत्तरीनिमित्त गोपाळ तीर्थळी यांनी नाश्ता  दिला.सविता ढमढेरेने स्वत: घरी केलेले रव्याचे लाडू आणले होते.थंडीही त्यादिवशी बोचरेपणा कमी करून सुखद बनली होती..खाण्याचा  आस्वाद घेऊन झाल्यावर गाण्याला सुरुवात झाली.
महेंद्र शेंडे खास आमच्या मदतीसाठी आणि त्यांच्या गाण्याने सहलीची रंगत वाढवण्यासाठी आले होते. टाळांच्या साथीने त्यांनी 'रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली,चला जाऊ पुसायला'.हे गमतीशीर गीत गायला सुरुवात केली. सर्वाचेच आवाज त्यात मिसळले.काहींनी ओरिगामी करून आपली कलाकृती सादरही केली.विजय ममदापूरकर यांच्यातील खोडकर मुल जागे झाले होते.त्यांनी शेजारी बसलेले दिलीप कुलकर्णी,गाणे सांगणारे महेंद्र शेंडे,लाडू वाटणारी उमा यांची व्यंगचित्रे काढली.चालती बस आणि थरथरणारे हात यांचा त्यांना विसर पडला होता.
                    खडकवासला धरणाच्या काठाकाठाने बस जात होती.महेंद्र शेंडे गाईडचे काम करत बाहेरील महत्वाच्या गोष्टी पाहण्यास सांगत होते.बघता बघता शांतीवन आलेही.गेटमधून आत शिरताच,भरपूर झाडी,सुंदर फुलझाडे,हौदात फुललेली विविध रंगी कमळे,आखीव रेखीव रस्ते,बसायला  पार,  अगत्याने स्वागत करणारे कर्मचारी आणि स्वच्छता हे सर्व पाहून  मन प्रसन्न झाले.विविध पक्षांचे  आवाज आणि सहलीसाठी आलेल्या बालवर्गातील २५० मुलांचा  किलबिलाट दोन्हीही सुखावणारे.मोठ्या हॉल मध्ये चहा,कॉफी,बिस्किटांची सोय केली होती.चहापानानंतर सभा मंडपात आम्ही आलो.परस्पर परिचयाचा कार्यक्रम होणार होता.भिंतीवरील मोठ्या आकारातील ओम पाहून सर्वांनी आधी शांत बसून ओंकार करूयात असे शेंडेनी सुचवले.सर्वांकडून ओंकार म्हणवूनही घेतला.वातावरण सकारात्मक लहरींनी भारावून गेले..नकळत एकरसता निर्माण झाली.एरवी कंटाळवाणा होऊ शकणारा परिचय कार्यक्रमही नेटका  झाला.सहलप्रेमी आणि आज आपल्यात नसणाऱ्या शेंडेसाहेब,अनिल कुलकर्णी, चंद्रकांत दिवाणे या शुभार्थींच्या आठवणीनी सर्वच भावूक झाले.प्रत्येकजण मित्रमंडळाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत होते.रामचंद्र करमरकर यांनी प्रत्येकाच्या  ओळखीनंतर त्या त्या व्यक्तीचे  मंडळासाठी योगदान,शुभंकर, शुभार्थी,स्वयंसेवक  म्हणून वैशिष्टे सांगत टिप्पणी जोडली.परिचय रंगतदार केला.वसू देसाईनी चौकटीतील फुले ओळखा  आणि वाद्ये ओळखा अशी दोन कोडी करून आणली होती ती सर्वाना वाटण्यात आली.
                    यानंतर १ वाजेपर्यंत शांतीवन फिरण्यासाठी मुभा होती.निसर्ग पाहणे,फिरणे,खेळणे,आराम करणे,बऱ्याच पायऱ्या उतरून खडकवासला धरणाचे बॅक वॉटर पाहणे,विविध आकाराच्या रंगीबेरंगी दगडांचे संग्रहालय पाहणे ज्याला जे हवे ते करता येणार होते.प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार,क्षमतेनुसार मार्ग निवडले.ज्यांना आराम करायचा होता त्यांच्यासाठी हॉलजवळील व्हरांड्यात बाजा टाकून देण्यात आल्या.हवे असल्यास बागेतही विविध ठिकाणी बाजा होत्या.काही शुभार्थीना आरामाची गरज होती.कितीतरी दिवसांनी त्यांच्या शुभंकरानाही निश्चिंतपणे मोकळा श्वास घेता येणार होता.संधीचा फायदा घेत त्यांनी झोपाळे,झुलतापूल,विविध खेळ यांचा मनमुराद आनंद लुटला.काहीजण गटाने गुजगोष्टी करत बसले,ज्यांना शक्य नव्हते त्यांनी हॉलमध्ये बसून कोडी सोडवणे, ओरिगामी करणे पसंत केले.कुठेही असाल  तरी पार्श्वभूमीला मंद, मधुर,सुरेल संगीत असाव तशी  निसर्गाची अदृश्य साथ होतीच.कडक ऊन नाही,गार वारा नाही.विशेष म्हणजे नेहमी सहलीच्या ठिकाणी आढळणारे वातावरणातील एकतानता भंग करणारे कर्कश संगीत नव्हते.अनेकांचे मोबाईल हे आनंदाचे क्षण मात्र टिपत होते.मने भरली नव्हती पण जेवायची वेळ पाळायची होती.सर्वजण स्वयंशिस्तीने डायनिंग हॉलमध्ये जमा झाले.
                     बुफे पद्धतीने जेवण मांडलेलेच होते.सर्वांनीच रांग लावून जेवण घेतले.ज्यांना खूप चालणे शक्य नव्हते त्यांना सभा मंडपात जेवण दिले.आल्यापासून कर्मचारी शुभार्थींची अवस्था पाहत असल्याने न सांगताच मदत करत होते.चटणी ,कोशिंबीर,पापड,दोन भाज्या,पुलाव,डाळ,गुलाबजाम असे साधेच पण चवीष्ट,गरम गरम  जेवण होते.कर्मचारी जातीने कोणाला काय हवे नको पाहत होते.
                     जेवणानंतर सर्व पुन्हा  सभामंडपात  जमले.आता खेळ,करमणुकीचे कार्यक्रम ठरले होते.
प्रथम विजय ममदापूरकर यांनी आपल्या शालेय जीवनातील व्यंग चित्राची गमतीदार आठवण सांगितली.तास चालू असताना सरांचेच व्यंगचित्र काढल्याने शिक्षकांनी कान पिरगाळला.पालकांना बोलवायला सांगितले.ते अमेरिकेत गेलेल्यावेळी मात्र त्यांच्या व्यंगचित्राचे कौतुक झाले. गंमत म्हणून काढलेली व्यंगचित्रे  १०/१० डॉलरला विकली गेली.कुस्तीपटू ममदापुरकर यांनी व्यायामाचा अतिरेक नको असा सल्ला दिला.अशा अतिरेकानेच  आपल्याला पार्किन्सन्स झाला असे वाटत असल्याचे सांगितले.
                        वसू देसाईने दिलेले कोड्यांचे कागद आता गोळा करावयाचे होते. पाच मिनिटाची वार्निंग बेल देण्यात आली.सर्वाना शाळकरी झाल्यासारखे वाटत होते.सर्व वाद्ये आणि सर्व फुले ओळखणारेही निघाले.विजया दिवाणेनी दोन्हीमध्ये पहिले बक्षीस मिळवत चंद्रकांत दिवाणे यांची परंपरा चालू ठेवली.त्यांच्या बरोबरीने रेखा आचार्य,विजय ममदापूरकर,अंजली महाजन, हेही विजयी ठरले.ओरीगामिचे परीक्षण महेंद्र शेंडे यांनी केले.सौ.ठक्कर यांच्या पंख्याला पहिले,श्रद्धा  भावे यांच्या पंचपाळ्याला दुसरे,अंजली आणि वसू या दोघीच्या फोटोफ्रेमला  तिसरे,अरुंधती जोशी यांच्या जंबो विमानाला आणि शशिकांत  देसाई यांच्या फ्लॉवरपॉटला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले.या सर्वाना तसेच पुढे करमणुकीच्या कार्यक्रमात भाग घेणार्‍यांना   डायऱ्या देण्यात आल्या.व्यंगचित्रे काढल्याबद्दल ममदापूरकर यांना खास बक्षीस देण्यात आले.
                         आता पुन्हा करमणुकीच्या कार्यक्रमाकडे वळायचे होते.
                        शीलाताई कुलकर्णी यांनी एक विनोद सांगितला.'एका माकडाने काढले दुकान' हे बालगीत ठसक्यात म्हणत स्वत:तील लहान मुल जपल्याचे दाखवून दिले.यानंतर अनुपमा करमरकर यांनी 'केतकीच्या बनी तिथे' हे अवघड गीत लीलया म्हटले.वन मोरच्या आग्रहाने 'अंगणी माझ्या मनीच्या' हे गीत म्हटले शेंडेनी टेबलावर ठेका धरला.अंजलीलाही नृत्य करण्याचा मोह झाला.कार्यक्रमाची रंगत वाढत गेली.अनेकांना गाण्यासाठी फर्माईश होऊ लागली.मग  शोभना तीर्थळी यांनी 'रसिक बलमा' आणि 'खुलविते मेंदी माझा' ही गीते म्हटली. उमा दामलेनी 'घनघन माला' आणि' 'ओ सजना बरखा बहार आयी',सविता ढमढेरेनी' सांज ये गोकुळी',ही गीते म्हटली.केशव महाजन यांना काहीतरी सादर करायचे असते.ते खूप एक्साईट होतात आणि दमतात म्हणून आम्हाला काळजी वाटत असते.पण आमच्या काळजीला न जुमानता त्यांनी सौदागर मधील राजकुमारचा संवाद आणि' सबकुछ सिखा हमने' हे अनाडी मधले गाणे म्हटले.चहासाठी डायनिंग हॉलमध्ये जायचे होते.पण शुभार्थीना पुन्हापुन्हा नाचानाच करणे कठीण आहे हे कर्मचार्‍यांच्या  लक्षात आले.त्यांनी सभामंडपातच चहा आणला.चहा घेताघेता अंजलीनी नेहमीप्रमाणे स्वरचित कविता म्हटली.शुभार्थी पद्मजा ताम्हणकर यांनी 'रंगरेखा घेउनी मी' हे गीत म्हटले.
विष्णुपंत जोशी यांनी ५००/१००० च्या नोटा भरण्यासाठी आलेल्या लोकांना सूचना देणाऱ्या गमतीशीर पुणेरी पाट्या वाचून दाखवल्या.करमरकर यांनी पुणेरी लोकांच्यावरील विनोद सांगितला.महेंद्र शेंडे यांनी नामदेवांची 'देव जेवला हो'  ही भैरवी म्हटली आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
पुण्याकडे प्रयाणाची वेळ झाली होती.नवी उमेद, नवे परिचय,आणि मधुर स्मृती बरोबर घेऊन बस निघाली.डॉक्टर गुजराथी यांनी दिलेले वेफर्स, वसू देसाई यांनी आणलेली नानकटाई, मोघे, दिवाणे यांनी आणलेली चॉकलेटस वाटली गेली.गप्पा, गाणी करत डेस्टिनेशन आले ही.
डॉक्टर आनंद जोशी आणि सुबोध जावडेकर यांनी लिहिलेल' मेंदूतील माणूस' हे पुस्तक नुकतच वाचनात आले.त्यात त्यानी लिहिले आहे की,सामुहिक खेळ,सहली,सार्वजनिकरीत्या साजरे होणारे करमणुकीचे कार्यक्रम यातून मेंदूत ऑक्सिटोसिन नावाचे संप्रेरक तयार होते.यामुळे ताणतणाव कमी होतात माणूस जास्त मनमिळाऊ, समाजाभिमुख होतो,असे शास्त्रज्ञाना दिसून आले आहे.त्यांच्या या विधानाला पुष्टी देणारी अशी  आमची सहल झाली.
Posted by http://parkinson-diary.blogspot.in/ at 01:44 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Sunday, 27 November 2016

मित्रा

                                                                                                                २३ ऑक्टोबर २०१६
मित्रा पर्किन्सना,
सॉरी,व्हेरी व्हेरी सॉरी. ऐक ना,मीच नाही तर आशा,हेमा ताई यांचाही तुझ्याबद्दल असाच गैरसमज झाला होता.तू आहेसच अनप्रेडीक्टेबल,गुंतागुंतीचाम्हणून होत अस.झाल काय,आम्ही बाहेरून आलो.आल्यावर हे झोपले.सर्व काही ठीक होत.जागे झाल्यावर तर अजिबात उठताच येईना,हालचाल करता येईना.बघता बघता काय अवस्था केलीस यांची.एकदम डोक्यातच गेलास.सारखा तुझ्या कलाकलाने घेऊनही,तू मात्र पाठीत खंजीर खुपसलास.डॉक्टरना बोलावलं.थोडा ताप होता.क्रोसिन दिली.डॉक्टर म्हणाले,'आता व्हीलचेअर आणायला हवी'.संध्याकाळपर्यंत ताप उतरला.आणि काय आश्चर्य? मघाचे हे आणि आत्ताचे हे दोघे वेगळे वाटावेत इतका फरक झाला होता.ते सहजपणे उठून टॉयलेटला  गेले.म्हणजे कलप्रीट तू नव्हतासच.खर सांगू जितक्या वेगाने डोक्यात गेलास तितक्याच वेगाने अगदी मनापासून तुला सॉरी म्हटलं.तापामुळे अगदी निरोगी तरुणांचीही अशीच अवस्था होत असल्याच नंतर समजल,पण ज्यांच्या घरी तू होतास ,त्यांच्या संशयाची सुई तुझ्याकडेच वळली.
                अनेकदा अनेकांकडे असं होत.शेंडे साहेबांची पंचाहत्तरी होती.ते व्हीलचेअरवर आले.तुझ्यासाठी झटणाऱ्या शेंडेसाहेबांची ही तू केलेली अवस्था पाहून डोळ्यात पाणी आले.पण तेच शेंडेसाहेब पुढच्याच महिन्यात त्यांच्या घरी झालेल्या मिटींगमध्ये हातात चहाचा  ट्रे घेऊन आले.सारखे तुझ्याबद्दल संशय  घेणे सोडलं पाहिजे हे समजत रे.पण अस का होत? आम्हा सर्वसामान्यांनाच नाही तर,शास्त्रज्ञांनाही अजून तू पुरता उमगला नाहीस.मायावी राक्षसासारखा तू प्रत्येकाकडे आणि वेळोवेळी रूप बदलत असतोस.आधुनिक वैद्यकानी तू बरा न होणारा आणि सतत वाढत जाणारा अस तुझ्यावर शिक्कामोर्तब केलयं ते इतक डोक्यात बसलय.
              आता तुझ्याशी मैत्री केलेले,जगभरातील शुभंकर, शुभार्थी तंत्रज्ञानामुळे,सोशल मीडियामुळे एकत्र येत आहेत.काहीजण तर या गृहीतकावरच ऑबजेक्शन घेत आहेत.रॉबर्ट रॉजर्स यांनी 'An observation to recovery' मधून आपल्या विधानाला पुष्टी देणाऱ्या अनेकांना बोलत केल आहे.त्यांच्या विकली रेडीओ प्रोग्रॅममधून या सर्वाना पाहता ऐकता येत.हे एक उदाहरण झाल.असे अनेक आहेत.
                 आम्हा विज्ञानाच बोट धरून चालणाऱ्याना अस एकदम मान्य करण अशक्य आहे.पण तुझ्यासह तुला आहेस तसा स्वीकारून आनंदी कस राहायच हे दाखवून देणारेही अनेक आहेत.प्रसिद्ध बॉक्सर महमद अलीने शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्याशी मैत्री निभावली.करोडो डॉलर्स तुला समजून घेण्यासाठी खर्च केले.इस्त्रायलचे डॉक्टर रफी एल्डर,रोंबा चाचाचा शिकले.उत्तम डान्स टीचरही बनले.यातून तुझ्याशी मैत्री निभावण त्यांना सोप जातंय.
              १७ व्या वर्षी ज्याला तू गाठलस त्या जॉर्डनसारख्या तरुणांनी स्वत:च्या अनुभवावरून तुझ्यावरच प्रकल्प केला.मानसशास्त्रातील पदवी मिळवली.'लीन युंग' हे प्रतिष्ठेचे पारितोषिक मिळवले.पुढच संशोधनही तुला समजून घेण्यासाठी असणार आहे.
              एवढच कशाला? आमच्या पार्किन्सनन्स मित्रमंडळाचीही कितीतरी उदाहरणे आहेतच की.हृषीकेश पवारनी नृत्योपाचाराने आमच्या शुभार्थींचे आयुष्याच बदलून टाकले.त्यांचे परफॉर्मन्सेस पाहून न्युरॉलॉजीस्ट,न्यूरोसर्जन,फिजीशियन यांनीही तोंडभरून कौतुक केले.भारती विद्यापीठ आणि संजीव डोळे होमिओपॅथीच्या आधारे प्रयोग करत आहेत.तुझ्याबरोबर येणारे डिप्रेशन,चीन्तातुरता,अलिप्तता,गोंधळलेपणा अशा अनेक लक्षणांपासून मुक्त होत आहेत.डॉक्टर विद्या काकडे यांच्या सायको न्युरोबिकचा प्रयोगही चांगले रिझल्ट देत आहे.पण हे सर्व स्वतंत्रपणे वेगवेगळ्या ठिकाणी होत आहे.सात आंधळे आणि हत्तीच्या गोष्टीसारखे झाले आहे.तू सर्वांगाने कुणाला दिसताच नाही आहेस.
              आधुनिक वैद्यकानेच या विविध प्रयोगांना एकत्र घेऊन सत्यापर्यंत पोचण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.आमचे प्रत्यक्ष अनुभवही गृहीतक म्हणून नाही तरी निरीक्षण म्हणून लक्षात घ्यावयास काय हरकत नाही.
       'Together we move better' आम्ही हे सर्व व्हाव म्हणून आमच्या परीन धडपडत आहोत.आमच्या हयातीत तू सर्वांगाने गवसला नाहीस तरी आमचा वसा आम्ही पुढच्या फळीकडे सोपवू.तुझ्याशी केलेली मैत्री निभाऊ.गेला ना राग आता? माफ केलास ना?
Posted by http://parkinson-diary.blogspot.in/ at 04:02 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Thursday, 17 November 2016

तुम्हीही बना रोल मॉडेल



‘तुम्हीही बना रोल मॉडेल’
                                गोपाळ तीर्थळी
“You are role model for P D Community”
श्री.श्रीकांत शेट्यें या शुभार्थीनी इ-मेल मधून लिहिले होते, मी शुभंकर-शुभार्थींना वाढदिवसाची पत्रे लिहायला लागल्यापासून फोनवर प्रत्यक्ष भेटीत याच आशयाचं बरेच जणांनी सांगितले. याशिवाय आश्विनी हॉटेलमधल्या पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या कार्यक्रमात परस्पर शेअरींग चालू होतं. श्री. करमरकरांनी ‘गोपाळराव’ पहा ह्यांना पाहिल्यावर पार्किन्सन्स आहे असे वाटते का? असा सवाल केला. माझे अनुभव सांगण्याची विनंती केली. मी लेखातून ते सविस्तर सांगत आहे. प्रत्येक शुभार्थी रोल मॉडेल बनू शकेल इतकं साधं सोप आहे.
मी पार्किन्सन्ससह आनंदी असण्यात आणि माझा पी.डी. नियंत्रणात असण्यात माझे मते
औषध उपचार २५%
मी स्वत: ३५%
शुभंकर (केअरटेकर) ४०% असा वाटा आहे.
सुरुवातीच्या काळात अज्ञानामुळे मी औषधोपचार उशिरा सुरु केले. पार्किन्सन्स मित्रमंडळात सामील झाल्यावर तज्ञांच्या व्याख्यानातून आणि इतरांच्या अनुभवातून गैरसमज दूर झाले. दर ३ महिन्यांनी मी न्युरॉलॉजीस्टकडे जातो. त्यांनी सांगितलेली औषधं घेतो. सुरुवातीला मी औषधाच्या वेळा पाळायचो नाही. डॉ. राहूल कुलकर्णींच्या व्याख्यानातून औषधाची वेळ पाळणे किती महत्त्वाचे आहे ते समजले, डॉ. संजय वाटवेंच्या व्याख्यानातून औषधाच्या गोळ्या आनंदाने घेतल्यास त्यांचा उपयोग चांगला होतो हे समजले. कंप, मंदगती, हस्ताक्षरात बदल, बोलण्यात थोडा प्रॉब्लेम ही माझी पी. डी. ची लक्षणे आहेत. औषधेपचाराबरोबर इतर ही उपायांनी ती आटोक्यात आहेत. गेल्या ३/४ वर्षात माझा औषधाचा डोस बदलला नाही.
इतर उपचार म्हणजे काय करतो? तर सर्वात प्रथम मी मला पार्किन्सन्स झाला आहे याचा बाऊ न करता त्याचा स्वीकार करून त्याचे बरोबर राहाणे पसंत केले. त्याच्यातील उणिवा न शोधता त्यात असणाऱ्या चांगल्या गोष्टी देखील शोधल्या. पूर्वीची लाइफ स्टाइल बदलून पार्किन्सन्सला जुळणारी जीवन पद्धती आत्मसात केली. यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘मी कुणीतरी आहे’ हे विसरावयाला पाहिजे. पी.डी.मुळे मला छोट्या छोट्या गोष्टींना वेळ लागतो. पण तरीही मी शक्यते स्वत:च्या गोष्टी स्वत: करतो. गरज वाटल्यास मदत मागायला लाजत नाही. माझे हस्ताक्षर बदलले आहे. बरेच शुभार्थी या गोष्टी मनाला लावून घेताना दिसतात याने काही साध्य होत नाही. ‘वापरा नाही तर गमवा’ हे सूत्र माहित असल्याने मी ह्यावर मात करण्याचा प्रयत्न करतो. सकाळी ५.३० ला उठून ६.३० पर्यंत सगळे प्रात:र्विधी आवरतो. आणि नवचैतन्य हास्य परिवारला जातो. त्यानंतर दोन अडीच कि.मी. चालून येतो. बोलणे सुधारावे म्हणून रोज संध्याकाळी रामरक्षा, स्तोत्र म्हणतो, नंतर ओंकार, प्राणायाम, मेडीटेशन या सर्व गोष्टी औषधा एवढ्या सातत्याने करतो.
पी. डी. ला मित्र बनविल्याने मला त्याची लाज वाटत नाही. सर्व कौटुंबिक कार्यक्रमाला, सामाजिक कार्यक्रमाना, सवाई गंधर्व सारख्या कार्यक्रमांना ज्येष्ठ नागरिक संघ, हास्य परिवार यांच्या सहलीला नॉर्मल माणसाइतके सहजपणे जातो.
हस्ताक्षराबाबत मी काहीतरी लिहिण्याचे ठरविले पण ते केले जात नव्हते. मग मला माझ्या पत्नीने वाढदिवसाला शुभंकर, शुभार्थींना पत्रे पाठविण्याचा मार्ग सुचविला. मला हे करण्यात आनंद मिळतो. इतरांना आनंद वाटता येतो. या पत्रावर स्केचपेनने डिझाइन काढताना माझे मन रमते आणि हळूहळू कंप देखील थांबतो. आपणच असे स्वत:च्या आवडीनुसार, स्वभावानुसार छोटे छोटे मार्ग शोधायला हवेत.
अनेक शुभार्थींच्या घरी मी गेलो आणि जातो पण घर भेटीत माझ्या अनुभवाचा त्यांना फायदा होतो. याचा मला आनंद होतो. तसेच अनेक शुभार्थींकडून प्रेरणाही मिळाली. शुभार्थी कसा नसावा हेही समजत गेले. त्यांच्या प्रमाणे दोष माझ्यात नाहीत ना हे आत्मपरिक्षण करू लागलो त्याचाही मला फायदा झाला हे सर्व शक्य झाले ते अनेक शुभंकरांच्या पाठींब्यामुळे.
शुभंकरात सर्वात पहिले स्थान पार्किन्सन्स मित्रमंडळाचे, इथे येण्यापूर्वी आम्ही पती पत्नी दोघेही नैराश्याने घेरलेले होतो. श्री. मधुसुदन शेंडे आणि पटवर्धन वहिनी आमच्यासाठी रोल मॉडेल झाले. मित्रमंडळाबरोबर मित्र परिवारही मिळाला. त्यांच्या बरोबर मित्रमंडळाच्या कामात झोकून देताना आनंद वाटू लागला. शुभंकरामध्ये दुसरे स्थान पत्नी आणि परिवाराचे, त्याशिवाय शेजारी, घरी काम करणारे नोकर, हास्य क्लबमधील सहकारी, मित्रमंडळाlला  कोणत्याही मोबदल्याशिवाय सभेसाठी जागा देणारे श्री. देवस्थळी. मित्रमंडळाचे कार्य चालू ठेवण्यास ज्यांची मदत होते, अशा विविध लोकांना मी शुभंकर मानतो.
डॉ. संजय वाटवे यांनी आपल्या भाषणात शुभंकराबद्दल कृतज्ञता बाळगा असे सांगितले ते मला पटले. डॉ. अनिल अवचटांनी दिलेला ‘तरी बरं झालं’हा मंत्र आचरतो.पार्किन्सन्स झाला कॅन्सर नाही झाला, हार्ट अँटॅक आला नाही, मधुमेह आणि त्याचे पथ्य नाही करावे लागणार असे मी आता म्हणतो. पार्किन्सन्सला मित्र मानण्यापर्यंत तयारी होण्यात अशा अनेकांचा हातभार लागला.
अजून तरी रोजच्या व्यवहारात मला शुभंकराची फारशी मदत लागत नाही पण माझी मानसिकता सकारात्मक रहाण्यास आणि नैराश्याला माझ्यापर्यंत येऊ न देण्यात माझ्या पत्नीचे सहकार्य असते. मी ही चहा करणे मशीनवर कपडे धुणे, दुध आणणे, इत्यादी कामात वाटा गरजेनुसार उचलतो. शुभंकरांबद्दल कृतीतून कृतज्ञता मला विशेष महत्त्वाची वाटते.
असं माझं पार्किन्सन्ससह सहज सोपे जगणे प्रत्येकाला जमण्याजोगे. मग तुम्हीही बनताय ना रोल मॉडेल?

(जागतिक पार्किन्सन्स दिवस स्मरणिका २०१५ मधील लेख.)


Posted by http://parkinson-diary.blogspot.in/ at 01:22 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Tuesday, 1 November 2016

अंतर्बाह्य उजळूया.

 दिवाळी संपली.फराळ करणे,फराळाची देवाण घेवाण,आकाशकंदील,रांगोळ्या,पणत्या लावणे,भेटीगाठी, हसण-णे खिदळणे आणि फॉरवर्डेड का असेना मेसेज पाठवणे.हे सर्व झाले.परदेशातील नातेवाईक,सैन्य दलातील जवान यांच्यापर्यंत आनंद पोचवण्याचाही आपण प्रयत्न केला.अगदी आनंदी आनंद.हे सर्व ओसरताना गुरु ठाकुर यांच्या कवितेतील
"बाहेर आहे झगमगाट
उजळलाय सारा गाव
आतल्या अंधारच काय?
तिथे एक दिवा लाव."
या ओळी रेंगाळत राहिल्या.थोड आत डोकावूयात का? पार्किन्सन्स शुभंकर शुभार्थींचा विचार करता मला जाणवलं,दिवा लावण्यासाठी आपल्याला पणती,निरांजन काही तरी हवे. ते म्हणजे  पार्किन्सनचा  स्वीकार.तो  तर मंडळातल्या सर्वांकडे आहेच असे मला तरी वाटते. नसेल  तर  आधी मिळवणे महत्वाचे.डॉक्टरांचा सहानुभाव,शुभंकराच प्रेम,आधार,काळजी घेणे या सर्वाच तेल,पार्किन्सन्स विषयीच्या यथार्थ माहितीची वात, आजारावर मात करून स्वत:च जीवन उजळविणाऱ्या अनेकांकडून स्फुल्लिंग घेऊन तुमच्यापर्यंत पोचविणाऱ्या,आत्मविश्वास,दिलासा देणाऱ्या पार्किन्सन्स मित्रमंडळाचे काडीचे माध्यम असेल.यामुळे आतला अंधार नक्कीच दूर होईल.सर्वांच्या एकत्रित प्रकाशात नवीन सामील होणाराही सुरुवाती पासूनच प्रकाशित होईल.
आता पुढची पायरी.आपलेच दु:ख गोंजारत न राहता.
"नेणिवेच्या दारावर
जाणीवेच्या पारावर
जिथे जिथे असेल वाव
तिथे एक दिवा लाव."
Read more »
Posted by http://parkinson-diary.blogspot.in/ at 22:21 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Thursday, 25 August 2016

खुदिको बुलंद करणारे बंदे - २

Read more »
Posted by http://parkinson-diary.blogspot.in/ at 22:46 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Monday, 22 August 2016

खुदिको बुलंद करणारे बंदे

                                                    खुदिको बुलंद करणारे बंदे -  १   
                              
                        " खुदिको कर इतना बुलंद कि हर तहरीरके पहले 
                          खुदा बंदेको पुछे,'बोल तेरी रजा क्या है'| "
ऐकायला,लिहायला हे छान वाटत,  प्रत्यक्षात अशा व्यक्ती सापडणे कठीण. पण आमच्या मित्राने,पार्किन्सन्सने आमच्यापर्यंत असे बंदे आणले.उल्हास गोगटे आणि उषा गोगटे हे जोडपे  यातील एक.८१ वर्षांच्या  उषाताईंच ३ ऑगस्ट २०१६ ला निधन झाल.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
उषाताईंच्या निधनाने  साठी  ओलांडलेल,परस्पराविषयी प्रेम आदर,कौतुक यांच्या अतूट नात्यात बांधलेलं  सहजीवन रूढार्थाने संपल.त्यांचं सांत्वन करायला गेलेलो आम्ही त्यांच्या आगळ्यावेगळ्या सहजीवनाच्या दर्शनाने थक्क होऊन आणि प्रेरणा आणि ५००० रुपयाची देणगी घेऊन परतलो.हे काही प्रथम दर्शन नव्हत.पण जेंव्हा जेंव्हा गोगटे भेटले तेंव्हातेंव्हा आवाक होण हीच प्रतिक्रिया असते.ती शब्दात मांडण आणि एका लेखात सामावण कठीण. त्यामुळे जमेल तसे  आणि टप्प्या टप्प्याने लिहिण्याचा प्रयत्न करत आहे.
 दिवाणे यांच्या घरी झालेल्या डेक्कन गटाच्या सभेत उल्हास गोगटे प्रथम भेटले.ते पूर्णवेळ न थांबता घाईघाईने गेले.पार्किन्सन्स झालेली शय्याग्रस्त  पत्नी,आणि आणि आता ५८ वर्षाचा असलेला विकलांग मुलगा, यांना ते घरी सोडून आले होते.यशस्वी व्यावसायिक आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या गोगटे यांनी इतर सर्व गोष्टी बंद करून पत्नी आणि मुलाच्या सेवेस वाहून घेतलं होत.१००० रुपयाची देणगी त्यांनी दिली.मंडळाला मिळालेली ती पहिली देणगी होती.नंतर अनेकवेळा ते अशीच देणगी द्यायला घाईघाईने येऊन गेले.त्यांचं सर्व लक्ष पत्नी आणि मुलाकडे असे.आम्ही त्यांच्या घरी गेलो तेंव्हा उषाताईना प्रथम पाहिलं.घरी शय्याग्रस्त कोणी असल की घरात एक उदासवाण वातावरण असत.शय्याग्रस्त व्यक्ती थोडी ओशाळलेली, कंटाळलेली, त्या व्यक्तीकडे पाहायला कोणीतरी पगारी व्यक्ती नेमलेली असते.इथ तर एक शय्याग्रस्त आणि एक विकलांग व्यक्ती.पण उदासवाणेपणाचा मागमूसही नव्हता उलट प्रसन्न वातावरण होत.या दोघांच सर्व काही स्वत: गोगटे करत होते.पगारी माणसे नेमली की झाल असे समजणारे अनेक शुभंकर पाहिले होते,आम्हाला आमच लाईफ नाही का? किती दिवस आम्ही अडकून राहायच? अस विचारणारेही पाहिले होते.कोणताही आव न आणता समर्पित भावाने सर्व काही करणारे गोगटे यांच्यासारखे मात्र विरळाच.
 ना .सी.फडकेंच्या कादंबरीतील नायक, नायिका शोभतील असे हे जोडपे.एकमेकाच्या आकंठ प्रेमात बुडालेले. सर्वगुण संपन्न.नायक हँडसम,नायिका ब्युटिफुल.नियतीने  यांच्या कथेतील सहजीवनाच्या सुंदर चित्रावर दु:ख,वेदना,हतबलता यांचे वार करत बाधा आणण्याचा प्रयत्न केला.परंतु यांच्या प्रेमाच्या भक्कम पायावर उभ्या असलेल्या सहजीवनाच्या गडद रंगात नियतीचे फटकारे निष्प्रभ ठरले.
पहिला फटकारा १९६४ मध्ये अमरच्या जन्मानंतर मिळाला.त्याच्या जन्माच्यावेळी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन उपलब्ध नव्हता.फोर्सेप्स डिलिव्हरी करावी लागली.मेंदूला इजा झाली आणि विकलांगता चिकटली.
जन्मताच सर्व अवयाववरच नियंत्रण गमावलं.पती पत्नींनी हार न मानता त्याला नॉर्मल स्थिती आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले.नॉर्मल नाही झाला तरी दोन गुडघ्यावर, हातावर चालू लागला.अस्पष्ट का असेना बोलू लागला.त्याच्यात आत्मविश्वास निर्माण केला.त्याला नाटकाची संगीताची आवड आहे.गोगटेना कवितेत शब्द अडला तर तो सांगतो. आम्ही भेटायला गेलेल्यावेळी तोही आमच्यात बसतो.आम्ही सभेचे फोन करतो तेंव्हा एकदा अमरनी फोन घेतला.मला कोण आणि काय बोलत समजलच नाही. आमच्या पहिल्या भेटीत गोगटे म्हणाले त्याला इतर काय बोलतात ते समजत.त्यांनी एकदा पाहिलेली व्यक्ती तो १० वर्षांनी भेटली तरी ओळखेल.यानंतर मात्र अमर फोनवर असला की मी कोण ते सांगून निरोप देऊ लागले आणि तो गोगटेना व्यवस्थित पोचलेला असायचा.त्यांनी आपल्याच जीवनावर एक कथाही लिहिली.त्याला नेत्रदान आणि देहदान करायचं आहे. विकलांग  अमरला घडवण्यात,निरोगी आणि सुंदर मन देण्यात या पती पत्नीला किती कष्ट घ्यावे लागले असतील,पेशन्स ठेवावे लागले असतील याची आपण कल्पना करू शकतो.इतर कुटुंबीयांचीही यात मदत होतीच.एकदा कोणीतरी अमरसाठी उपाय  सांगितला.त्यासाठी डोंगरावर जावे लागणार होते. वाहनाची सोय नव्हती. तर धाकटा भाऊ केदारने अमरला पाठीवर उचलून नेल होत.
१९९६ मध्ये उषाताईंना पार्किन्सन्स झाल्याच निदान झाल.त्यातच अ‍ॅस्टीओपोरोसिसही झाला. जरा कुठ पडल की हाड मोडल अस होऊन अनेक ठिकाणी ऑप्रशन करून  रॉड घालावे लागले.बॅटमींटन चँपियन असलेल्या उषाताई अंथरुणाला खिळल्या.त्यातच ताठरता कमी करणारे पार्किन्सनन्सवरचे महत्वाचे औषध सिंडोपा घेतल्यावर त्याना जोरदार चक्कर येत असे त्यामुळे सिंडोपाच्या गोळ्या  देता येणार नव्हत्या.न्युरॉलॉजीस्ट दिवटे यांनी Pacetane,Amentral या गोळ्या चालू ठेवल्या.अमरबरोबर आता  उषाताईनाही पाहावे लागणार होते. गोगटे ते समर्थपणे करत होते.त्यांच्या खाण्यापिण्याबरोबर, औषधोपचाराबरोबर त्यांचा व्यायाम करून घेणेही ते करत होते.मन आनंदी ठेवण्यासाठी धडपडत होते.घरात बसून कंटाळा येईल म्हणून दोघानाही गाडीतून बाहेर फिरऊन आणत होते. अमरला पुणे युनिव्हर्सिटीच्या परिसरात आवडतो म्हणून बऱ्याच वेळा तेथे ते जात. हे किती कठीण आहे, हे ते या दोघांना एकदा सभेला घेऊन आले तेंव्हा लक्षात आल.त्यांनी गाडी अश्विनी हॉटेलच्या अगदी दारापाशी आणली.प्रथम अमरला गाडीतून काढून व्हीलचेअरवर घेतलं.हॉलमध्ये आणून बसवलं.नंतर उषाताईना गाडीतून बाहेर काढून हॉल मध्ये आणल.घरापासून हॉलपर्यंत असा दोघानाही आणण्याचा  मला वाटत विचारही कोणी केला नसता.उषाताईही मन रमवण्यासाठी स्वत:चे मार्ग शोधत होत्या.नामजपाने त्यांच्या अनेक वह्या भरल्या.उषाताईंच्या प्रकृतीत सुधारणा नव्हती तरीही गोगटे काहीना काही उपाय पाहत होते. मध्यंतरी श्री गोखले यांनी पीडी पेशंटच्या घरी जाऊन संमोहन उपचार करण्याची तयारी दाखवली. गोगटे यांनी तो प्रयोग करून पाहिला.उषाताईना त्यामुळे थोडा फायदा झाला.गोखले यांचे व्याख्यान आम्ही मंडळात ठेवले तेंव्हा  आपला अनुभव सांगायला घाईघाईने गोगटे येऊन गेले.सगळ थोड स्थीरस्थावर होत होत तर नियतीला पुन्हा परीक्षा घेण्याची लहर आली.गोगटेना सुधारता येऊ शकत नाही अशी दृष्टीची समस्या निर्माण झाली.कमी दिसू लागल.वाचन लिखाणावर मर्यादा आली.चारचाकी बंद झालीच होती दुचाकीवर जाणही बंद झाल.सेवेत मात्र खंड नव्हता.
आता त्यांच सभांना येण जवळजवळ बंदच झाल.फोनवर संपर्क होता.एकदा त्यांनी 'पार्किन्सन्स मित्र' नावाची कविता पाठवली.एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत 'परका  होता घरचा झाला अखंड नाते जडले' अस म्हणण, 'रडण्यापेक्षा मुळूमुळू हा मार्ग मैत्रीचा सुखाचा' म्हणत पीडीशी हातमिळवणी करण,खरच ग्रेट.आम्ही ही कविता २०१६च्या अंकात छापली.इतर अनेक छंद असलेल्या गोगटेना घरी राहण्याच्या काळात त्यांच्या कविता सखीने साथ दिली.या कवितेच्या साथीबद्दल स्वतंत्रपणे लिहिणारच आहे.उषाताईंच्या मृत्युनंतर तीन चार  दिवस, ही सखी सुद्धा त्यांच्याजवळ जाऊ शकली नाही.६ ऑगस्टला मात्र धीर करून ती जवळ आली. त्यांची 'भयकंपित अवस्था' कागदावर उतरली. आम्ही भेटायला गेलो तेंव्हा टेबलवर कवितेची वही होती.' वर्षा सहल,श्रावण,उषाताईंचा १६ ऑगस्टचा वाढदिवस अशा आठवणीच्या सरीवर सरी अनेक कवितेतून कोसळत होत्या. 'जाणे तुझे मनाला गेले लुळे करून'.असा विलाप मन करत होत.
त्यांनी यापूर्वी आपल्या एका दीर्घ कवितेत 'जगावेगळी माझी प्रार्थना देवा प्रथम ने या दोघांना ' अस म्हटल होत.हे बुद्धीला समजल तरी प्रत्यक्ष वेळ आल्यावर मन मात्र हा वियोग सहन करू शकत नव्हत.
उल्हासराव आम्ही तुमच्या दु:खात सहभागी आहोत.
Posted by http://parkinson-diary.blogspot.in/ at 06:15 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Wednesday, 17 August 2016

बुद्धिवंत वास्तुरचनाकार हरपला.

                                                  बुद्धिवंत वास्तुरचनाकार हरपला.
                
११ऑगस्टला नेहमीप्रमाणे दुसऱ्या गुरुवारी पार्किन्सन्स मित्रमंडळाची सभा होती.या महिन्यात वाढदिवस असणाऱ्यांना सभेस येण्याची आठवण करायला फोन करायचे होते.यात चंद्रकांत दिवाणे यांचे नाव होते.पण त्यांना फोन करण्यापूर्वीच त्यांच्या मृत्यूची बातमी येऊन थडकली.अत्यंत बुद्धिमान,मितभाषी, शांत स्वभावाच्या दिवाणे यांचा मंडळाच्या कामात विविधांगी सहभाग असायचा.
२००८ मध्ये दीनानाथ हॉस्पिटल मध्ये झालेल्या मेळाव्यानंतर मंडळाची नौका वेगाने पुढे नेणारी नव्या उमेदीची कुमक सामील झाली.त्यात चंद्रकांत दिवाणे हे शुभार्थीही होते.सुरुवातीला पुण्यातील वेगवेगळ्या भागात सभा घेण्यासाठी सात विभाग करण्यात आले. त्यातल्या डेक्कन विभागाची धुरा दिवाणेनी उचलली.स्वत:च्या घरी डेक्कनच्या सभासदांची सभा आयोजित केली.सभासदांना सुंदर हस्ताक्षरात सभेची पत्रे पाठवली.वास्तुरचनाकार असल्याने कार्डाच्या मागे त्यांच्या घराकडे कस यायचं हे दाखवणारा नकाशाही होता.सहवास वाढत गेला तसे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू समजत गेले.
                                  त्यांच्या यशाची भव्य वास्तू परिश्रम,माणुसकी आणि  नैतिकतेच्या भक्कम पायावर उभी होती.सकाळी ड्राफ्ट्समनचे काम करायचे आणि संध्याकाळी अभिनवकलाच्या आर्किटेक्चर डिप्लोमाच्या व्याख्यानांना हजर राहायचे,असे करत त्यांनी शिक्षण पुरे केले.इतरांना असे कष्ट घ्यावे लागू नयेत म्हणून आजही गरजूंना शिक्षणासाठी ते मदत करीत, शैक्षणिक संस्थानाही ते मदत करीत होते.१९६५ मध्ये स्वतंत्र प्रॅक्टीस सुरु केली मग मागे वळून पहिलेच नाही.बंगले,चर्चेस,सोसायट्या विविध प्रकार हाताळले.मुलेही हाताशी आली व्याप वाढत गेला.२०१० पासूनच्या सर्व स्मरणिकेत त्यांनी दिलेल्या  जाहिरातीतून तो आमच्यापर्यंत पोचला.त्यांनी न सांगताच स्मरणिकेत एक पान  आम्ही त्यांच्यासाठी ठेवलेले असायचे.मंडळाच्या प्रत्येक उपक्रमात दिवाणे पती पत्नीचा सक्रीय  सहभाग असायचा.सहली हा त्यांचा आवडीचा विषय.मंडळाची पहिली पानशेतची दिवसभराची सहल फक्त कार्यकारिणीच्या लोकांची पायलट सहल होती. त्यानंतरची आठ दिवसाची आनंदवन सहल,प्रत्येक वर्षाच्या छोट्या सहली यात ते सपत्नीक हजर  होते.सहलीतील खेळ,ओरिगामी स्पर्धा,क्विझ या सर्वात ते पुढे असत बक्षीसही मिळवत.कठीणातल्या कठीण प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे असे.मागच्या वर्षीच्या फुलगाव सहलीत तर त्यांनी स्वत:च एक क्विझ तयार करून त्याच्या सर्वाना द्यायला झेरॉक्स कॉपी करून आणल्या होत्या.आनंदवनच्या सहलीत चार जणांना एक खोली शेअर करावी लागली.अंजली आणि केशव महाजन हे दिवाणे यांच्या बरोबर होते.शिक्षिका असलेल्या अंजलीनी आपल्या पतीसाठी व्हीआरएस घेतली होती.आनंदवन,हेमलकसा  येथील शाळा आणि मुले पाहिल्यावर तिला शिकवण्याची उर्मी आली.दिवाणे यांनी केशव महाजन यांच्याकडे पाहण्याची जबाबदारी घेतली.आणि अंजलीला आपली इच्छा पूर्ण करता आली.सहलीत खूप फोटोही काढले.सहलीतील त्यांचा वावर पाहता यांना खरच पीडी आहे  का? अशी कोणालाही शंका आली असती.
                  दर महिन्याच्या सभासाठी सभासदांना फोन केले जातात.हे काम बहूतेक शुभंकर करतात.कारण बऱ्याच शुभार्थीना स्पष्ट  बोलता न येण्याची समस्या असते.पण मागच्या महिन्याच्या सभेपर्यंत दिवाणे यानी हे काम केले.या महिन्याच्या सभेसाठीही त्यांनी नावांची यादी काढून ठेवली होती.
                 शेवटपर्यंत मंडळासाठी काम करण्याची त्यांची धडपड होती.व्यावसायाबद्दलही तेच.आता मुलांच्यावर व्यवसाय सोपऊन त्यांनी निवृत्ती घेतली होती खरी,पण त्यांच्या मुलाच्या सांगण्यानुसार ते ऑफिसमध्ये जात नव्हते, प्रत्यक्ष काही करत नव्हते तरी सर्व काही करत होते.त्यांनी केलेल्या कामाच्या फायली अतिशय व्यवस्थितपणे त्यांनी सांभाळल्या आहेत.आजही ज्यांचे काम केले त्यांना कागदपत्रे सापडली नाही तरी दिवाणे यांच्या फायलीत  ती सापडतात.स्वत:पुरते न पाह्ता कोणतही काम परफेक्ट करायचं हा त्यांचा गुण.त्यांच्या इतक परफेक्शन आमच्याकडे नाही अस त्यांच्या मुलांनी सांगितलं.
                          दिवाणे,यावर्षीच्या स्मरणिकेतही तुमची जाहिरातीची परंपरा तुमच्या कुटुंबीयांनी जपली.विजयाताईनी  तर यावेळी जागतिक पार्किन्सन्स मेळाव्यात गणेश स्तवनात भाग घेतला.सभा सहलीत आठवणीच्या रूपाने नेहमीच तुम्ही आमच्याबरोबर असाल.
                                   
Posted by http://parkinson-diary.blogspot.in/ at 08:32 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Saturday, 6 August 2016

मैत्रीदिनाच्या शुभेच्छा

मित्रा पर्किन्सना,तुला आणि तुझ्यामुळे जमा झालेल्या परिवारातील सर्व मित्रमैत्रीणीना मैत्री दिनाच्या शुभेच्छा! तू मित्र आहेस, पण कधी कधी राग येतो तुझा. हतबलही व्हायला होत.कठीण आहेस तू.थांगच लागत नाहीरे तुझा.पण लगेच लक्षात येत.तुझा राग करण,तुझ्याशी शत्रुत्व करण योग्य नाही.तुला आहे तसाच स्विकारण,समजून घेण आणि मैत्री निभावण हेच शहाणपणाच.मग मी सारखा तुझाच विचार करते,तुझ्याबद्दलच बोलते,तुझ्याबद्दलच लिहिते.तुझ्याबद्दल गैरसमज करून घेणार्याना तावातावाने तुझ खर स्वरूप सांगते.तुला माणसाळवण्याच मला उमगलेलं तंत्र सांगते.इतर अनेकांना हे तंत्र जमलय. त्यांच्या कडूनही तुला समजून घेते.या सगळ्या व्यापात जगभरच्या मित्र मैत्रिणी मिळाल्या मला.
शनीच फेरा,शनीची साडेसाती याबद्दल अनेकांच्या मनात अकारण भीती असते. पण जाणते सांगतात,शनी वाईट नाही तो तुमचा अहंकार उतरवतो.ज्याला अहंकार नाही त्याला तो त्रास देत नाही.तुझही असच आहे तुला समजून घेणार्यांचा तू मित्र बनतोस. मित्रा मैत्रीदिनाच्या पुन्हा शुभेच्छा!
Posted by http://parkinson-diary.blogspot.in/ at 23:10 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Tuesday, 2 August 2016

देणाऱ्याचे हात हजार

                                  जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त प्रकाशित होणाऱ्या  २०१६ च्या स्मरणिकेचे काम चालू होते.मोकळ्या जागांवर घालायला फिलर निवडून ठेवले होते.एका ठिकाणी अर्धे पान शिल्लक होते.तिथ काय टाकायचं असा विचार चालला होता.तर आमचे प्रिंटर विनय दिक्षितनी तिथ स्वत:ची जाहिरात घालून टाकली.स्मरणिकेचे काम करता करता तो आमच्या कामात गुंतत गेला. पुढच्या सभेपासून स्वयंसेवक म्हणून येणार असल्याचे त्यांनी सांगितले.असेच मदतीचे हात ज्यांची  नोंद होतच नाही.त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी हे लेखन.कृतज्ञता,आभार असे शब्द या कोणाला आवडणार नाहीत. त्यांच्या दृष्टीने त्यांनी फार काही केलेलं नसते.आमचे काम मात्र यामुळे खूप पुढे गेलेले असते.काही सातत्याने आमच्याबरोबर नसतात पण त्यात्यावेळी त्यानी निभावलेली भूमिका आमच्यासाठी मोलाची असते.
               शरच्चंद्र पटवर्धन यांनी २००० मध्ये पहिली सभा घेतली तेंव्हा 'हा जगन्नाथाचा रथ आहे,सार्‍यांनी मिळून ओढायचा आहे.गोवर्धन पर्वत आहे,सार्‍यांनी मिळून उचलायचा आहे.'असे म्हटले होते.आजही ते तितकेच खरे आहे.आपणहून सहकार्याचे हात पुढे होत आहेत.
                          मंडळाची स्वत:ची जागा नाही.पार्किन्सन्स मित्रमंडळाचे बॅकबोन असलेल्या रामचंद्र करमरकर यांच्या घरात कुणालाही पार्किन्सन्स नाही श्री.मधुसूदन शेंडे यांचे ते मित्र.त्यांच्या विनंतीवरून आले. आणि मंडळाचे सर्वे सर्वा झाले.त्यांची पत्नी, मुलगी, जावई सर्वच वेगवेगळ्या पातळ्यावर मदत करतात. त्याचं घर मध्यवर्ती असल्याने संपर्कासाठी त्यांचाच पत्ता आहे.पुण्यातले, परगावचे लोक सतत पुस्तके घेण्यासाठी, माहिती विचारण्यासाठी त्यांच्याकडे जातात .ते आणि त्यांची पत्नी सर्वांच हसतमुखाने स्वागत करतात.त्यामुळे मित्रमंडळ परिवाराशी शुभार्थी जोडले जातात.आमच्या शुभार्थींच्यात आत्मविश्वास जागवून  त्यांच्याकडून कार्यक्रमासाठी प्रार्थना बसवून घेणे त्यासाठी पेटी वाजवणे हेही त्या आनंदाने करतात.
अश्विनी हॉटेलचे अरुण देवस्थळी, २००८ पासून आम्हाला  विना मोबदला सभेसाठी जागा उपलब्ध करून देतात. तेथेच आम्ही कार्यकारिणीच्या मिटिंग घेतो.मित्रमंडळ हॉल,गांधीभवन,पुणे,दिनानाथ हॉस्पिटल यांनीही गरजेनुसार विना मोबदला जागा दिली.
मंडळ कोणतेही शुल्क घेत नाही.कामाचा पसारा वाढवायचा तर जागोजागी पैसे हवेतच.सभेच्या ठिकाणी दान पेटी ठेवली जाते.याशिवाय आपणहून आर्थिक मदत देणारे अनेक आहेत.अमेरिकास्थित सुधा कुलकर्णी या आर्थिक बाबीत फार मोठ्या आधारस्तंभ आहेत. आमची सर्व प्रकाशने त्यांचा आर्थिक मदतीमुळेच शक्य झाली.
 मुक्तांगणचा' अनिता अवचट संघर्ष सन्मान 'पुरस्कार सैलानी परिवाराचा पुरस्कार यातून आर्थिक मदत तर झालीच शिवाय काम करण्याचा उत्साह आणि जबाबदारीही वाढली.
 स्मरणीकेसाठी जाहिरात देणारेही आहेत.यांची नावे स्मरणिकेत दिली जातात.स्वत:च्याच खर्चाने सभेच्या ठिकाणी येणारे,उलट आमच्या दानपेटीतच पैसे टाकणारे तज्ज्ञ व्याख्याते, स्मरणिकेसाठी लेखन देणारे,नावे तरी किती घ्यायची?
वेबसाईट विना मोबदला करून देणारे अतुल ठाकूर,गेली आठ वर्षे नृत्योपचार चालवणारे हृषीकेश पवार याना  तर सलाम.
मंडळाचा लोगो विनामुल्य करून देणाऱ्या अश्विनी करमरकर आणि युट्युबवर आमचे व्हिडीओ टाकून देणारे दिलीप नारखेडे यांची तर आमची प्रत्यक्ष भेटही झालेली नाही सारा मामला फोनवर ,मेलवर संपर्क साधूनच.
ज्यांची नावे सर्वांसमोर कधीच येत नाहीत असे पडद्यामागचे अनेक आहेत त्यांच्यामुळे आम्ही कामाचा व्याप वाढवण्याचे धाडस करत आहोत.
हा सर्व आटापिटा पीडीग्रस्त शुभार्थींसाठी आणि त्यांचे  शुभंकर यांच्यासाठी.आपण ही मदत करू शकता.
    आम्हाला आपले हात हवेत विविध पातळ्यांवर हवेत
  •  आर्थिक - 
                आपण देणगी देऊ शकता.
               एखाद्या कार्यक्रमाचे,उपक्रमाचे प्रायोजक होऊ शकता.
               आमच्या स्मरणिकेत जाहिरात देऊ शकता.
  •   सेवा स्वरूपात.
                आमच्या विविध कार्यक्रमाना  स्वयंसेवक म्हणून मदत करू शकता.
                शुभार्थीना कार्यक्रमास येताना सोबत करु शकता.
                घर भेटीसाठी मदत करू शकता.
                शुभार्थीबरोबर कॅरम, पत्ते खेळणे,गप्पा मारणे करू शकता.
                सभेसाठी फोन करण्यात हातभार लाऊ शकता.
  •    तांत्रिक स्वरूपात.
             संगणक,इंटरनेट वापरासाठी विविध स्वरूपाची मदत
             दृक्श्राव्य फिती तयार करण्यात मदत.
             नियमित कार्यक्रमाचे फोटो,व्हिडीओ शुटींग,
             काही शुभार्थींच्या घरी जाऊन त्यांच्या कलाकृतींचे फोटो काढणे.
             मराठी,इंग्रजी मजकुराचे मुद्रितशोधन,डीटीपी.इत्यादी.
  •  जागा स्वरूपात
            नियमित कार्यक्रमासाठी पुण्यातील विविध भागात जागा उपलब्ध करून देणे.
  • तज्ज्ञत्व
           शारीरिक, मानसिक  आरोग्य, व्यायाम, विविध उपचार इत्यादीसाठी मार्गदर्शन
             
                 

        





.
Posted by http://parkinson-diary.blogspot.in/ at 20:27 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Saturday, 30 July 2016

प्रसन्नचित्त शुभार्थी सुधाकर अनवलीकार

 मंगळवारी सकाळी सकाळी आकाशवाणीवर शुभार्थी सुधाकर अनवलीकार यांच्या निधनाची वार्ता ऐकली.लगेच महाराष्ट्र टाईम्समध्येही वृत्त वाचले.तसे हे अनपेक्षित नव्हते.८०वर्षाच वय,गेली तीन वर्षे डायलेसीसही चालू होते. तरीही यापुढे त्यांचा हसतमुख चेहरा सभामधून दिसणार नाही याच दु:ख आहेच.
झुंझार पत्रकार म्हणून ते ओळखले गेले असले तरी आमची ओळख झाली ती पार्किन्सन्स शुभार्थी ( पेशंट) म्हणूनच.पार्किन्सन्स मित्रमंडळात येणाऱ्या शुभार्थीत बरेचसे मलाच का? भूमिकेत असतात.काही पीडीशी सामना करायच्या तयारीत, काही पीडीचा सहज स्वीकार करून त्याला मित्र बनविणारे.अनवलीकरांचा खाक्या  मात्र वेगळाच होता. पीडी त्यांच्या खिजगणतीतही नव्हता.सो व्हाट? असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर असायचा. त्यांना तोल जाण्याची समस्या होती ते सभेला सुरुवातीला एकटेच यायचे.एकदोनदा पडलेही पण  काहीच झाले नाही अशा अविर्भावात उठून बसले.त्यांना बोलण्याची समस्या निर्माण झाली होती.पण पार्किन्सन्स त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र पुसू शकला नाही.पिडीमुळे चेहर भावविहीन होतो हे त्यांच्यासारखेच आमचे अनेक शुभार्थी खोटे ठरवतात.पत्रकार म्हणून त्यांची ओळख आम्ही घरभेटीचा उपक्रम सुरु केला तेंव्हा झाली.सहजी संवादिजे या आगामी पुस्तकाची प्रुफे आली होती.अतिरथी महारथींची  व्यक्ती चित्रे त्यात होती. नानासाहेब परुळेकर,बालगंधर्व,कृष्णराव फुलंब्रीकर,ग.दि.माडगुळकर,पु.ग सहस्त्रबुद्धे,श्री कृ.कोल्हटकर,मनोहर माळगावकर अशी कितीतरी नामवंत मंडळी, प्रुफ चाळताना मला दिसली. पुस्तक प्रकाशित झाल्यावर अनवलीकर यांचे सहाध्यायी शंकर सारडा यांच्या प्रस्तावनेतून अनवलीकारांच्या जडणघडणीतल्या ,व्यक्तीमत्वातल्या अनेक बाबी निदर्शनास आल्या'.सिद्धहस्त वार्ताहर आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्व' असे त्यांचे वर्णन त्यानी केले.घरची परिस्थिती बेतासबात असल्याने शिक्षणासाठी, जगण्यासाठीचा झगडा खडतर होता.अर्थार्जनासाठी कराव्या लागणाऱ्या छोट्या मोठ्या कामातून साहित्यिक विचारवंत यांचा सहवास लाभला.त्यांतून जे अनौपचारिक शिक्षण मिळाले ते व्यक्तिमत्व संपन्न करणारे,बहुश्रुत करणारे होते.दहावीनंतर लगेच सकाळ मध्ये अर्धवेळ शिकाऊ पत्रकार म्हणून वर्णी लागली.सुंदर अक्षर आणि बिनचूक लेखन यामुळे डॉक्टर परुळेकर यांचा लेखनिक होता आल. आणि पत्रकारितेत पाय रोवण्यासाठी पत्रकारितेला आवश्यक असे विविध विषयाचे ज्ञानही झाले.बरोबरीने मराठी विषयात एम.ए.झाले.६२ सालपर्यंत ते सकाळ मध्ये होते.महाराष्ट्र टाइम्स दैनिकाच्या पहिल्या अंकापासून ते ३३ वर्षे मटाच्या सेवेत होते.अनेक प्रकरणे उघडकीस आणून त्यांनी शोध पत्रकारितेचे विश्व गाजवले.त्यांच्या लेखणीने विविध विषयांत स्वैरसंचार केला.पु.ल.देशपांडे,ग,दि माडगुळकर,श्री.के क्षीरसागर यांच्यासारख्या मातब्बरांनी त्यांच्या लिखाणाचे कौतुक केले.त्यांच्या लेखांची 'भुलाये न बने,'' बोला अमृत बोला','सुजन कसा मन चोरी' ही पुस्तके झाली.अभिनेत्री हंसा वाडकर यांचे आत्मकथन 'सांगत्ये ऐका' हे त्यांनीच माणूस मध्ये शब्दांकित केले.
मंडळात ते सामील झाले तेंव्हा हा भूतकाळाचा झगमगाट उरलेला नव्हता.वळणदार अक्षर आणि थोरामोठ्यांच्या  मुलाखती घेण्याची क्षमता असणारी वाणी ही अस्त्रेच  पार्किन्सन्सने बाधित झाली होती.प्रसन्न चित्ताला  मात्र पार्किन्सन्सला हात लावता आला नाही.ज्यांच्या व्यवसायात बोलण हे महत्वाच असत असे प्राध्यापक,वकील,समुपदेशक असणारे अनेक शुभार्थी वाणीवरच्या हल्ल्याने कोसळून जातात.पार्किन्सन्स झाल्याच लपवतात.शुभार्थीच नाहीतर तरुणवयात मोठ्ठी पद भूषविणारे अनेक जेष्ठ नागरिकही वास्तव नाकारून भूतकाळच उगाळत बसतात. अनवलीकरांच मात्र अस नव्हत.मासिक सभाना  ते यायचे,जेष्ठ नागरिकांच्या मेळाव्यातून दिसायचे. स्मरणिकेत त्यांनी स्वत:च्या कविता दिल्या. डायलेसीस सुरु झाल्यावरही ते सभांना आले.जानेवारीत दिनानाथ हॉस्पिटलमध्ये झालेल्या डॉक्टर मंदार जोग यांच्या व्याख्यानाला तर ते डायलेसीस करून लगेच आले होते.एप्रिलमध्ये जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्तच्या मेळाव्यालाही ते हजर राहिले.आता त्यांची अवस्था खर तर विकलांग म्हणता येईल अशी होती पण अशा परीस्थितीतही त्यांना सभांना यावेसे  वाटे आणि त्यांची पत्नी त्यांना घेऊन येई.दोघानाही दाद द्यायला हवी.
'सहजी संवादिजे ' या अनवलीकारांच्या पुस्तकात त्यांनी श्री.के.क्षीरसागर यांची जीवनविषयक भूमिका दिली होती." माझ्यासारखे रोमँटिक पिंडाचे लोक पुष्कळदा नकळत सुखाकरता नव्हे,दु:खाकरता नव्हे तर केवळ अनुभवाकरता जगत असतात.' अनुभव ' म्हणूनच त्याचं अनुभवावर प्रेम असत....बाह्य जीवनात यश येवो वा अपयश येवो,सुख येवो वा दु:ख येवो,आरोग्य वा रूग्णावस्था येवो,माझा हा मानसिक प्रवास चाललेलाच आहे."अनवलीकराना हे पटलेलं असाव.पार्किन्सन्सकडेही त्यांनी एक अनुभव म्हणूनच पाहिलं असेल का?
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Posted by http://parkinson-diary.blogspot.in/ at 06:40 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Tuesday, 29 March 2016

जानेवारी १६ पासून मित्रमंडळ वार्ता

        
     २०१६ या  नवीन वर्षाची सुरुवात दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि पार्किन्सन्स मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर मंदार जोग ( कॅनडा ) यांच्या व्याख्यानाने  झाली.समारंभास १५० शुभंकर, शुभार्थी उपस्थित होते.
पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या इतिहासात दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा सहभाग वेगवेगळ्या टप्प्यावर होता.३० जून २००२ मध्ये  दिनानाथ मंगेशकर  हॉस्पिटलने पार्किन्सन्स रुग्णांसाठी मेळावा आयोजित केला होता.त्यावेळी आपापल्या पातळीवर पीडी पेशंटना एकत्रित करण्याचे काम करणारे श्री.मधुसूदन शेंडे आणि शरच्चंद्र पटवर्धन हे जुने मित्र  भेटले.आणि त्यांचे एकत्रित काम सुरु झाले.
२००८  मध्ये पार्किन्सन्स मित्रमंडळाने जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये  मेळावा आयोजित केला.त्यावेळी उत्तम प्रतीसाद मिळाला, अनेक कार्यकर्ते मिळाले आणि मंडळाच्या कामाचा वेग वाढला.आणि आता २०१६ मध्ये हॉस्पिटल आणि मंडळ या दोघांनी एकत्रित कार्यक्रमाचे आयोजन केले आहे'Together we move better. '
 कार्यक्रमाची सुरुवात 'सं गच्छ्यध्वं सं वदध्वं' या ऋग्वेदातील प्रार्थनेने झाली.
यानंतर डॉक्टर मंदार जोग,दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या न्युरॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर राहुल कुलकर्णी,आणि पार्किन्सन्स मित्रमंडळाचे संस्थापक सदस्य शरच्चंद्र पटवर्धन यांचा श्री करमरकर यांनी पुष्प गुछ्य देऊन सत्कार केला. शरच्चंद्र पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले.डॉक्टर राहुल कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केल्यावर डॉक्टर मंदार जोग यांना व्याख्यानासाठी पाचारण करण्यात आले.शोभना तीर्थळी यांनी त्यांची ओळख करून दिली.
  डॉक्टर मंदार जोग (  M.D.,F.R.C.P.C. )कॅनडा येथील नॅशनल पार्किन्सन्स फाउंडेशन सेंटर ऑफ एक्स्लन्स्,इन पर्किन्सन्स डिसीज अँड मुव्हमेंट डिसॉर्डर् प्रोग्रॅम,हेल्थ सायन्स सेंटर.या संस्थेचे डायरेक्टर अहेत.वेस्टर्न युनिव्हर्सिटी मध्ये न्युरॉलॉजीचे प्रोफेसर आहेत.कॅलिफोर्निया येथिल स्टँडफर्ड रिसर्च इन्स्टिट्युट येथेही व्हिजिटींग प्रोफेसर आहेत.
   टोरांटो येथे त्यांचे  न्युरॉलॉजिचे शिक्षण झले.डॉक्टर अँथनी लँग यांच्या बरोबर मुव्ह्मेंट डिसऑर्डर मध्ये फेलोशिप पुर्ण केली.एम.आय.टी.मध्ये कॉम्प्युटेशनल न्युरोसायन्समध्ये पोस्ट्डॉक्टरल फेलोशिप पुर्ण केली.त्यांची स्वतंत्र क्लिनिकल प्रॅक्टीस आहेच शिवाय पदव्युत्तर,पीएचडी,आणि पोस्ट डॉक्टरल फेलोच्या संशोधनात ते मार्गदर्शन करतात.
त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.Basel ganglia & their role in movement disorder या विषयातील त्यांचे शेकडो शोध  निबंध  प्रसिद्ध झालेले आहेत.
मेडिकल टेक्नोलॉजीमधील पेटंटस त्याना मिळालेली आहेत.ते फक्त पेटंट घेऊन थांबले नाहीत तर न्युरो टेक्नोलॉजीमधील कंपन्याही कंपन्यांचीही त्यांनी स्थापना केली आहे.
डॉक्टर जोग विविध देशात व्याख्याने देतात.तसेच कार्यशाळाही घेतात.
या बहुआयामी कार्यामुळे त्याना संशोधन,अध्यापन,नवनिर्मिती साठी विविध मान्यवर संस्थांचे पुरस्कार मिळालेले आहेत.
त्यांनी आपल्या व्याख्यानात सुरुवातीला पार्किन्सन्स होण्याची शक्यता कोणकोणत्या बाबीमुळे वाढू शकते हे सांगितले.डीबीएस सर्जरीबाबत विविध स्लाईड्सद्वारे माहिती सांगितली.संशोधनावस्थेतील उपचारांचा आढावा घेतला.त्यांच्या अत्यंत सोप्या शैलीतील ओघवत्या भाषणामुळे एक तास कसा गेला समजला नाही.
यानंतर श्रोत्यांच्या अनेक प्रश्नाना त्यांनी उत्तरे दिली.
(डॉक्टर मंदार जोग यांचे संपूर्ण भाषण वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.)
आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाचे सूत्र संचालन शोभना तीर्थळी यांनी केले.
दिनानाथ हॉस्पिटलने सर्वांसाठी चहा बिस्किटाची व्यवस्था केली होती.येथे सर्वाना एकमेकांशी चर्चा करण्यास ओळखी करून घेण्यास अवधी मिळाला.

             १३ फेब्रुवारी १६ सभेचा वृत्तांत
                             शनिवार दिनांक १३ - २ - १६ रोजी हॉटेल अश्विनी येथे पार्किन्सन्स मित्रमंडळाची सभा आयोजित केली होती.. शुभंकर आणि शुभार्थी यांच्या परस्पर अनुभव आणि विचारांची देवाणघेवाण ( sharing ) असा कार्यक्रम झाला.यावेळी 'पार्किन्सन्ससह जगताना जगण्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी,लक्षणावर मात करण्यासाठी,आनंदी राहण्यासाठी शुभार्थीना कोणाची आणि कशी मदत होते, याबाबतचे अनुभव सांगायचे होते,कृतज्ञता व्यक्त करायची होती,.सभेस ३५ ते ४० सभासद उपस्थित होते.प्रार्थनेने सभेस सुरुवात झाली.यानंतर आशा रेवणकर यांनी भारती विद्यापीठातील Palliative care वर झालेल्या इंटरनॅशनल सेमिनारच्या सहभागाबद्दल माहिती सांगितली. त्या, शरच्चंद्र पटवर्धन,रामचंद्र करमरकर यांच्यासह या सेमिनार मध्ये सहभागी झाल्या होत्या.या अनुभवाबरोबर शुभंकर म्हणून अनुभवही सांगितले.पतीचा पीडी हाताळण्यात आणि मानसिक आधारासाठी पार्किन्सन्स मित्रमंडळाचा आधार वाटत असल्याचे मत व्यक्त केले.शरच्चंद्र पटवर्धन यांनी यांनीही आपले सेमिनारविषयी अनुभव सांगितले.यानंतर शोभना तीर्थळी यांनी शेअरिंगसाठी असा विषय ठेवण्यामागची भूमिका सांगितली.आपण सकारात्मक विचार करा असे नेहमी सांगतो पण त्यासाठी काय करायचे असा प्रश्न असतो. कृतज्ञता व्यक्त करणे हा सकारात्मकतेकडे.नेण्याचा मार्ग आहे मानसोपचार तज्ज्ञही हे सांगत असतात.सकारात्मकतेकडे जाण्याच्या विविध वाटा दाखवणार्‍या'बी +Ve
सकारात्मक विचार ......प्रवास पुर्णत्वाकडे'
 या पुस्तकाबाबत श्री. करमरकर यांनी  माहिती सांगितली.
जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातील शुभंकर आणि शुभार्थींचे वाढदिवस नेहमीप्रमाणे हास्याचा फुगा फोडून आणि अंजलीने स्वहस्ताने केलेली भेटकार्डे देऊन साजरे करण्यात आले.
यानंतर शुभार्थींनी आपले अनुभव सांगण्यास आणि कृतज्ञता व्यक्त करण्यास सुरुवात झाली.
आर्किटेक्ट असलेल्या चंद्रकांत दीवाणेनी पत्नी व मुलाच्या सहकार्याने १५ वर्षे पीडीला सहन करत असल्याचे,कार्यरत राहिल्याचे श्रेय दिले. त्यांच्याबरोबर आलेल्या मुलाने मात्र त्यांची  इच्छा शक्ती महत्वाची असल्याचे सांगितले.
९३ वर्षांचे  शुभार्थी कलबाग यांची ओपन हार्ट सर्जरी झाली आहे.त्यांच्या पत्नीला पीडी होता त्या २००४ साली निवर्तल्या.मुले परदेशी.आणि हे एकटेच राहतात.दैनंदिन व्यवहार,आजारपण.होस्पिटलायझेशन यात त्याना कोठेच अडचण येत नाही.त्यांचे सिनिअर सिटीझन गटातील सहकारी,जोडलेली माणसे त्याना मदत करतात.
परभणीचे श्री सोमाणी मंडळाच्या सभांना मुद्दाम हजर राहतात.परभणीला त्याना पिडीबद्दल काहीच माहिती मिळत नव्हती.मंडळात सामील झाल्यावर मात्र पीडीबाबतची भीती कमी झाली.मंडळाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
मोरेश्वर काशीकर हे स्वत:ची कामे स्वत: करतात.त्यांच्या कुटुंबीयांनी त्याना अजून पीडी पेशंट म्हणून स्वीकारलेच नव्हते.आता त्याना थोडा वळताना फ्रीजिंगचा त्रास होतो. निर्णय क्षमता थोडी कमी झाली असे वाटते.पण योगाच्या सहायाने त्यावर मात करू पाहतात.स्वत:च स्वत:चे शुभंकर होण्यासाठी योगोपचाराबरोबर,रोज मराठी आणि इंग्लिश मध्ये काही तरी लिहिणे,कपडे वळत घालणे,इस्त्री करणे इत्यादी कामे ते करतात.सहा महिन्यांनी न्युरॉलॉजीस्टकडे जातात. याकाळातील सर्व बाबींचे निरीक्षण करून नोंदी करून त्याची यादी घेऊन जाऊन त्यांच्याशी चर्चा करतात.पीडी झाल्यावर  इतर उपचार न करत बसता लगेच न्युरॉलॉजीस्टनी सांगितलेली औषधे घेतली.यामुळे ही पीडी नियंत्रणात राहिला.ताठरतेसाठी व्यायाम आणि  कंपासाठी शवासन, ध्यान उपयोगी पडते.इतर शुभार्थीना घरी जाऊन मार्गदर्शन केल्याने आनंद मिळतो पीडी नसणारे लोकही मंडळासाठी काम करताना पाहून कृतज्ञता व्यक्त कारावीशी वाटते.
गोपाळ तीर्थळी यांनी पीडीसह आनंदाने राहण्यात पत्नी व इतर शुभंकरांचा वाटा खूप मोठ्ठा असल्याचे सांगत आपल्या  पत्नीला इतर शुभंकराबद्दल सांगण्यास सांगितले.शोभना तीर्थळी यांनी २०१५ च्या  स्मरणिकेतील 'तुम्ही पण बना रोलमॉडेल' या लेखात तीर्थळी यांनी पार्किन्सन्सला यशस्वीपणे हाताळण्यासाठी काय केले याची सविस्तर माहिती दिल्याचे सांगितले.पार्किन्सन्स मित्रमंडळ डॉक्टर,,शेजारी,हास्यक्लब सदस्य,जेष्ठ नागरिक संघ सदस्य,घरातील नोकर अशी मोठ्ठी सपोर्ट सिस्टीम पाठीशी उभी असल्याचे सांगत या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
फॉरेस्ट ऑफिसर असलेल्या यशवंत एकबोटे यांना पीडी झाल्यावर नैराश्य आले.फॅमीली डॉक्टर्,न्युरॉलॉजिस्ट
यांनी धीर दिलाच पण पत्नीने यातून बाहेर काढण्यासाठी नेटाने प्रयत्न केले.टेबल पुसणे,कपबशी धुणे अशी
छोटो छोटी कामे करायला लावली,आहार औषधे यांचे नियोजन केले,मुख्यत: सकारात्मक विचार करायला लावले.मसाजीस्ट,अमेरिकेत असली तरी तेथून पीडी बद्दल अभ्यास केल्याने,मार्गदर्शन करणारी ,मानसिक आधार देणारी मुलगी आणि इतर कुटुंबियांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
शुभार्थी देसाई यांच्या वतीने वसुधा देसाई यांनी डॉक्टर्स, सोसायटीतले शेजारी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.देसाई यांच्या इच्छाशक्तीचाही त्यांच्या मोठ्या दुखण्यातून बरे होण्यातील वाटा सांगितला.
पाडळकर हे चिंचवडहून आले होते.त्यांनी कुटुंबीय विशेषत: पत्नीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
घोलप यांनी नेहमीच सभांना येत असल्याचे आणि त्याचा फायदा होत असल्याचे सांगितले
.केशव महाजन यानी पत्नीबद्दल भरभरून भावना व्यक्त केल्या.देवाबद्दल असलेली श्रद्धा आनंदी राहण्यात महत्वाची असल्याचे सांगितले.कॅरम खेळण्यासाठी येणारे पार्टनर,राजकुमार आवडता नट हे ओळखून त्यांच्या सीडी भेट देणारे मित्र अशा अनेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.त्यांची पत्नी अंजलीने ते आपल्या १०३ वर्षाच्या आईची  आनंदाने सेवा करतात.मुलगी आणि नातू यांचा फोनवर आवाज ऐकूनही मानसिक समाधान मिळत असल्याचे सांगितले.
पद्मजा ताम्हणकर यांनी पार्किन्सन्स मंडळात आल्याने आनन्द वाटतो.इतरत्र संकोच वाटतो असे सांगितले.पती,मुले सुना स्तोत्रे,ओंकार द्वारे अध्यात्मिक साधनाही बळ देते.तरुण पिढीला  बेफिकीर म्हटले
जाते पण आपल्याला त्यांची वेळोवेळी मदत होत असल्याचे सांगितले.
भांगे यांनी पत्नी तसेच योगी अरविंद साहित्य,सावरकर इत्यादींच्या वाचनाने आधार मिळत असल्याचे सांगितले.
श्रद्धा भावे यांनी पती, मुले योग्य तेथे मदत करतात,काळजी घेतात. पण स्वत:ची कामे स्वत: करायला लावून  आत्मविश्वास वाढवण्यास प्रवृत्त करतात असे सांगितले.
अनिल कुलकर्णी यांनी सपोर्ट ग्रुप आणि न्युरॉलॉजीस्ट यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
रामचंद्र करमरकर यांना या गटात आणणार्‍या मित्राची, मधुसुदन शेंडे यांची आठवण झाली.त्यांच्यामुळे या कामात ओढला गेलो आणि यातून  खूप आनंद मिळत असल्याचे नमूद केले.शरच्चंद्र पटवर्धन आणि श्यामला शेंडे यांनी.त्यांनी उभे केलेले काम पुढे नेणार्‍या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या दोन तास चाललेल्या चर्चेतून प्रत्येकाला व्यक्त व्हायचं असत.यासाठी व्यासपीठ हव असत हे लक्षात आल. स्वमदत गटाबद्दल अनेकांनी कृतज्ञता व्यक्त करून अशा गटाची गरज अधोरेखित केली. अशा चर्चा वेळोवेळी ठेवणे आवश्यक आहे असे संयोजकांनाही जाणवले.
 शुभार्थी नलिनी भडभडे यांचे पती मुद्दाम सभेला आले होते त्यांनी तिळगुळ समारंभासाठी देणगी दिली.वसुधा देसाई यांनी वाढदिवसाबद्दल पेढे दिले.  
सर्वाना तिळगुळ देण्यात आला. आणि चहापानानंतर प्रार्थना होऊन कार्यक्रमाची सांगता  झाली.
                                                मार्च वृत्त
सैलानी परिवार, सांगवी यांच्याकडून देणगी.
सैलानी परिवार, सांगवीच्या अरविंद काशिनाथ भागवतआणि सहकारी यांच्यामार्फत ३ मार्च या त्यांचे गुरु सैलानी यांच्या वाढदिवसाप्रीत्यर्थ सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या संस्था निवडून सत्कार केला जातो व देणगी दिली जाते.यावर्षी नाम,स्नेहालय,कामायनी इत्यादी संस्थांबरोबर पार्किन्सन्स मित्रमंडळाचीही निवड केली होती.शरच्चंद्र पटवर्धन,आशा रेवणकर आणि अंजली महाजन यांनी या कार्यक्रमास हजर राहून हा सत्कार स्वीकारला.यावेळी सत्काराबरोबर १११११ रुपयांची देणगी दिली गेली.शुभंकर अंजली महाजन यांनी' रंगतरंग 'या दिवाळी अंकात मंडळाची माहिती देणारा लेख दिला होता.तो वाचून ही निवड करण्यात आली.
१० मार्च सभा वृत्त
गुरुवार दि.१० मार्च रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने अश्विनी हॉटेल येथे सभा आयोजित केली होती. सभेस ८० सदस्य उपस्थित होते.
प्रार्थनेने सभेस सुरुवात झाली.यानंतर शुभंकर, शुभार्थी यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले.
डॉक्टर संजीव डोळे आणि भारती विद्यापीठाच्या होमिओपॅथी विभागाच्या प्रमुख प्रो.डॉक्टर अनिता पाटील, त्यांचे सहकारी आणि एमडी करणारे डॉक्टर यांचे स्वागत करण्यात आले.
पार्किन्सन्स आणि होमिओपॅथी उपचार 'या विषयावर भारती विद्यापीठाने संशोधन प्रकल्प हाती घेतला आहे.ज्या पार्किन्सन्स शुभार्थीना या संशोधनात स्वेच्छेने सहभागी व्हायचे आहे त्यांना त्यांच्या आजाराची चिकित्सा करून वर्षभर मोफत औषधे दिली जाणार आहेत.
डॉक्टर डोळे यांनी सुरुवातीला या संशोधनाचे स्वरूप आणि उद्दिष्टे सांगितली. होमिओपॅथीमध्ये' व्यक्ती तितक्या प्रकृती' असे मानले जाते.पार्किन्सन्स पेशंटच्या बाबतीतही प्रत्येकाची समस्या वेगळी असेल.या संशोधनात एमडी करणाऱ्या प्रत्येक डॉक्टरकडे एक किंवा दोन पेशंट असतील.वर्षभर ते त्या पेशंटचा फालोअप घेतील.पेशंटना सोयीच्या ठिकाणी तपासले जाईल. बदल पाहण्यासाठी व्हिडीओ शुटींग घेतले जाईल.या सर्वांना डॉक्टर डोळे मार्गदर्शन करतील.औषधेही डॉक्टर डोळे ठरवतील.निघालेले निष्कर्ष प्रकाशित केले जातील.
प्रो.डॉक्टर अनिता पाटील यांनी संशोधन करणारी भारती विद्यापीठ ही संस्था ५० वर्षाचा इतिहास असलेली असून .होमिओपॅथी कॉलेजला २५ वर्षे झाली असल्याचे सांगितले.सोमवार ते शुक्रवार संस्थेच्या फिरत्या दवाखान्याद्वारे खेडोपाडी जाऊन मोफत वैद्यकीय सेवा दिली जाते असेही सांगितले.हे संशोधनही अशा सामजिक जाणीवेतून केले जात आहे.ही औषधे इतर औषधे चालू असताना घेता येतील.निरोगी माणसांवर प्रयोग करून ती तपासली असल्याने याचे दुष्परिणाम नाहीत.अ‍ॅलर्जी नाही.आपल्या न्युरॉलॉजिस्टना याबाबत सांगावे.गरज वाटल्यास डॉक्टर डोळेही त्यांच्याशी संवाद साधतील.डॉ.डोळे यांनी नागपूर येथे झालेल्या वैद्यकीय परिषदेत पार्किन्सन्सवर रिसर्च पेपर सदर केला होता त्याचा बेस्ट पेपर म्हणून गौरव झाल्याचेही डॉ.पाटील यांनी सांगितले.
डॉक्टर राजश्री बोंगाळे यांनी आपल्या पीडी पेशंट वडिलांचे अनुभव सांगितले.
शुभार्थी शेखर बर्वे यांनी वसुधा बर्वे यांना २०१२ पासून न्युरॉलॉजिस्ट डॉ.दिवटे यांना विचारून डॉ.डोळे यांचे होमिओपॅथी उपचार चालू केले.आजाराची वाढ झाली नाही. अ‍ॅलोपॅथीची औषधे वाढली नाहीत.स्मरणशक्ती चांगली राहिली असे फायदे झाल्याचे सांगितले शंका.मनात न ठेवता विश्वासाने औषधे घ्या असा सल्लाही दिला.दिनेश पुजारी आणि श्री. चौगुले या शुभार्थीनीही आपल्याला होमिओपॅथी औषधाने फायदा झाला असल्याचे सांगितले.
डॉक्टर डोळे यांनी श्रोत्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.गोळ्या गोड असल्याने डायबेटीस पेशंटना त्रासाचे होते हा गैरसमज आहे.याला पथ्यपाणी नाही. काहीच औषधांच्या बाबतीत कांदा आणि कॉफी वर्ज्य करावे लागते.आमची औषधे प्रयोगाने सिद्ध झालेली असल्याने तुम्ही गिनिपिग आहात असा विचार करू नका असे सांगितले.उपचारात आजार वाढू नये,कदाचीत औषधाचे प्रमाण कमी होईल,मानसिक स्वास्थ्य,सर्वसाधारण तब्येत चांगली राहिल्याने आजार बळावणार नाही.हे फायदे होतील.
इच्छ्युक पेशंटनी आपले सर्व रिपोर्ट,चालू असलेल्या गोळ्या प्रथम भेटीत दाखवाव्या.असे डॉ.पाटील यांनी सांगितले.
अनेक शुभार्थीनी संशोधनात सहभागी होण्यासाठी नवे नोंदविली.
चहा बिस्किटांचा खर्च वाढदिवसानिमित्त शरच्चंद्र पटवर्धन यांनी केला.उषा काळे यांनी पेढे दिले.
जागतिक पार्किन्सन्स दिवस मेळावा ११ एप्रिल वृत्त
                   रविवार  दिनांक १0 एप्रिल रोजी लोकमान्य सभागृह, केसरी वाडा येथे जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त मेळावा आयोजित केला होता.एप्रिलच्या  भर उन्हात दुपारी साडे चारला  कार्यक्रमास २०० ते २५० शुभंकर शुभार्थी आणि हितचिंतक उपस्थित होते
    सुजाता हरगुडेने काढलेल्या सुंदर रांगोळीमुळे प्रसन्न मनाने सर्व आत प्रवेश करत होते.चाफ्याचे फुल देऊन सर्वांचे  स्वागत केले गेले.
                    गणेश वंदना आणि त्यानंतर' हमको मनकी शक्ती दे'  या आत्मिक बळ देणाऱ्या'  प्रार्थनेने सभेला सुरुवात झाली.प्रार्थनेत विनया मोडक. वसुधा बर्वे,पद्मजा ताम्हणकर, सविता ढमढेरे आणि अंजली महाजन, या शुभार्थी आणि  शुभंकरांनी सहभाग घेतला.संवादिनीवर त्यांच्या गुरु अनुपमा करमरकर होत्या .
संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन व संचालन सौ.आशा रेवणकर   यांनी आपल्या ओघवत्या आणि माहितीपूर्ण शैलीत केले.मंडळाचे संस्थापक सदस्य श्री शरच्चंद्र पटवर्धन यांनी आपल्या प्रास्ताविकात श्रोत्यांशी संवाद साधला.
( स्मरणिकेत हे प्रास्ताविक समाविष्ट केले आहे.)
                 सुरुवातीचा कार्यक्रम शुभार्थींच्या नृत्याविष्काराचा होता.त्यांचे संचालन हृषीकेश पवार आणि प्रियशा यांनी केले.लय, तालबद्ध व नियंत्रित हालचाली यांनी कार्यक्रम सुरुवातीसच खूप उंचीवर गेला.
 प्रेक्षकांनी या  कार्यक्रमाला उभे राहून सलामी दिली.नृत्यामध्ये विलास जोशी,प्रज्ञा जोशी,मृत्युंजय हिरेमठ,शरद सराफ,प्रभाकर आपटे,सौ लेले,विजय देवधर,शशिकांत देसाई,श्री.देसाई,कर्नल पी.व्ही.चंद्रात्रेय या शुभार्थिनी आणि ,सौ.शेंडे या शुभंकरानी सहभाग घेतला.या सर्वांच्या आणि हृषीकेशच्या साडे सात वर्षाच्या परिश्रमाचे हे फलित होते.हृषीकेशने या उपक्रमाची फोटोसह माहिती हावर्ड युनिव्हर्सिटीच्या अल्टरनेटीव थेरपीत समाविष्ट झाल्याचे सांगितले.२०१५/१६ मध्ये  तयार झालेल्या डान्स फॉर पार्किन्सन्स या फिल्मचे अमेरिकेच्या 'मायकेल जे फॉक्स रिसर्च' सेंटरमध्ये स्क्रीनिंग झाले तो अनुभवही आनंददायी होता असे सांगितले.अत्यंत सहज हालचाली करणाऱ्या श्री सराफ यांच्या पायात नुकताच रॉड घातला आहे हे सूत्र संचालिकेने सांगितले तेंव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले.
              यानंतर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉक्टर विद्याधर वाटवे यांचे श्री.शरच्चंद्र  पटवर्धन यांच्यासह मंचावर आगमन झाले.सर्वांनी उभे राहून मानवंदना दिली.यानंतर श्री पटवर्धन यांनी पुष्पगुच्छ देऊन
पाहुण्यांचा सत्कार केला.पाहुण्यांच्या सत्कारानंतर गेली आठ वर्षे अश्विनी हॉटेल कार्यक्रमासाठी मोफत देणारे  श्री.देवस्थळी,नृत्योपचारासाठी स्वत:च्या घरातील हॉल गेली सात वर्षे देणाऱ्या सुमन जोग,दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या वृषाली बेलेकर,स्मरणिकेच्या प्रत्येक अंकात माहेश्वरी बँकेची जाहिरात देणाऱ्या उर्मिला तोष्णीवाल यांचा सत्कार करण्यात आला.
मंडळ दरवर्षी या कार्यक्रमात स्मरणिका प्रकाशित करते.डॉक्टर  विद्याधर वाटवे यांच्या हस्ते टाळ्यांच्या गजरात स्मरणिकेचे प्रकाशन झाले.
डॉक्टर वाटवे यांनी स्वत:ची ओळख स्वत:च करून देणार असल्याचे सांगितले होते.त्यांनी  एमडी,डीपीएम.ही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी व पदविका प्राप्त केली आहे.पुना हॉस्पिटलच्या स्थापनेपासून ते तेथे कार्यरत आहेत. अखिल भारतीय मानसोपचार तज्ज्ञ संघटनेचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते.जागतिक मानसोपचार तज्ज्ञ संघटनेचेही ते सदस्य आहेत.
 आपल्या व्याख्यानात  डॉक्टर वाटवे यांनी प्रथम पार्किन्सन्स आजार म्हणजे काय, त्याची लक्षणे याबद्दल माहिती सांगितली.पार्किन्सन्स पेशंटला होणाऱ्या मानसिक आजाराचे निदान करताना  प्रथम पीडीची औषधे,डायबेटीस,बीपी इ.ची औषधे याचा काही परिणाम आहे का हे पाहावे लागते.त्यानुसार पुढे औषधोपचार करावे लागतात.पीडी पेशंटबाबत न्युरॉलॉजीस्ट हा टीम कप्तान असतो.
पार्किन्सन्स मध्ये होणाऱ्या मानसिक आजारात प्रथम क्रमांक डिप्रेशनचा.४०% पेशंटमध्ये ते आढळते.काही वेळा डिप्रेशन निदान झाल्यावर त्या  धक्क्यातून तात्कालिक असे ते असते.डोपामिनची पातळी कमी झाल्यानेही उदभऊ शकते. काहीवेळा पीडीची इतर लक्षणे दिसण्यापुर्वी लक्षण म्हणूनही डिप्रेशन आढळते.यासाठी दिल्या जाणाऱ्या औषधाने काही वेळा  कॉन्स्टिपेशन,अस्वस्थता असे साइड इफेक्ट होतात.शॉक  ट्रिटमेंट हा सर्वात सुरक्षित उपचार आहे. पण त्याबाबत गैरसमज आढळून येतात.सिनेसृष्टीतील  अतिरंजित कथा यात भर टाकतात.
यानंतर येतो  चिंतातूरता( anxiety ) हा आजार.यात विविध प्रकारची भीती,काळजी येते.यासाठी  anti anxiety औषधे,समुपदेशन,सायको थेरपी यांचा उपयोग होतो.
निर्विकारता ( Apathy ) बऱ्याच पेशंटमध्ये दिसते.हा औषधाचा परिणामही असू शकतो.याशिवाय सायकोसीस,यात hallucination,delusion यांचा समावेश होतो.काही वर्तन समस्याही असतात.
 डिमेन्शीया,यात बुद्धी,भावना,व्यक्तिमत्वाचा हळूहळू ऱ्हास होतो हाही काहीजणात संभवतो.पूर्वी मानसोपचाराच्या औषधाने पीडी वाढायचा परंतु आता अनेक नविन औषधे आली आहेत.या सर्वावर न्युरॉलॉजीस्टआणि मानसोपचार तज्ज्ञ यांच्या सहाय्याने उपचार करता येतात.शुभंकराची भूमिकाही महत्वाची असते.
भाषणात शेवटी प्रार्थना, नृत्य यांचे त्यांनी कौतुक केले.स्वमदत गटही मानसिक आधारासाठी सहाय्यक ठरत असल्याचे सांगितले.
यानंतर श्रोत्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली.
रामचंद्र करमरकर यांनी विविध निवेदने केली.
दीपा होनप यांनी आभारप्रदर्शनाचे काम अत्यंत भावपूर्ण शब्दात केले.
शेवटी सर्व उपस्थितांचे तोंड पेढ्यांनी गोड करून कार्यक्रम संपला.उपस्थित शुभार्थीना स्मरणिका मोफत देण्यात आल्या.सभेस  येऊ न शकलेल्याना पोस्टानी पाठवण्यात येतील असे जाहीर करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यात अनेक स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग असतो.छपाईचे काम करताना इतरही मदत करणारे विनय दिक्षित, येणाऱ्यांची नोंद् ठेवणारे व स्वागत करणारे  सुनंदा गोडबोले,रेवती हर्डीकर,सुहास हर्डीकर,अरुंधती जोशी;पुस्तक विक्रीचे काम करणारे हरिप्रसाद व उमा दामले,अजित कट्टी,विनया व मोरेश्वर मोडक,हे सर्व आमचेच आहेत.त्यांचे नेहमीच सहकार्य असणार आहे याची खात्री आहे.
या कार्यक्रमाचे व्हिडीओ शुटींग आणि फोटो काढण्याचे काम शशांक साठे आणि प्रशांत शेंडे यांनी उत्तमरीत्या केले आहे.वेबसाईटवर ते देण्यात येईल.कार्यक्रमास उपस्थित राहू न शकलेल्याना कार्यक्रमाचा आस्वाद घेता येईल.
     मे २०१६ वृत्त
 होमिओपॅथिक संशोधन 
भारती विद्यापीठाचा होमिओपॅथी विभाग आणि संजीवन होमिओपॅथी,हेल्थकेअर आणि रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर सॅम्युअल  हॅनिमन यांच्या २६१ व्या जयंतीनिमित्त 'पार्किन्सन्सवर होमिओपॅथीक उपचार' असा संशोधन प्रकल्प हाती घेतला आहे.भारती विद्यापीठातील एमडी करणारे डॉक्टर्स पार्किन्सन्स रुग्णांची वर्षभर मोफत तपासणी करून व उपचार  करतील.संजीवन होमिओपॅथी,हेल्थकेअर आणि रिसर्च सेंटरचे डॉक्टर संजीव डोळे आणि भारती विद्यापीठाच्या होमिओपॅथी विभाग प्रमुख प्रो.डॉक्टर अनिता पाटील यांचे त्यांना मार्गदर्शन असणार आहे.
                   यासाठी स्वेच्छेने नावे द्यायची होती.५८ पेशंटनी नावे दिली.या प्रकल्पाची पहिली फेरी पूर्ण होत आली आहे.पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या मदतीने,कोथरूड,अश्विनी हॉटेल,सहकारनगर,घोले रोड असे पेशंटच्या सोयी साठी गट करण्यात आले.कोथरूड गटासाठी वासू आणि शशिकांत देसाई,सहकारनगर साठी राजीव आणि सविता ढमढेरे यांनी आपल्या घरात तपासणी साठी चोख व्यवस्था केली होती.अश्विनी हॉटेल तर आमच्या हक्काचे झाले आहे.घोले रोडला डॉक्टर डोळे यांच्या दवाखान्यात तपासणी चालू आहे.इतर गटातील पेशंटची तपासणी पूर्ण झाली.
 कुलश्री राजगुरू,प्रणिता कानडे,निष्ठा अग्निहोत्री,सागर नीटवे,ग्यानप्रकाश श्रीवास्तव या डॉक्टर्सनी प्रत्येक पेशंटची जवजवळ तासभर केस हिस्ट्री घेऊन तपासणी केली.
जे पेशंट काही अडचणीमुळे येऊ शकले नाहीत त्यांच्या साठी हे सर्व डॉक्टर डॉक्टर संजीव डोळे यांच्या दवाखान्यात १० जून पर्यंत सोमवार ते बुधवार सकाळी १०.३० ते १ आणि संध्याकाळी ५.३० नंतर उपलब्ध असणार आहेत.यापूर्वी ज्यांनी नावे दिली नाहीत ते पेशंटही या संधीचा लाभ घेऊ शकतील.
यानंतर डॉक्टर संजीव डोळे सर्व पेशंटची तपासणी करतील.
मित्रमंडळाचे काम फक्त समन्वयाचे आहे.पेशंटनी स्वत:च्या जबाबदारीवर यात सहभागी व्हावयाचे आहे.


निवेदन
गुरुवार दि.१२ मे रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.
डॉक्टर मानसी देशमुख यांचे ' स्मरणशक्ती आणि ब्रेन जिम' या विषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान होणार आहे.सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु ४.३० वाजता

 १२मे २०१६ सभेचा वृत्तांत
गुरुवार दि.१२ मे रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने डॉक्टर मानसी देशमुख यांचे ' स्मरणशक्ती आणि ब्रेन जिम' या विषयावर  व्याख्यान आयोजित केले  होते.त्या क्लिनिकल सायकोलॉजीस्ट आहेत आणि 'Mind-trail Intellectual services,Psychological services and research center'  च्या संचालक आहेत.
सभेस ६० जण उपस्थित होते.
नेहमीप्रमाणे प्रार्थनेने आणि त्यानंतर एप्रिल आणि मे महिन्यात जन्म असलेल्या  शुभंकर शुभार्थींचे 
 वाढदिवस साजरे करून सभेस सुरुवात झाली.
व्याख्यानात सुरुवातीला डॉक्टर मानसी देशमुख यांनी पार्किन्सन्स आजार,त्याची लक्षणे,मेंदूच्या विविध भागाची कार्ये. याबाबत उल्लेख केला.हे व्याख्यान नाहीतर कार्यशाळा आहे असे सांगत   कॉगनीटीव्ह इम्पेंअरमेंट आणि त्यात सुधारणा करण्यासाठी घरच्या घरी शुभंकरालाही करता येतील अशा करावयाच्या विविध कृती,खेळ,छोटे प्रयोग यावर भर दिला.कॉगनीटीव्ह हा शब्द वापरतो तेंव्हा त्यात विचार करणे,स्मरणशक्ती,संघटन,लक्ष केंद्रित करणे, अशा विविध बाबी येतात.पीडी पेशंटमध्ये कॉगनीटीव्ह इम्पेंअरमेंटमुळे सुरुवातीला सौम्य स्वरूपाचे बदल होतात.कामाची अमलबजावणी,लक्षकेंद्रित करणे इत्यादीत अडचणी निर्माण होतात,विचार प्रक्रिया मंदावते त्यामुळे अपेक्षित काम पूर्णत्वास नेण्यास  विलंब लागतो.
योग्य शब्द सापडण्यास त्रास होतो.हे सांगताना त्यांनी अल्झायमर आणि पीडीमुळे येणाऱ्या समस्या यातील फरक स्पष्ट केला.पीडीमध्ये डीक्शनरी असते शब्दही उपलब्ध असतात परंतु हालचाली मंदावल्याने डीक्शनरीपर्यंत पोचायला वेळ लागतो.विचार प्रक्रिया मंदावल्याने शब्द सापडायला वेळ लागतो. अल्झायमरच्या बाबतीत मात्र डीक्शनरीची पानेच कोरी असतात.त्यामुळे सुधारण्यासाठी वाव नसतो.पीडीमध्ये मात्र तो असतो.ब्रेनजीमने दैनंदिन जीवनातील अडचणींची तीव्रता कमी करू शकतो.१९८७ मध्ये प्रथम ब्रेनजीम ही संज्ञा वापरली गेली.
स्मरणशक्ती म्हणजे पूर्वीचे अनुभव आणि शिकलेल्या गोष्टींचा खूप मोठा साठा असतो.स्मरणश्क्तीचेही लाँग टर्म मेमरी,शॉर्टटर्म मेमरी,वर्किंग मेमरी असे प्रकार असतात.यासाठी आणि विविध कॉगनीटीव्ह कौशल्यांसाठी
डॉक्टर मानसी यांनी काही कृती( activity ) करवून घेतल्या.यात Visual scanning,लक्षपूर्वक ऐकणे,शब्द आठवणे,हालचाली आणि विचारप्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोडींग,Acrochart इत्यादींचा समावेश होता.यानुसार शुभंकरानी रोज शुभार्थीकडून करवून घेणे अपेक्षित आहे.तीच कृती पुन्हा पुन्हा केल्याने कौशल्यात सुधारणा होते.सातत्य महत्वाचे.या कृती करण्यापूर्वी शुभार्थीची ही कौशल्ये कोणत्या पातळीवर आहेत हे तपासता  येतील अशी ३९ प्रश्नांची प्रश्नावली त्यांनी दिली.ही प्रश्नावली म्हणजे  मान्यतापत्र ' Quality of Life scale and memory scale.' आहे.काही दिवस सातत्याने activity केल्यावर पुन्हा ही प्रश्नावली भरून काही फरक झाला आहे का हे पाहायचे.इंग्लंड,अमेरिकेत तज्ज्ञ सायकॉलॉजिस्ट हे करतात. पण आपल्याकडे याला अजून इतके महत्व दिले जात नाही.परंतु या स्केलनुसार घरी करवून घेणे शक्य आहे.शुभंकराने  शुभार्थीची मानसिकता समजून घेणे यासाठी महत्वाचे आहे.थेरपी आणि ब्रेनजीम यातील फरकही त्यांनी सांगितला.उदासीनता,भयगंड,चिंताग्रस्तता इ.साठी थेरपीची गरज असते.या सर्वात मला बदलायचं आहे हा दृष्टीकोनही महत्वाचा असल्याचे सांगितले.
यानंतर श्रोत्यांच्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.
मित्रमंडळ हा आता एक परिवार झाला आहे.मित्रमंडळ सदस्यांना आपल्या आनंदात सर्वाना सहभागी करून घ्यावेसे वाटते.वसू देसाई यांचा नातू ९५ % गुण मिळऊन दहावी उतीर्ण झाल्याने त्यांनी सर्वांसाठी पेढे आणले,सविता ढमढेरे यांना नात झाल्याने त्यांनी काजूकतली वाटली तर आशा रेवणकर यांनी वाढदिवसाबद्दल चहा बिस्कीटे दिली.
निवेदन
गुरुवार दि.१४ जुलै रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.
वैद्य नरेंद्र पेंडसे यांचे ' पार्किन्सन्ससाठी आयुर्वेद' या विषयावर व्याख्यान होणार आहे.सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु. ४ वाजता




Press ? for Keyboard


                    १४ जुलै मासिक सभा वृत्त
गुरुवार दि.१४ जुलै रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने वैद्य नरेंद्र पेंडसे यांचे ' पार्किन्सन्ससाठी आयुर्वेद' या विषयावर हॉटेल अश्विनी येथे व्याख्यान आयोजित केले होते.६० ते ७० जण उपस्थित होते.प्रार्थना आणि वाढदिवस साजरे करून सभेस सुरुवात झाली.वैद्य पेंडसे यांची शोभना तीर्थळी यांनी ओळख करून दिली.
सुरुवातीलाच त्यांनी आयुर्वेदाची सर्वसाधारण स्वास्थ्याची व्याख्या आणि एखादा आजार झालेल्या व्यक्तीच्या स्वास्थ्याबद्दलची व्याख्या सांगितली. पार्किन्सन्स ही व्याधी आहे पण प्रसन्न इंद्रिय,मन असेल तर स्वास्थ्य चांगले म्हणता येईल आणि सभेस जमलेले असे प्रसन्न चित्त असल्याचे जाणवले असे सांगितले.आपल्या भाषणात आयुर्वेदाच्या भूमिकेतून पार्किन्सन्स कसा होतो,उपचारात काय करावे आणि अ‍ॅलोपाथीची उपचार चालू असताना पूरक म्हणून काय करता येईल,अशा तीन पातळ्यांवर विचार मांडले.
चरक संहितेपासून अगदी नंतरच्या भैषीय रत्नावलीपर्यंत आयुर्वेदाच्या दृष्टीने या आजाराबद्दल कायकाय सांगितले गेले याचा आढावा घेतला.
अलीकडच्या काळात मधुमेह,रक्तदाब,हृदयविकार हे ५०/६० वयानंतर होणारे आजार तिशीतच होताना दिसत आहेत.बदललेली जीवन शैली यासाठीचे  एक कारण आहे.आयुर्वेदात याचा सुरुवातीपासूनच विचार केला गेला आहे.पार्किन्सन्सबाबतही लहान वयात तो होण्याचे प्रमाण वाढले आहे.आयुर्वेदानुसार पीडी होण्याच्या कारणात अनुवंशिकता  हे एक आहे.गर्भधारणेपुर्वी आई वडिलांचं आरोग्य कसे होते,गरोदरपणात आणि प्रसुतीनंतर आहार विहार कसा होता,उपचार काय केले हे महत्वाचे ठरते.
आयुर्वेदात औषधा इतकच किंबहुना औषधापेक्षा ऋतूनुसार आहार विहाराला जास्त महत्व दिले आहे.आहारात आपले पूर्वज जे खायचे आणि भौगोलिक प्रदेशानुसार जे जिथे पिकते ते  खावे,
भूक लागल्यावरच खावे असे सांगितले आहे.झोपेची वेळ आणि दर्जा यांनाही महत्व दिले आहे.
भारतात आयुर्वेदावर बऱ्याच जणांचा विश्वास असतो.पण वैद्यकीय सल्ल्याऐवजी बाजारात उपलब्ध औषधे आपल्या मनाने घेण्याचे प्रमाण जास्त आहे.यातही प्रसुतीनंतर घेण्याची औषधे,मालीशची तेले,पोट साफ करण्यासाठीची औषधे यावर भर असतो.बऱ्याच पीडी पेशंटना  बद्धकोष्ठतेचा त्रास असतो. सल्याशिवाय ही औषधे सर्रास घेतली जातात.पण हे चुकीचे आहे.यामुळे पोट साफ होते असे वाटले तरी त्यात सोनामुखीसारखी औषधे असतात आणि ती आतड्यातील गट फ्लोरा मायक्रो बायो यांच्या कॉलनीज बदलतात.त्याचा दूरगामी परिणाम होतो.याचा मेंदूशी संबंध असतो.आयुर्वेदानुसार खाण्यापिण्यात बदल आणि बस्ती चिकित्सा महत्वाच्या ठरतात.त्याचा मेंदूलाही उपयोग होतो.पण यासाठी ३ ते ६ महिने वेळ द्यावा लागतो.लीओडोपा,तत्सम औषधाप्रमाणे ८/१० दिवसात फरक पडत नाही. अ‍ॅलोपाथीच्या दिलेल्या गोळ्यांनी बाह्य लक्षणे लवकर आटोक्यात येतात.बौद्धिक क्षमता,निर्णयक्षमता,विषाद,नैरा श्य,झोप,लघवी या समस्या नंतर लक्षात येतात. आयुर्वेदात या सर्वांचा एकत्रच विचार होतो.यासाठी लागणारा अवधी ६ महिने ते एक वर्ष किमान परिणाम दिसण्यास लागत असल्याने अडचणी निर्माण होतात.यातही  अ‍ॅलोपाथीची औषधे जितकी जास्त दिवस घेतली त्यांना परिणाम त्यामानाने उशिरा दिसतो.आयुर्वेदीय उपचारात  पोटात घ्यायची औषधे गौण मानली आहेत.बस्ती,एनिमा, शिरोधारा, नस्य यावर भर दिला आहे.हे व्यक्तीनुसार वेगळे आहे आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली हे केले पाहिजे.
पेंडसे यांनी अमेरिका, इंग्लंड येथे झालेल्या अनेक संशोधनाचे निष्कर्ष आयुर्वेदीय तत्वांना पुष्टी देणारे असल्याचे विविध संशोधनाची उदाहरणे देऊन सांगितले.परंतु ही संशोधने तेथील पेशंटवर झालेली असल्याने तिथले राहणीमान, सांस्कृतिकदृष्ट्या वेगळेपण असल्याने येथल्या पेशंटवर प्रयोग होण्याची आवश्यकता प्रतिपादन केली.
यानंतर श्रोत्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.
जुलै महिन्याचा संचारचा अंक उपस्थिताना देण्यात आला.
पद्मजा ताम्हणकर यांनी वाढदिवसानिमित्त आणि अश्विनी दोडवाड यांनी नातीच्या जन्माची बर्फी दिली.
निवेदन
गुरुवार दि.११ ऑगस्ट रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे. न्युरॉलॉजिस्ट डॉक्टर सुयोग दोषी यांचे व्याख्यान होणार आहे.सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु. ४ वाजता

११ ऑगस्ट सभेचे वृत्त
गुरुवार दि.११ ऑगस्ट रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने हॉटेल अश्विनी येथे न्युरॉलॉजिस्ट डॉक्टर सुयोग दोषी यांचे व्याख्यान आयोजित केले होते.व्याख्यानास ६० जण उपस्थित होते.प्रार्थनेने सभेस सुरुवात झाली.शोभना तीर्थळी यांनी सुयोग दोषी यांची ओळख करून दिली.
डॉक्टरनी आपल्या व्याख्यानात अनैच्छिक हालचाली ( dyskinesia ),ताठरता,posture,तोल जाणे अशा विविध लक्षणाबाबत आणि औषधोपचार,शस्त्रक्रिया इत्यादीबाबत माहिती सांगितली.
पार्किन्सन्स मध्ये हालचाली मंदावतात.पण डीस्कायनेशियाचा त्रास सुरु होतो तेंव्हा त्या वाढतात. साधरणपणे लहान वयात पीडी झालेल्यांना ही शक्यता जास्त असते. आणि लीओडोपा बरेच दिवस घेतल्यावर ही शक्यता वाढते. त्यामुळे लहान वयात पीडी झालेल्याना आणि सुरुवातीची अवस्था असताना डोपामीन अगोनीस्ट औषधे दिली जातात.यातही डीसेंबल  आणि नॉनडीसेंबल असे प्रकार असतात.नॉनडीसेंबल पूर्ण बंद करता येत नाहीत. स्वीकारावे लागतात.डीसेंबलमध्ये डोस अ‍ॅड्जेस्ट करून थोडी सुधारणा होऊ शकते पण त्यात ताठरता वाढते.डीबीएस शस्त्रक्रिया हाही उपाय आहे.Amantadine,paciten यांचा डीस्कायनेशियावर उपयोग होऊ शकतो परंतु त्यातून काही पेशंटना भास,मानसिक समस्या सारखे साईड इफेक्ट होण्याची शक्यता असते.हे लक्षात घेऊन उपाययोजना करावी लागते.
posture आणि gait ची समस्या पीडी वाढत गेल्यावर निर्माण होते.मेंदूकडून आपोआप होणाऱ्या प्रतिक्रिया असतात त्याही कमी होतात.फ्रीजिंग म्हणजे पुतळा होण्याची समस्या निर्माण होते.यावर कोणतेही औषध नाही.फिजिओथेरपीचा उपयोग होतो.कसे उठायचे,  कसे चालायचे, रात्री उठताना काय खबरदारी घ्यायची,कमोड कसा वापरायचा यासाठी मार्गदर्शन करून समस्येचे  थोड्या प्रमाणात निराकरण करता येते.
शस्त्रक्रिया कोणासाठी यावरही डॉक्टरांनी मोलाच मार्गदर्शन केल.शस्त्रक्रिया करताना कोणाची करावी याचे निकष महत्वाचे.PSP, MSA या समस्या असणाऱ्यांना शस्त्रक्रियेचा उपयोग होत नाही.ज्याना सिंडोपाचा उपयोग होतो  त्यांच्यासाठी शस्त्रक्रिया योग्य ठरते.नॉनमोटार लक्षणावर शस्त्रक्रियेचा उपयोग होत नाही.शस्त्रक्रियेत इन्फेक्शन,ब्लीडींग होण्याची  इतर शस्त्रक्रियेप्रमाणेच रिस्क असते.
यानंतर श्रोत्यांच्या अनेक प्रश्नांना डॉक्टरनी उत्तरे दिली.
शुभंकर आणि शुभार्थी यांचे वाढदिवस यानंतर साजरे करण्यात आले.वाढदिवसानिमित्त अश्विनी दोडवाड यांनी इडली चटणी तर अनिल शिरोडकर यांनी चहा दिला.
यानंतर भारती विद्यापीठाच्या होमिओपॅथी कॉलेजच्या डॉक्टरांनी त्यांच्या संशोधनात सहभागी असलेल्या शुभार्थीकडून फीडबॅक घेतला.काही नवीन शुभार्थिनी संशोधनात सहभागी होण्यासाठी नावे दिली.प्रार्थनेने सभेची सांगता झाली.
पुढील महिन्यातील कार्यक्रम, दुसरा  गुरुवार, गणेशोत्सवात येत असल्याने पहिल्या गुरुवारी होणार असल्याचे आणि हृषीकेश पवार यांनी नृत्योपचाराची दुसरी  बॅच बुधवार व गुरुवार संध्याकाळी ४ ते ५ या वेळात सुरु केली आहे असे जाहीर करण्यात आले.
निवेदन
गुरुवार दि.१ सप्टेंबर रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने कार्यशाळा  आयोजित केली आहे.
प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या
 न्युरोफिजिओथेरपिस्ट डॉक्टर नेहा सिंग आणि त्यांच्या विद्यार्थिनी या कार्यशाळेचे संयोजन करणार आहेत प्रत्येक शुभार्थीची स्वतंत्रपणे तपासणी केली जाणार आहे.सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु.३ वाजता                           
  गुरुवार दि.१ सप्टेंबर १६ च्या कार्यशाळेचे वृत्त.
गुरुवार दि.१ सप्टेंबर रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने फिजिओथेरपी कार्यशाळा  आयोजित केली होती.
लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या 'डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम कॉलेज ऑफ फिजिओथेरपी'च्या
 न्युरोफिजिओथेरपिस्ट प्राध्यापक  डॉक्टर नेहा सिंग त्यांचे सहकारी आणि विद्यार्थिनी अशी ४५  जणांची टीम या कार्यशाळेसाठी  खास लोणीहून  आली  होती.या टीमसह एकूण ९० जण कार्यशाळेत सहभागी होते.
डॉक्टर नेहा सिंग, २०१२ साली मंडळाने फिजिओथेरपी  कार्यशाळा आयोजित केली होती तेंव्हा डी.वाय.पाटील कॉलेजच्या   पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी म्हणून सहभागी होत्या.त्यांचा पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा  प्रकल्प पार्किन्सन्सवर आधारित होता.आज त्या स्वत: प्राध्यापक म्हणून कार्यशाळेचे आयोजन करत होत्या.अश्विनी मध्ये त्यांची टीम दोन वाजताच हजर झाली.मंडळाचे कार्यकर्ते ठरल्याप्रमाणे अडीच वाजता गेले तर नेहा आणि टीमची गरजेनुसार टेबल खुर्च्या मांडून,बॅनर लावून पूर्व तयारी झाली होती.शुभंकर, शुभार्थीही येऊ लागले होते.त्यामुळे वेळेत कार्यक्रमास सुरुवात झाली.
                           सुरुवातीला शुभार्थी कडून अनुमती पत्रक (consent form ) भरून घेऊन प्रत्येकाला बिल्ले लावण्यात आले.प्रत्येकाचे वजन,उंची,बी.पी. पाहण्यात आले.विद्यार्थिनीनी शुभार्थींचे assessment form भरले. एकूण ३६ शुभार्थी होते.स्टेशन १,२,३,४ अशा पाट्या टेबलसमोर लावल्या होत्या.मधल्या भागात शुभंकर आणि ज्यांची तपासणी झाली आहे त्या शुभार्थींची बसायची व्यवस्था केली होती.शुभार्थींचे, कंप,तोल जाणे,ताठरता,  पोश्चर अशा समस्येनुसार वर्गीकरण केले होते. त्यानुसार वेगवेगळ्या स्टेशनवर  शुभार्थींना बसवले गेले.प्रत्येक शुभार्थीबरोबर एक विद्यार्थिनी होती.प्रत्येक शुभार्थीला पुरेसा वेळ देऊन शिस्तबद्धपणे प्रत्येकाच्या शंकांचे निरसन करत, माहिती आणि व्यायाम सांगण्याचे  काम सुरु होते..छापील माहिती असलेली पत्रकेही देण्यात आली.एकीकडे ३.३० वाजता डॉक्टर नेहा यांनी कार्यशाळेचे प्रयोजन आणि माहिती सांगितली.चार वाजता सर्वाना एकत्र बसवून सर्वांकडून कार्डियाक एक्सरसाईज म्हणजे चेअर एरोबिक्स करून घेतले.प्रत्येक शुभार्थीच्या शेजारी एक फिजिओथेरपिस्ट होता.समोर डॉक्टर साहिल घोरपडे,डॉक्टर रॅचेल नगरकर हे दोन  डेमॉन्स्ट्रेटर होते.याशिवाय डॉक्टर नेहाही स्वत:एक्सरसाईज कसे करायचे हे दाखवत होते.यात खालीलप्रमाणे एक्सरसाईज शिकवले.
१)march pass २)stretch & swipe ३) tap & clap ४) एक आणि तीनचे एकत्रीकरण ५) दोन आणि तीनचे ६) दोन्ही हात जोरजोरात झटकणे.हे सर्व करताना काय काळजी घ्यायची हेही सांगितले.उदाहरणार्थ
नाश्त्याआधी करणे,जेवणानंतर १ ते दीड तासाने करणे,आरश्यासमोर बसून १,२,३,४ असे अंक मोजत करणे हे
महत्वाचे असल्याचे सांगितले.
याशिवाय हात आणि पाय यांचे कोआर्डीनेशन,श्वासोच्छवास,पोश्चर,कॉन्सन्ट्रेशन या गोष्टीही महत्वाच्या असल्याचे सांगितले.
या सगळ्या भरगच्च कार्यक्रमात नेहमीप्रमाणे वाढदिवसही साजरे करण्यात आले.वाढदिवसानिमित्त उषा चौधरी यांनी काजू डिलाईट आणि शीला कुलकर्णी यांनी चॉकलेट दिली.
शुभंकर कल्याणी कुलकर्णी या छोट्या मोठ्या कामासाठी ऑनलाईन केअरटेकर पुरविणारी संस्था सुरु करणार आहेत त्याबद्दल त्यांनी माहिती सांगितली.डी.वाय.पाटील कॉलेजमध्ये  पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी असलेल्या देविका भिडे यांना  नृत्य आणि फिजिओथेरपी यांची सांगड घालून पार्किन्सन्ससाठी प्रकल्प करावयाचा आहे त्यासाठी  शुभार्थिनी सहभागी व्हावे  अशी त्यांनी विनंती केली.
अडीच तीनला सुरु असलेला हा भरगच्च  कार्यक्रम सहा वाजेपर्यंत चालला.डॉक्टर नेहा यांनी केलेले  नियोजन,
दीपा होनप,अरुंधती जोशी,सविता ढमढेरे, वसू जोशी या कार्यकर्त्यांनी केलेली धावपळ,त्यांना अनेक शुभंकरांची साथ, शुभार्थीं चा उत्स्फूर्त सहभाग यामुळे कार्यक्रम यशस्वी होऊ शकला.

निवेदन
गुरुवार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.यावेळी
डॉक्टर श्रीधर चिपळूणकर यांचे 'पार्किन्सन्स आणि पोश्चर' याविषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान होणार आहे.
सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु ४ वाजता
  १३ ऑक्टोबर मासिक सभा वृत्त
गुरुवार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने  हॉटेल अश्विनी,येथे सभा आयोजित केली होती.यावेळी डॉक्टर श्रीधर चिपळूणकर यांचे 'पार्किन्सन्स आणि पोश्चर' या विषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान झाले.सभेस ७०/८० शुभंकर, शुभार्थी उपस्थित होते.आशा रेवणकर यांनी वक्त्यांची ओळख करून दिली.काहीतरी वेगळे करण्यासाठी औषधाविना आजार बरा  करणे अशी संकल्पना घेऊन डॉक्टर चिपळूणकर यांनी प्रॅक्टीस सुरु केली.जवळजवळ १० हजार विविध आजाराच्या पेशंटनी याचा फायदा घेतला.त्यांच्या दवाखान्यात गेल्या गेल्या 'Visit before you take medicine' अशी  पाटी दिसते.त्यांनी आयुर्वेदातील एमडी पदवी मिळवली.त्यानंतर डिप्लोमा इन फिजिओथेरपी,पॅथालॉजीत पोस्ट  ग्रॅज्युएशन केले.स्पोर्ट सायन्स,स्कीन एजिंग आणि रीज्युवेनेशन या विषयातील विविध पदव्या देश परदेशात मिळवल्या.या सर्वातून स्वत:ची वेगळी उपचारपद्धती विकसित केली.
पार्किन्सनन्स बरा होत नाही आणि सतत वाढत जाणारा आजार आहे हा विचार घेऊनच पीडी पेशंट जगत असतो.औषधाव्यतिरिक्त, तुम्हीच तुमचे डॉक्टर बना, यासाठी आजार समजून घ्या असा सल्ला त्यांनी दिला.यासाठी त्यांनी वेदनेचे उदाहरण दिले.बुटात खडा अडकल्यास पटकन समजते, आपण तो काढून टाकतो.झोपेतही काही चावल्यास प्रतिक्षिप्त क्रियेने शरीर मागे घेतो.वेदनेपासून दूर होण्याची इच्छा त्यामागे असते.मेंदू हा सुपर कॉम्प्युटर आहे. वेदनेला प्रत्येकाची वेगवेगळी प्रतिक्रिया असते.प्रत्येकजण क्षमतेनुसार सहन करत जातो.वेदना वाढल्यावर भीती,काळजी वाटते. वेदना समजून घेण्यासाठी वेदना कधीपासून हे पहायचं. प्रत्येकांनी आपला उपाय शोधायचा.बरेच जण वेदनाशामक औषधे घेतात यातून अ‍ॅसिडीटी वाढते.वेदना दुसरीकडे फक्त ढकलली जाते.आपण वरून काही चोळतो तेंव्हाही झुमझुमते.त्यामुळे लक्ष वेदनेपासून दुसरीकडे वळवले जाते.
आजारातून  बरे होण्यासाठी प्रतिकारशक्ती, विचारशक्ती वाढवली तर शरीर स्वत:च औषध तयार करु शकेल.
शरीर करत नसेल तर ते करण्यासाठी काय करायचं? आपल्याच मेंदूला कामाला लावायचं.मेंदूचा ४% भागच आपण वापरतो.आणखी वापरायचा.यासाठी पक्षाघाताचे उदाहरण त्यांनी दिले.डावा हात पॅरलाईज झाला असेल तर उजवा हातही तसाच डाव्याप्रमाणे ठेवायचा.तसेच पाहत राहायचे हे करताना आपण दमतो.घाम येतो.हळूहळू उजव्या हाताची दोन बोटे हलवायची.त्याप्रमाणे डाव्या पॅरलाईज झालेल्या हाताचीही हालचाल होऊ लागते.म्हणजेच विरुद्ध बाजूचा परस्पर संबध पाहून आपण स्नायूवर नियंत्रण आणू शकतो.
व्यायामातही विविधता असावी.दहावेळा हात हलवला की अकराव्यावेळा ती नुसती हालचाल असते.व्यायाम नसतो.चालणे,पोहणे,उठाबशा काढणे अशी विविधता असावी.दमश्वास, ताणणे हे असावे.व्यायामाने ताठरता कमी होते.शरीरावरील लक्षणाचा मनाशी कसा संबंध असतो हे सांगताना त्यांनी परीक्षेचे उदाहरण दिले.घाम येणे, हात कापणे, फटिग ही शारीरिक लक्षणे भीतीने,मानसिक ताणाने दिसतात.हे टाळण्यासाठी ताणावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे ठरते.ऑलिम्पिकमध्ये सिल्वर वरून  गोल्ड मेडलकडे जाण्यासाठी असे ताणावरील नियंत्रण आपण शिकवत असल्याचे त्यांनी सांगितले.खेळाडू बाहेरून स्टेरॉइड घेतात,पकडले जातात.परंतु शरीरात स्वत:चीच स्टेरॉइड तयार करायची क्षमता असते,ती वाढवायची.आजारावरील नियंत्रणासाठीही नकारा ऐवजी शरीरातील लक्षणे स्वीकारून समजून घेणे महत्वाचे.नकारात्मक विचार यायला लागले की लगेच दखल घेऊन आपले ज्यात मन रमते अशा गोष्टी करायच्या.स्वयंपाक,चित्रकला,बागकाम,गाणी ऐकणे,म्हणणे, प्रवास करणे,जे करायचे ते तन्मयतेने केल्यास,आनंदी असल्यास चांगले स्टीरॉइड तयार होते.गोष्टी सहज उपलब्ध झाल्या की त्रास घेणे कमी होते अवलंबित्व येते.यासाठी त्यांनी सर्वांना पटेल असे मोबाइलचे उदाहरण दिले.मोबाईलवर नंबर सेव्ह केल्याने मोबाईल हरवला तर जवळच्या माणसाचा फोन नंबरही आठवत नाही.अशाच आपण नित्याच्या अनेक क्रिया कमी करतो.आवश्यक क्रिया न केल्याने आजाराला निमंत्रण देतो.त्यामुळे नित्याच्या क्रिया कमी करू नका आणि क्रिया करताना मन केंद्रित करा असा सल्ला दिला.याचबरोबर पोटाने श्वास घेण्यासही सांगितले.लहान मुले असाच श्वास घेतात.इगो सोडून खळखळून हसणेही महत्वाचे असल्याचे सांगितले.
यानंतर श्रोत्यांच्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.फळ्यावर रेखाचित्रे काढून बसणे,उठणे,झोपणे,झोपून उठणे,वाहन चालवणे,स्वयंपाक करणे,रिक्षात बसणे अशा विविध वेळी पोश्चर कसे असावे हे समजावून सांगितले.चहापान झाले,औपचारिक रित्या सभा संपली तरी श्रोत्यांचे प्रश्न विचारणे संपत नव्हते.डॉक्टरांनी न कंटाळता,ठरलेल्या वेळापेक्षा जास्त वेळ देऊन सर्वांच्या शंकांचे निरसन केले.सर्वांच्याच मनात सकारात्मक विचार पेरले.
वाढदिवसानिमित्त श्यामलाताई शेंडे यांनी चहा दिला.


निवेदन
सर्वाना दिवाळी आरोग्यपूर्ण,आनंदाची,सुखसमृद्धीची जावो.
मासिक सभा गुरुवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी आयोजित केली आहे.
यावेळी 'पूरक उपचार पद्धतीबद्दलचे आपले अनुभव' या विषयवार शेअरिंग असणार आहे.
पहिली १५ मिनिटे डी.वाय.पाटील कॉलेजमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी असलेल्या देविका भिडे या, नृत्य आणि फिजिओथेरपी यांची सांगड घालून पार्किन्सन्ससाठी प्रकल्प करत आहेत.त्याबद्दल माहिती सांगणार आहेत.याबाबतची व्हिडीओ सीडीही दिली जाणार आहे.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु ४ वाजता
दिवाळीच्या आनंदात भर टाकणारी आणखी एक माहिती देत आहे.
शुक्रवार दिनांक १८ नोव्हेंबर रोजी पुण्याजवळील शांतीवन येथे दिवसभराची सहल जाणार आहे.ज्यांना सहभागी व्हायचे आहे.त्यांनी गुरुवार दिनांक १० नोव्हेंबरच्या कार्यक्रमात प्रत्येकी रुपये २०० भरून नाव नोंदवायचे आहे.१० नोव्हेंबरच्या कार्यक्रमात सहलीची रूपरेषा सांगणारे पत्रक दिले जाईल.                                              
    १० नोव्हेंबर मासिक सभा वृत                            
पार्किन्सन्स मित्रमंडळाची मासिक सभा गुरुवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी आयोजित केली होती.
यावेळी 'पूरक उपचार पद्धतीबद्दलचे आपले अनुभव' या विषयावार शेअरिंग झाले.प्रार्थनेने सभेस सुरुवात झाली.
 डी.वाय.पाटील कॉलेजमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी असलेल्या देविका भिडे या, नृत्य आणि फिजिओथेरपी यांची सांगड घालून पार्किन्सन्ससाठी प्रकल्प करत आहेत.पहिली १५ मिनिटे त्यांनी त्याबद्दल प्रात्यक्षिकासह माहिती सांगितली.प्रसिद्ध नृत्यांगना सुचित्रा दाते यांच्या कडे त्यांची नृत्यसाधनाही चालू आहे.सुचित्र  दाते या गेली काही वर्षे पार्किन्सन्स पेशंट आणि जेष्ठ नागरिकांसाठी मोफत नृत्योपचार करत आहेत.देविका यांना फिजिओथेरपीचा त्यांचा अनुभव आणि नृत्य हे बऱ्याचवेळा सारखे आणि एकमेकास पूरक आहेत असे वाटले.यासाठी त्यांनी पदव्युत्तर प्रकल्पासाठी हा विषय घेतला. प्रात्यक्षिकासाठी त्यांना शीतल टेकावडे आणि झिनल संगवी यांनी मदत केली.भरतनाट्यममधील आडव,विविध मुद्रा,नवरस त्यांनी दाखवले.शुभंकर शुभार्थीनीही यात उत्साहाने सहभाग घेतला.फिजिओथेरपी करताना कंटाळवाणे वाटू शकते नृत्याची जोड दिल्याने ते मनोरंजक होते.पाय आपटताना अ‍ॅक्युप्रेशरचे  सर्व पॉईंट दाबले जातात,नृत्याच्या विविध बाबी करताना हालचालीतील  समन्वय, चालण्यात सुधारणा,तोल सावरणे या गोष्टी साध्य होतात,आत्मविश्वास वाढतो.नवरसाच्या अभिनयामुळे चेहऱ्याला फेशिअल होते. भावविहीन चेहरा  हे पिडीचे लक्षण, त्यावर मात करता येते.
या प्रयोगात सहभागी असलेले मोरेश्वर काशीकर यांनी आत्तापर्यंत आठ सेशन केलेली आहेत. त्यांनी पाय आपटण्यामुळे फ्रीजिंगची समस्या कमी झाल्याचे सांगितले.
यानंतर रामचंद्र करमरकर यांनी सहलीबद्दल  माहिती सांगितली.
शरच्चंद्र पटवर्धन यांनी पूरक उपचार म्हणजे अ‍ॅलोपथीचे उपचार चालू ठेऊन केले जाणारे इतर उपचार अशी पूरक उपचारपद्धतीची व्याख्या करत चर्चेला सुरुवात केली.
मोरेश्वर काशीकर यांनी वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळे पूरक उपचार वापरत असल्याचे सांगितले.यात आयुर्वेद,होमिओपॅथी,नृत्योपचार,योगासने,प्राणायाम,सर्वांग सुंदर व्यायाम,संगीत इत्यादीचा समावेश असल्याचे सांगितले.ते शुभार्थीनी मदत मागितल्यास  घरी जाऊन योग शिकवतात.यात त्यांना आनंद मिळत असल्याचेही सांगितले.विजय ममदापुरकर यांनी खेळाडू म्हणून स्वत:चे अनुभव सांगितले.श्री काशीकर यांच्या स्मरणिकेतील योगोपचार उपचारावरील लेखाचा फायदा झाल्याचे सांगितले.स्वमदत गटाचा आत्मविश्वास वाढण्यास उपयोग होतो असे ते म्हणाले. विशाखा मेंडजोगे यांनी  सुज्योग थेरपीबद्दल माहिती सांगितली.श्री.राजीव ढमढेरे यांच्यासाठी त्या ही थेरपी वापरतात. त्यांना याचा उपयोग होतो.उमेश सलगर यांनी आयुर्वेदिक औषध आणि महानारायण तेलाने  मसाज याचा उपयोग झाला अशी माहिती दिली
नेहमीप्रमाणे वाढदिवस साजरे करण्यात आले.शोभना तीर्थळी यांनी,गोपाल तीर्थळी यांच्या वाढदिवसानिमित्त  खांडवीच्या वड्या- हा पारंपारिक पदार्थ आणला होता.तर हेमा शिरोडकर यांनी दिवाळीनिमित्त स्वत: केलेली चकली आणली होती.विनिता कुलकर्णी यांनी चहा दिला.

८  डिसेंबर मासिक सभा वृत्त
                           गुरुवार दिनांक ८ डिसेंबर रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली होती.. यावेळी डॉक्टर अरूण दातार (संचालक - सूर्या जिम) यांचे 'पार्किन्सन्स आणि व्यायाम' या विषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान झाले. सभेस ५०/६० जण उपस्थित होते.आशा रेवणकर यांनी वक्त्यांची ओळख करून दिली.सुरुवातीला डिसेंबर महिन्यात ज्यांचे वाढदिवस आहेत अशा शुभंकर शुभार्थींचे  वाढदिवस साजरे करण्यात आले.यावेळी माननीय वक्त्यांचा वाढदिवसही डिसेंबर मधील होता.
 डॉक्टरांनी सुरुवातीला '.प्रार्थना नसती तर मी वेडा झालो असतो असे गांधीजी म्हणत' असे सांगत  प्रार्थनेचे महत्व सांगितले.
 यानंतर त्यांनी काही वेगवेगळ्या कारणाने शारीरिक दोष निर्माण झालेल्या व्यक्तींना व्यायामाद्वारे कसे बरे केले याची उदाहरणे सांगितली.१०/१२ वर्षाच्या  मुलाचे   आजारपणामुळे  हातपाय अधू झाले होते.या मुलाकडून  मसाज,पोहणे, व्यायाम हे करवून घेतले.चार वर्षात ज्याला छोटा दगडही उचलता येत नव्हता तो ११५ किलो वजन उचलू शकला.हे साध्य करण्यासाठी काही महत्वाच्या बाबी त्यांनी सांगितल्या.
                १) आपले दु:ख,त्रास जवळच्या व्यक्ती सोडल्यास सर्वाना सांगत बसु नका.यावर बहिणाबाईची कविता त्यांनी सांगितली.'माझ दु:ख माझ दु:ख तयघरात कोंडलं,माझ सुख माझ सुख हंड्या झुंबरे टांगलं'.
 स्वत:च्या अपघातानंतर निर्माण झालेल्या दुर्धर परिस्थितीवर मात करण्यास ती उपयोगी पडल्याचे त्यांनी सांगितले.
                 २) ठरलेले व्यायाम करताना लक्ष केंद्रित करणे महत्वाचे.शुभंकराने व्यायाम करताना जिद्द, आशावाद निर्माण करावा.प्रेम, काळजी,सहानुभूती दाखवून शुभार्थीला कमकुवत करू नये.
                 ३) .व्यायामात सातत्य,काटेकोरपणा,शिस्त हवी.उरकाउरकी नको.कंटाळा नको' टू.फिल टायर्ड इज नॉट टू बी
टायर्ड' 'द मसल्स ग्रो ओन्ली व्हेन ...यु फोर्स देम टू ग्रो' हे लक्षात घ्यावे.
                ४) You are not disabled by the disabilities you have but you are able by the abilities you have.
                ५) मनाने खंबीर बनून दुखण्यावर स्वार व्हा. यातून ,शरीराची ताकद वाढवत नेता येते.
                ६) व्यायाम करताना निश्चीत असे उद्दिष्ट हवे.यात अल्पकालीन,दीर्घकालीन,निर्णायक असे प्रकार सांगितले. 
              यानंतर त्यांनी प्रत्यक्ष व्यायाम करून घेतले.व्यायामाच्या सुरुवातीला दीर्घ श्वास घेऊन मन स्थिर केले.त्यानंतर डोळे मिटून पायाच्या बोटापासून डोक्यापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवाला ताण विरहीत करण्यास सांगितले.नंतर पुन्हा त्याच अवयवांना ताण देण्यास सांगितले.पुन्हा ताण विरहीत करून व्यायाम प्रकार सुरु केले.( हे व्यायाम प्रकार स्वतंत्रपणे संचार किंवा स्मरणिकेत देण्यात येतील)   सर्व शुभंकर शुभार्थी उत्साहाने यात सहभागी झाले.'नो पेन नो गेन' म्हणून काही झाले तरी व्यायाम चुकवायचा नाही.हे सर्वांच्या मनावर ठसवले.                          
ज्या दिवशी व्यायाम नाही त्यादिवशी जेवण नाही असा निर्बंध स्वत:वर घातल्याचे त्यांनी सांगितले.व्यायामाबरोबर आहार विहाराचे  महत्वही विशद केले.त्यांच्या विचाराना 'आधी केले मग सांगितले' असे अनुभवाचे अधिष्ठान असल्याने, सर्वांनाच त्यांचे विचार भावले.पंचाहत्तरीतही त्यांची शरीरसंपदा, दीड दोन तासातील आत्मविश्वासपूर्ण,उत्साहाने ओतप्रेत भरलेला वावरही सर्वांवर प्रभाव टाकून गेला.
            यानंतर श्रोत्यांच्या विविध प्रश्नांना त्यांनी  उत्तरे दिली.
शेवटी अंजली महाजनने व्यायामाविषयीच्या घोषणा सांगितल्या.
डॉक्टर दातार यांनी पेशंट एकत्रित आल्यास आपण व्यायाम शिकवण्यास तयार आहोत असे सांगितले.डॉक्टरांच्या जीवन दर्शन सांगणाऱ्या 'शून्यातून सूर्याकडे' या पुस्तकाच्या प्रती काहीजणांनी घेतल्या.
पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या ' पार्किन्सनन्सचा स्वीकार करून पार्किन्सन्ससह आनंदी राहावे' या ब्रीदवाक्याला पूरक आणि प्रेरणादायी अशा डॉक्टरांच्या व्याख्यानाने  सकारात्मक विचाराची पेरणी नक्कीच झाली.  
                             



























































































         




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































  





Posted by http://parkinson-diary.blogspot.in/ at 06:26 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Newer Posts Older Posts Home
Subscribe to: Posts (Atom)

Blog Archive

  • ►  2025 (10)
    • ►  June (1)
    • ►  April (2)
    • ►  March (1)
    • ►  February (1)
    • ►  January (5)
  • ►  2024 (12)
    • ►  October (1)
    • ►  July (2)
    • ►  May (1)
    • ►  March (4)
    • ►  February (1)
    • ►  January (3)
  • ►  2023 (22)
    • ►  December (1)
    • ►  November (2)
    • ►  October (2)
    • ►  September (2)
    • ►  August (6)
    • ►  July (1)
    • ►  May (2)
    • ►  April (2)
    • ►  February (2)
    • ►  January (2)
  • ►  2022 (20)
    • ►  November (3)
    • ►  October (2)
    • ►  August (1)
    • ►  July (5)
    • ►  June (1)
    • ►  May (1)
    • ►  March (1)
    • ►  February (5)
    • ►  January (1)
  • ►  2021 (41)
    • ►  December (3)
    • ►  November (2)
    • ►  October (12)
    • ►  September (3)
    • ►  August (1)
    • ►  July (2)
    • ►  June (3)
    • ►  May (2)
    • ►  April (7)
    • ►  March (4)
    • ►  February (1)
    • ►  January (1)
  • ►  2020 (19)
    • ►  December (2)
    • ►  November (1)
    • ►  October (2)
    • ►  September (2)
    • ►  August (5)
    • ►  March (3)
    • ►  February (3)
    • ►  January (1)
  • ►  2019 (30)
    • ►  December (1)
    • ►  November (3)
    • ►  October (3)
    • ►  August (1)
    • ►  June (2)
    • ►  May (4)
    • ►  April (4)
    • ►  March (5)
    • ►  February (1)
    • ►  January (6)
  • ►  2018 (52)
    • ►  December (6)
    • ►  November (1)
    • ►  October (3)
    • ►  September (3)
    • ►  August (5)
    • ►  July (6)
    • ►  June (2)
    • ►  May (5)
    • ►  April (4)
    • ►  March (2)
    • ►  February (6)
    • ►  January (9)
  • ►  2017 (26)
    • ►  December (1)
    • ►  November (1)
    • ►  October (2)
    • ►  September (2)
    • ►  August (1)
    • ►  July (2)
    • ►  June (5)
    • ►  May (2)
    • ►  April (4)
    • ►  March (2)
    • ►  February (2)
    • ►  January (2)
  • ▼  2016 (13)
    • ▼  December (1)
      • जगायचं कस? गाण म्हणत.
    • ►  November (4)
      • शांतीवन सहल
      • मित्रा
      • तुम्हीही बना रोल मॉडेल
      • अंतर्बाह्य उजळूया.
    • ►  August (5)
      • खुदिको बुलंद करणारे बंदे - २
      • खुदिको बुलंद करणारे बंदे
      • बुद्धिवंत वास्तुरचनाकार हरपला.
      • मैत्रीदिनाच्या शुभेच्छा
      • देणाऱ्याचे हात हजार
    • ►  July (1)
      • प्रसन्नचित्त शुभार्थी सुधाकर अनवलीकार
    • ►  March (1)
      • जानेवारी १६ पासून मित्रमंडळ वार्ता
    • ►  February (1)
  • ►  2015 (11)
    • ►  December (2)
    • ►  September (1)
    • ►  June (1)
    • ►  May (2)
    • ►  April (2)
    • ►  March (2)
    • ►  February (1)
  • ►  2014 (32)
    • ►  December (2)
    • ►  November (2)
    • ►  October (5)
    • ►  September (3)
    • ►  August (3)
    • ►  April (3)
    • ►  March (5)
    • ►  February (5)
    • ►  January (4)

About Me

http://parkinson-diary.blogspot.in/
View my complete profile

माझे इतर ब्लॉग्ज

http://bachbaba.blogspot.in/ : पुष्पौषधी वरील ब्लॉग
http://shobhanatai.blogspot.in/ : माझ्या इतर लिखाणाचा ब्लॉग

This blog is design by : arati.aval@gmail.com
Simple theme. Powered by Blogger.